Wednesday, July 18, 2012

"लिची'च्या शेतीने वाढवली आर्थिक गोडी

ठाणे जिल्ह्यात डहाणू तालुक्‍यातील बोर्डी येथील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी सतीश महादेव म्हात्रे यांनी कुशल मार्गदर्शन व शास्त्रीय सल्ल्याच्या साह्याने बोर्डीसारख्या ठिकाणी लिची या फळाची लागवड यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना 2009 चा "कै. वसंतराव नाईक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विशिष्ट हवामानाची अपेक्षा लिची फळपिकाला असल्याने त्याची लागवड फारच कमी भागात झालेली दिसते. पारंपरिक क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी लिची शेतीचे खूप कमी प्रयत्न झाले आहेत. लिची उत्पादकांमध्ये जागरूकता, यथायोग्य माहिती व प्रभावी आणि पद्धतशीर प्रयत्न झाल्यास राज्यात या पिकाचा चांगला विकास होईल, अशी आशा आहे. 

प्रत्येक शेतकऱ्याचा विविध प्रकारची यशस्वी शेती करण्याकडे कल असतो. ज्याद्वारे तो विविध प्रयोग करतो. यातूनच तो नवीन क्षेत्रात प्रवेश करतो. अशाच पद्धतीने ज्या भागात चिकू, केळी, नारळ व आंबे यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, तेथे लिची फळाचे उत्पादन घेण्याची प्रेरणा म्हात्रे यांना मिळाली. सुरवातीला त्यांनी एका पारशी शेतकऱ्याकडून लिचीची 20 कलमे घेऊन आपल्या 20 गुंठे जमिनीत लावली. काळानुरूप त्यांनी तीन भागांमध्ये ही संख्या 100 कलमांपर्यंत म्हणजे सुमारे एक हेक्‍टरपर्यंत वाढविली. त्यातील सुमारे 70 झाडे उत्पादनक्षम आहेत. म्हात्रे यांनी मोठ्या धाडसाने रुजवलेली लिचीची शेती आता चांगलीच वाढली आहे. त्यामध्ये परिसरासाठी म्हात्रे यांचे कार्य पायोनिअर म्हणावे लागेल. 

यशस्वी प्रयोगासाठी चिकाटी 
लिची शेतीचा म्हात्रे यांचा सुरवातीचा अनुभव असमाधानकारक होता. तरीही चांगले यश मिळवायचे या हेतूने त्यांनी प्रयोग सुरूच ठेवला. फळे यायला सुरवात झाली तरी काही कारणांमुळे उत्पादनाच्या समस्या सुरूच राहिल्या. यामध्ये पालवीची वाढ न होणे, मोहोर व फळधारणा न होणे, कमी फळे लागणे, कीड व वटवाघळे यांच्या त्रासामुळे फळे न टिकणे, कमी दर्जाची फळे व त्यामुळे कमी नफा यासारख्या समस्यांशी म्हात्रे यांना सामना करावा लागला. मात्र, निराश न होता त्यांनी सन 2001 मध्ये मोठ्या प्रमाणात लिचीचे उत्पादन घेतल्या जाणाऱ्या बिहार राज्यातील काही भागांना भेट दिली. त्यातील मुजफ्फरमध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांकडील लिची पिकाचे सूक्ष्म निरीक्षण केले. अशाच भेटीमध्ये त्यांना या लिची उत्पादकांनी मुजफ्फर येथील राष्ट्रीय संशोधन केंद्र (लिची) विभागातील शास्त्रज्ञ डॉ. राजेश कुमार यांना भेटण्याचा सल्ला दिला. स्थानिक शेतकऱ्यांना दर्जेदार फलोत्पादनासाठी ते मार्गदर्शन करीत होते. त्यानुसार म्हात्रे यांनी डॉ. राजेशकुमार यांच्याशी संपर्क साधून विविध समस्यांवर सखोल चर्चा केली. नियोजनात्मक कार्य करण्याचा आत्मविश्‍वास त्यांना तिथे मिळाला. त्यांच्या सल्ल्यानुसार म्हात्रे यांनी आपल्या बागेत लिचीची सुधारित पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. जी जमीन फक्त चिकू बागायतीसाठीच प्रसिद्ध होती, तेथे म्हात्रे यांनी फुलवलेली लिचीची बाग परिसरातील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. लिचीच्या यशस्वी उत्पादनातून म्हात्रे यांना समाधान मिळालेच, शिवाय त्यांच्या या प्रयोगातून अन्य फलोत्पादकांनाही प्रेरणा मिळाली. 

