Wednesday, July 18, 2012

Agriplaza - Agriculture Information: माळरानावरील डाळिंब शेतीतून उंचावली आर्थिक स्थिती

Agriplaza - Agriculture Information: माळरानावरील डाळिंब शेतीतून उंचावली आर्थिक स्थिती:   पारंपरिक शेतीतून फार समाधानकारक उत्पन्न हाती लागत नाही. नगदी आणि त्यातही फळपिकांचा पर्याय निवडला तर चार पैसे हाती जास्त पडतील ही मानसिकता...

खडतर प्रयत्नांमुळेच दुष्काळातही फुलवली केळी

कोरेगावच्या दक्षिण भागात भाडळे खोऱ्यातील कवडेवाडी हे छोटेसे गाव. गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची फार मोठी बिकट समस्या उद्‌भवते. तालुक्‍यात भाडळे खोऱ्यातील गावे कायम दुष्काळी म्हणून संबोधली जातात. उन्हाळ्यात जनावरांना प्यायला पाणी मिळत नाही तेथे शेतीला पाणी मिळणे खूप कठीण. त्यामुळे दरवर्षी या भागात शेतातील उभी पिके उन्हाळ्यात करपून जातात. कवडेवाडीत नीरा उजवा कालव्यावरील बंधारा आहे. त्यातील पाण्याचा शेतीला फायदा होतो. तोही बंधारा ऐन उन्हाळ्यात कोरडा पडत असल्याने शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी कसरती कराव्या लागतात. 

जगदाळे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. अल्पशिक्षित असूनही त्यांनी प्रचंड इच्छाशक्ती, अभ्यास व सततच्या धडपडीतून शेतीत आर्थिक स्थैर्य मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. खडकाळ व माळरान स्वरूपाची त्यांची सहा एकर शेती आहे. पाण्याच्या उपलब्धतेबरोबर शेतीतून नफा कमावण्यासाठी केलेल्या धडपडीबाबत सांगताना ते म्हणाले, की साधारण 1997-98 पासून पाणी समस्येशी दोन हात करत पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतीला हक्काचे पाणी असावे या हेतूने तब्बल अकरा विंधन विहिरी खोदल्या. पाणी मिळेल या आशेने दरवर्षी विहीर खोदत गेलो. मात्र अकरावेळा प्रयत्न वाया गेले. उपलब्ध विहीर व एका विंधन विहिरीतील पाणी या साठ्यावर पीकनियोजन केले. पाऊसमान व पाण्याच्या उपलब्धतेनुसार दरवर्षी चार ते पाच एकरांवर पीकनियोजन केले जाते. टोमॅटो, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, वांगी, काकडी, भोपळा या भाजीपाला पिकांचे आलटून- पालटून उत्पादन घेतले जाते. त्याबरोबर ऊस, आले व पपई ही दीर्घ मुदतीची पिकेही घेतली जातात. पिके घेताना पाण्याच्या समस्येशी तोंड द्यावे लागते. काही वेळेला पाणी कमी पडल्यानंतर उत्पादनात घट येते. परंतु आलेल्या संकटाला हिमतीने तोंड देण्याची सवय अंगवळणी पडली आहे. यातून होणारे नुकसान पिकाच्या अधिकाधिक उत्पादनातून भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. 

दहा वर्षांपूर्वी उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर व्हावा या हेतूने संपूर्ण शेतावर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब सुरू केला. पाण्याचा पुरेसा वापर झाल्याने पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत झाली. नफा वाढला. पर्यायाने दरवर्षी भाजीपाला पिकांतून प्रति एकर सरासरी एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळत राहिले. उसाची एकरी 60 ते 70 टनांपर्यंत उत्पादकता वाढली. सतत वेगवेगळे प्रयोग करण्याची तयारी असल्याने दोन वर्षांपूर्वी केळी पिकाकडे वळलो. सुमारे 50 गुंठ्यांवर केळीचे पीक घेण्याचे निश्‍चित केले. त्याआधी उसाचे पाचट कुजवलेल्या शेतात टोमॅटोचे पीक घेतले. टोमॅटो पिकावर अति तापमानाचा परिणाम झाला. तरीही योग्य व्यवस्थापनामुळे सरासरीपेक्षा जादा उत्पादन मिळाले. दर जादा मिळाल्याने तोटा झाला नाही. उत्पादित तीन टन मालास प्रति किलो 27 ते 28 रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता टोमॅटोच्या पिकातून सुमारे एक लाख 25 हजारांचे निव्वळ उत्पन्न हाती आले. 

