Wednesday, July 18, 2012

मालाच्या गुणवत्तावाढीसाठी शेतकऱ्याने उभारले पॅकहाऊस

केवळ पीक उत्पादन महत्त्वाचे नसते. तर काढणीपश्‍चात तंत्रज्ञानालाही तितकेच महत्त्व देणे गरजेचे असते. 
काढणीपश्‍चात नियोजन योग्य प्रकारे न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या पातळीवर होऊ शकते. 
उत्पादन निघाल्यानंतर मालाची तात्पुरती साठवणूक, त्याची प्रतवारी, पॅकिंग या गोष्टीही तितक्‍याच गुणवत्तेने होणे गरजेचे असते. पावसाळा, उन्हाळ्यात अनेक वेळा अशा सुविधांच्या अभावी शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागते. कृषी विभागाकडे अशा प्रकारच्या पॅकहाऊससारख्या सुविधांसाठी अनुदान देण्याची सोय असते. मात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेणे गरजेचे असते. विदर्भातील एका शेतकऱ्याने ही गरज ओळखून आपल्या शेतात पॅकहाऊस उभारले आहे. 

सुभाषचंद्र आचलिया असे त्यांचे नाव आहे. ते यवतमाळ येथील एका कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आहेत. त्यांची सुमारे दहा एकर शेती आहे. भविष्यकाळातील शेतीची गरज ओळखून त्यांनी तसे तंत्रज्ञान आपल्या शेतात राबविण्यास सुरवात केली आहे. 

पॅकहाऊसचा लाभ घेणे गरजेचे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिक भाव मिळावा, शेतीमालाची प्रतवारी कायम ठेवून शेतातच मालाची साफ-सफाई करून त्याचे पॅकिंग करता यावे यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत पॅक हाऊसची निर्मिती करणे प्रामुख्याने सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांना शक्‍य होणार आहे. आचलिया यांनी याच अभियानांतर्गत अनुदानातून पॅकहाऊसची निर्मिती केली आहे. त्यामुळे प्रतवारी कायम ठेवून योग्य भावात माल विकण्याचा लाभ त्यांना मिळणार आहे. यवतमाळ तालुक्‍यात सिंचनाच्या सुविधा वाढल्या आहेत. बेंबळा प्रकल्प, डेहणी उपसा सिंचन, हातगाव वर्धा बॅरेज उपसा सिंचन, खर्डा डॅम या प्रकल्पांसह पंतप्रधान पॅकेजअंतर्गत झालेल्या विहिरीमुळे सिंचन क्षमतेत वाढ होणार आहे. सिंचन सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विविध पिके शेतकऱ्यांना घेणे शक्‍य होणार आहे. अशातच शासनाकडून पन्नास टक्के अनुदानावर आधारित मिळत असलेल्या पॅकहाऊसमुळे शेतीमालाची प्रतवारी टिकवून ठेवण्यास मदत मिळणार आहे. 

यवतमाळ-धामणगाव या मार्गालगत अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या सौ. मीनाक्षी संदीपकुमार आचलिया यांच्या शेतात या पॅकहाऊसची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे 612 चौरस फुटांवरील हा प्रकल्प आहे. यंदाच्या मार्चमध्ये तो उभारण्यात आला. त्यासाठी सुमारे पावणेचार लाख रुपये खर्च आला. कृषी विभागाकडून त्यांना तीन लाख रुपयांची मर्यादा होती. अनुदानापोटी ग्राह्य खर्चाचे पन्नास टक्के अनुदान म्हणजेच दीड लाख रुपये आचलिया यांच्या कर्जखात्यात जमा झाले आहेत. या पॅकहाऊसमुळे उत्पादित मालाची शेतावरच साफ-सफाई प्रतवारी व आवश्‍यक वजनाचे वा आकाराचे पॅकिंग करून तात्पुरती साठवणूक करण्यास मदत होणार आहे. फळे, फुले, भाजीपाला यांसारख्या नाशवंत मालाचे आयुष्य व दर्जा वाढविणे यासाठी उपयोगी पडणार आहे. कच्च्या मालावर प्राथमिक प्रक्रिया करून गुणात्मक वाढ करण्यास उपयोगी, मध्यस्थांची संख्या कमी करून प्रत्यक्ष उत्पादकाला वाजवी भाव मिळवून देणे व ग्राहकांना योग्य दरात माल उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. 