लिची पिकाचे म्हात्रे यांचे अर्थशास्त्र 
म्हात्रे सुमारे 30 वर्षांपासून लिचीचा प्रयोग राबवत आहेत. प्रति झाड सुमारे 100 किलोपर्यंत उत्पादन मिळते. एकूण क्षेत्रातून त्यांना सहा टनांपर्यंत उत्पादन मिळते. स्थानिक बाजारपेठेत किलोला 150 रुपये दराने आपल्या लिचीची विक्री म्हात्रे करतात. मुंबई, अहमदाबादलाही ते शंभर रुपये दराने लिचीची विक्री करतात. साधारण एकरी तीन लाख रुपये उत्पन्नातून एक लाख रुपये खर्च वजा जाता दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती लागू शकते. 
साधारण 20 ग्रॅमचे एक फळ असते. दीडशे किलोच्या पेपर बॉक्‍समध्ये पॅकिंग करून माल पाठवला जातो. 
तोडणीनंतर त्वरित ताजा माल बाजारपेठेत पाठवला जातो. तोडलेली लिची फ्रीजमध्ये सुमारे आठवडाभर राहू शकते. 

लिची फळाविषयी म्हात्रे यांचे अनुभव 
म्हात्रे लिची फळाबाबत आपले अनुभव सांगताना म्हणाले, की जून किंवा सप्टेंबर - ऑक्‍टोबरच्या दरम्यान या पिकाची लागवड केली जाते. सुमारे सहा - सात वर्षांनी उत्पादनाला सुरवात होते. जानेवारीत मोहोर अवस्था सुरू होते, दीड महिना ती चालते. मेच्या मध्यावर लिचीची काढणी सुरू होते, ती सुमारे दहा दिवस चालते. 
एका घडाला 10, 20 ते 25 पर्यंत फळांचा घोस असतो. या काळात कीडनाशक फवारून चालत नाही. 
हे फळ अत्यंत चवदार, थोडे आंबट-गोड असते. एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा खाण्याची इच्छा होते. फळधारणेच्या काळात थंडी भरपूर लागते. किमान 12 ते 14 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता असते. मात्र, चार अंश से.पेक्षा कमी तापमान पिकाला मानवत नाही. पिकाला सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचीही गरज लागते. माती परीक्षणानुसार त्याचे नियोजन करावे लागते. जानेवारी - फेब्रुवारीच्या दरम्यान पाण्याची गरज अधिक भासते. म्हात्रे यांनी बागेत ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. डॉ. राजेश कुमार यांच्या सल्ल्याने म्हात्रे यांनी पाणी देण्याची पद्धत व पोषक घटकांचा पुरवठा यांचा विशेष अभ्यास करून लागवड पद्धतीत सुधारणा केली. झाडांचे वय, वाढ, स्थिती, फळधारणेचा काळ आदींचा विचार करून खते व पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केले. फळधारणेच्या काळात शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने विशेष काळजी घेतली. छाटणीचे तंत्र त्यांना चांगलेच उपयोगी पडले. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या लिची बागेला भेट दिली आहे. 

अन्य शेतकऱ्यांनी घेतली प्रेरणा 
ध्येयावर टिकून राहण्याच्या म्हात्रे यांच्या चिकाटीमुळे लिची लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्यास मदत मिळाली आहे. ते या पिकाचा प्रचार सर्वत्र करतात. एक प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतानाच अरब व युरोपीय देशांमध्ये लिचीची निर्यात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चालू हंगामात त्यांच्या बागेला मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे यांनी भेट दिली आहे. लिची फळांवर प्रक्रिया करून त्याची साठवणूक क्षमता वाढवता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे म्हात्रे यांचा या पिकाबाबत आत्मविश्‍वास वाढला आहे. 
डहाणू तालुक्‍यात आजच्या तारखेला जेमतेम 25 ते 30 हेक्‍टर जमीन क्षेत्रावर व हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्‍याच शेतकऱ्यांकडे लिचीची लागवड आहे. लिचीपासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता शेतकऱ्यांनी या पिकाकडे अभ्यास करून वळले पाहिजे, असे म्हात्रे सांगतात. त्यांच्याकडून बोर्डीसहित पालघर, वाडा आदी भागांतील शेतकऱ्यांनी लिचीची कलमे नेऊन त्यांची लागवड केली आहे. बोर्डी गावात अनेक शेतकरी थोड्यातरी क्षेत्रात लिचीचे पीक घेतात. अनेक शेतकरी या पिकाची स्वतंत्र बाग न करता चिकूच्या बागेत काही झाडे लावण्याचा प्रयोग करतात. या गावातून हंगामात एक ट्रक भरून लिची सुरतसारख्या ठिकाणी जाते.