टोमॅटोची झाडे शेतात तशीच ठेवून जुलै 2010 मध्ये उतिसंवर्धित ग्रॅंडनाईन जातीच्या केळीची एक हजार 850 रोपांची लागवड केली. या पिकातील अनुभव नवा असल्याने कोरेगाव येथील जयवंत जगदाळे यांचे मार्गदर्शन घेतले. केळीची रोपे लावल्यानंतर एक महिन्याने टोमॅटोची रोपे कापून सरीच्या मधील भागात टाकली. रोपांचे रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी कार्बेन्डाझिम, मॅन्कोझेब आदी बुरशीनाशकांचा वापर केला. टोमॅटोसाठी जोडलेल्या ठिबक सिंचनाच्या पाइप केळीच्या रोपांच्या बुंध्याजवळ घेऊन पाण्याचे व्यवस्थापन सुरू केले. जमिनीतील वाफशानुसार दररोज दोन तास पाणी सुरू ठेवले. वाढीच्या अवस्थेनुसार जमिनीतून खते देण्याबरोबरच 13ः0ः45, 12ः61ः0, 0ः0ः50, 0ः52ः34 ही विद्राव्य खते ठिबकद्‌वारे दिली. सूक्ष्म अन्नद्रव्येही दिली. लगडलेल्या घडांचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी प्रत्येक झाडाकडे लक्ष पुरवले. पॉवरटिलरच्या साहाय्याने आंतरमशागती केल्या. अकराव्या महिन्यात घड काढणी सुरू केली. तेथून पुढे ऑक्‍टोबरपर्यंतच्या तीन टप्प्यांतील काढणीपासून 72 टन माल निघाला. त्यास किलोला किमान सहा रुपये 75 पैशापासून कमाल आठ रुपये 75 पैशापर्यंत दर मिळाला. त्या दरम्यान रमझान ईदचा सण आल्याने सर्वाधिक दर मिळाला. उत्पादित मालाची जागेवर भावाची बोली करून व्यापाऱ्यांना विक्री केली. वाहतूक, तोडणीचा खर्च व्यापाऱ्यांकडे सोपवला. विक्रीपश्‍चात पाच लाख 40 रुपयांचे उत्पन्न मिळाले. रोपे, खते व कीडनाशकांसाठी सुमारे एक लाख रुपये खर्च आला. ठिबक सिंचन आधीच्या पिकातील असल्याने त्यासाठीचा खर्च घसारा पद्धतीने पकडल्यास तो फारसा नाही. खर्च वजा जाता चार लाख 40 हजारांचे निव्वळ उत्पन्न शिल्लक राहिले. लागवडीवेळेसच मजुरांचा अधिक वापर झाला. अन्यथा, बहुतांश व्यवस्थापन पत्नी सौ. शोभा यांच्या बरोबरीने सांभाळल्याने मजुरीच्या खर्चात मोठी बचत करता आली. 

लावणीतील केळीची काढणी पूर्ण झाल्यानंतर पूर्ववतपणे खोडव्यासाठी राखलेल्या सक्षम पिल्लांना खत व्यवस्थापन सुरू केले. सुरवातीला शेणखत व पोल्ट्री खताचा प्रति तीन ट्रेलर या प्रमाणात वापर केला. खोडव्यातील झाडांना फेब्रुवारीपर्यंत खते दिली. मार्च महिन्यात पाणी कमी झाल्यानंतर विद्राव्य खतांच्या मात्रा कमी केल्या. खोडव्यातील उत्पादन सुरू झाले आहे. प्रति घड सरासरी 28 ते 32 किलो वजन मिळाले आहे. आतापर्यंत 13 टन माल निघाला आहे. उत्पादित मालाची तीन टप्प्यांत काढणी केली. यंदा उन्हाळ्यातील तीव्र तापमानामुळे 30 टक्के बाग वाया गेली आहे. आतापर्यंत उत्पादित झालेल्या मालास प्रति किलो सरासरी दहा रुपयांप्रमाणे दर मिळाला आहे. टप्प्याटप्प्याने काढणी केल्याने एकसारखा दर मिळाला नाही. तरीही सरासरी प्रति किलो दहा रुपये दरानुसार एक लाख 25 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. खोडव्यासाठी 45 ते 50 हजार रुपये संपूर्ण खर्च आला आहे. अजूनही उर्वरित झाडांपासून 20 टन मालाचे उत्पादन अपेक्षित आहे. लागण व खोडव्यात कमी खर्चात अधिक उत्पादनाचे तंत्र गवसल्याने या पिकाचे निडवा व्यवस्थापन सुरू केले आहे. 
तात्याबा जगदाळे, 9422023342 


