अलीकडील वर्षात तेलकट डाग किंवा मर रोग अशा कारणांमुळे महाराष्ट्रातील डाळिंब बागांचे क्षेत्र कमी होत चालले आहेत. बाजारात मालाची समाधानकारक आवक नसल्याने दर चांगले आहेत. काही शेतकरी या पिकातील आव्हाने पेलीत ही शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतीत काम करण्याची तयारी आणि सातत्यपूर्ण कष्ट घेतले तर एक दिवस फळ नक्कीच पदरात पडते या गोष्टीवर त्यांचा विश्वास आहे. चिखली तालुक्यातील वाघापूर हे त्यांचे गाव. आज जिल्ह्यात नियोजनबद्धरीत्या डाळिंबाची शेती करणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख होऊ लागली आहे. विलास श्रीकृष्ण ठेंग आपले बंधू अंकुश यांच्यासह 20 एकर शेती कसतात. वाघापूर शिवारात त्यांची तशी माळरानावरचीच शेती आहे.
नियोजनात झाडाच्या अवतीभवतीचे पूर्ण बेड खोदून बाजूला केले. त्यानंतर प्रत्येक झाडास 50 किलो शेणखत, 20 किलो कोंबडी खत, एक किलो निंबोळी पेंड, एक किलो डीएपी आदींचा वापर केला. सिलिकाचाही वापर केला. त्याचबरोबर मुख्य अन्नद्रव्यांसोबत गंधक, झिंक, फेरस, बोरॉन, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज यांचा वापरही गरजेनुसार केला. 13-0-45, 0-52-34, 12-61-0 आदी विद्राव्य खते पिकाला दिली.
अंकुश म्हणाले, की पूर्वी डाळिंब पिकातील तांत्रिक माहिती फार नव्हती. प्रयोगशील शेतकऱ्यांकडून ती शिकून घेतली. सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्याचे महत्त्व, त्यांच्या झाडांवर दिसणाऱ्या कमतरता माहीत नव्हत्या.
प्रगतिशील शेतकऱ्यांकडून त्या शिकून घेतल्या. फुलकिडींचा प्रादुर्भावही कसा असतो, त्याचे नियंत्रण कसे करायचे याची माहिती घेतली. निंबोळी पावडरीचा वापरही वाढवला आहे. आटपाडी येथील सूर्यवंशी यांनी आमच्या भागातील एका शेतकऱ्याची बाग कसण्यासाठी घेतली आहे. आठवड्यातून एक दिवस त्यांचीही बागेला चक्कर व्हायची. आमच्या भागात तेलकट डाग किंवा मर आदींचा प्रादुर्भाव आढळला नाही. मात्र वर्षात अन्य किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी सुमारे 12 फवारण्या घेतल्या. सटाणा (जि.नाशिक) भागातील शेतकऱ्यांचा डाळिंब शेतीतील अनुभव चांगला असल्याने त्यांच्याकडूनही काही गोष्टी आत्मसात केल्या. छाटणी तंत्रज्ञान त्यातून समजले. हस्त बहर घेण्यासाठी प्रति झाडास अंदाजे पाचशे रुपयांचा खर्च केला. यात खते, कीडनाशके, मजुरी आदींचा समावेश होता. बागेतून एकरी 15 टनांपर्यंत उत्पादन मिळाले. या मालाला किमान 40 रुपयांपासून कमाल 84 रुपयांपर्यंत दर मिळाला. एकूण क्षेत्रातून सुमारे 19 लाख रुपये उत्पन्न मिळाले. उत्पादन खर्च साडेपाच लाख रुपये आला. मालाची विक्री स्थानिक बाजारपेठ, अकोला, पुणे मार्केट आदी ठिकाणी केली. सांगोल्याच्या व्यापाऱ्यांकडूनही माल खरेदी करण्यात आला. स्थानिक बाजारपेठेतच सर्वाधिक म्हणजे 84 रुपये दर मिळाला होता.
अंकुश म्हणाले, की आमच्या भागात मजुरीची समस्या आहे. मात्र त्यांना जास्त पैसे देऊन शेतीची कामे करवून घेतली जातात. तसेच आम्ही दोन्ही बंधू व आमचे सारे कुटुंबीय शेतीत राबत असल्याने मजुरांवरील अवलंबत्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण बागेला ठिबक सिंचनाची सोय केली असून विहीर व बोअर हे पाण्याचे स्रोत आहेत. अन्य पारंपरिक पिकांमधून जेथे 25 ते 30 हजार रुपयांचे उत्पन्नही मिळत नाही तेथे त्या तुलनेत डाळिंब पिकातून काही लाखांचे उत्पन्न मिळू लागले आहे ही समाधानाची बाब आहे. या पिकात अधिक ज्ञान मिळवून सुधारित तंत्र वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपर्क- अंकुश श्रीकृष्ण ठेंग- 9011044842
रा. वाघापूर, ता. चिखली, जि. बुलडाणा