फळ पिकांसाठी किमान 30-50 मेट्रिक टन प्रति वर्ष क्षमतेचे हे पॅकहाऊस उभारण्यात आले आहे. पॅकहाऊसमध्ये 20 x 20 फुटांचा मोठा हॉल आहे. 10 x 10 च्या दोन खोल्या असून त्यातील एक स्टोअर तर एक कार्यालयासाठी आहे. फळ किंवा भाजीपाला पिकाच्या आवश्‍यकतेप्रमाणे स्वच्छता, प्रतवारी, काढणीपश्‍चात पॅकिंग, सीलिंग, माल साठवणूक सुविधा, मोजमापे व हाताळणी यंत्रणा येथे उपलब्ध आहे. काढणीपश्‍चात व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्‍यक उपाययोजना, शून्य ऊर्जाधारित शीतकक्ष, पाण्याची सुविधा, टाकाऊ पदार्थाचा निचरा यांचा समावेश करण्यात आला आहे. फुलपिकांसाठीही हे पॅकहाउस उपयोगी पडणार आहे. 

विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बॅंकेच्या बाभूळगाव शाखेचे व्यवस्थापक नरेंद्र खत्री व तालुका कृषी अधिकारी सुरेश काळे यांच्या पुढाकाराने आचलिया यांना बॅंकेमार्फत तारण कर्ज देण्यात आले आहे. हे पॅकहाऊस सुमारे 40 दिवसांत उभारण्यात आले. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत दोन वेळा पाहणी करून पॅकहाऊसचे अनुदान खात्यात जमा झाल्याची माहिती लाभार्थी शेतकऱ्यांनी दिली. पॅकहाऊस भविष्यात उपयोगी पडणार असून विदर्भातील सिंचन सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ जरूर घ्यायला पाहिजे, असे मत सुभाषचंद्र आचालिया यांनी व्यक्त केले. 

आचलिया यांनी आपल्या दहा एकर क्षेत्रात पावणेदोन एकर क्षेत्रात कपाशी घेतली आहे. तर येत्या हंगामात दीड एकर क्षेत्रात ग्रॅंड नाईन केळी, एक एकर शेतात मिरची, अडीच एकर क्षेत्रात गवारगमसाठी गवार अशी पिके घेण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. तर 10 गुंठे क्षेत्रावर शेडनेटमध्ये काकडी, ढोबळी मिरची, कारले अशा पिकांचे नियोजन त्यांनी केले आहे. आचलिया म्हणाले, की यवतमाळ तसेच नागपूर बाजारपेठ आम्हाला जवळच्या आहेत. तेथे मालाची विक्री करण्याचे नियोजन आहे. पॅकहाऊस तर बांधले आहे. त्यादृष्टीने विविध पिके घेण्याचे नियोजन आहे. पॅकहाऊस उभारताना शासकीय निकष पाळले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनाही जर आपल्या मालासाठी त्याचा वापर करायचा असला तरी या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. सद्यःस्थितीत मी कांद्याची साठवणूक केलेली आहे. त्याचा फायदा मला होत आहे. सध्याच्या काळात शेतीत सुधारित तंत्राचा वापर करणे गरजेचे झाले आहे. त्या दृष्टीने शेतात बदल करीत असल्याचे आचलिया यांनी सांगितले. 
संपर्क - सुभाषचंद्र आचलिया, 9420122047 

शासनाकडून पन्नास टक्के अनुदानावर आधारित पॅकहाऊस संकलन व साठवणूक केंद्र हा फळबागांसाठी उपयुक्त ठरणारा प्रकल्प आहे. उत्पादित फळ व फुलपिकांची स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग आदी गोष्टींमुळे भाव जास्त मिळणार आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी पॅकहाऊसची निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी एक बाभूळगाव तालुक्‍यात आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊन पॅकहाऊसची उभारणी करावी.