कवडेवाडी येथे दुष्काळी पट्ट्यात तात्याबा व सौ. शोभा जगदाळे यांनी केळीची शेती फुलवली आहे. 


झाडांचा पालापाचोळा बुंध्यालाच गाडला. व खतांचे सुयोग्य व्यवस्थापन केल्याने चांगले उत्पादन घेणे शक्‍य झाले. 


खोडवा पिकातील केळीचा घड.

माळरानावरील डाळिंब शेतीतून उंचावली आर्थिक स्थिती

 
पारंपरिक शेतीतून फार समाधानकारक उत्पन्न हाती लागत नाही. नगदी आणि त्यातही फळपिकांचा पर्याय निवडला तर चार पैसे हाती जास्त पडतील ही मानसिकता बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ठेवली. त्याप्रमाणे नियोजन केले. डाळिंब हे पीक आर्थिकदृष्टीने योग्य वाटून त्याची लागवड केली. आज या पिकातून चांगला आत्मविश्‍वास येऊ लागला आहे. 

अलीकडील वर्षात तेलकट डाग किंवा मर रोग अशा कारणांमुळे महाराष्ट्रातील डाळिंब बागांचे क्षेत्र कमी होत चालले आहेत. बाजारात मालाची समाधानकारक आवक नसल्याने दर चांगले आहेत. काही शेतकरी या पिकातील आव्हाने पेलीत ही शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतीत काम करण्याची तयारी आणि सातत्यपूर्ण कष्ट घेतले तर एक दिवस फळ नक्कीच पदरात पडते या गोष्टीवर त्यांचा विश्‍वास आहे. चिखली तालुक्‍यातील वाघापूर हे त्यांचे गाव. आज जिल्ह्यात नियोजनबद्धरीत्या डाळिंबाची शेती करणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख होऊ लागली आहे. विलास श्रीकृष्ण ठेंग आपले बंधू अंकुश यांच्यासह 20 एकर शेती कसतात. वाघापूर शिवारात त्यांची तशी माळरानावरचीच शेती आहे. 

या शेतीत ते 2005 पर्यंत पारंपरिक पिके घेत होते. त्यामध्ये सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद आदींचा समावेश आहे. अनेकदा नैसर्गिक आघात, कीड वा अन्य कारणांनी उत्पादन कमी व खर्च अधिक असे व्हायचे. यामुळे त्यांनी पुढे काही वर्ष या जमिनीचा नाद सोडून दिला. जमीन पडीक राहिली. सन 2005 मध्ये अंकुश अमडापूर येथे तलाठी म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी ठिकठिकाणी बहरलेल्या फळबागा पाहिल्या. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा केली. आपणही अशी शेती का करू शकत नाही असा प्रश्‍न त्यांच्या मनाला पडला. फळबागांचे प्रयोग पाहून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यातूनच वाघापूर येथील शेतात दोन एकरांवर द्राक्ष व तेवढ्याच क्षेत्रात डाळिंब लावले. ही लागवड अमडापूर येथील शेतकरी व चांधई येथील रतन कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. परंतु द्राक्षाने पाहिजे तितका चांगला अनुभव दिला नाही. द्राक्ष पिकात सतत नापिकी आल्याने नाइलाजाने बाग काढून टाकली. पुढे सर्व लक्ष डाळिंब बागेकडे केंद्रित केले. द्राक्ष पीक काढल्याने रिकाम्या झालेल्या जागेतही 2009 मध्ये नवीन डाळिंब लावले. येथून खऱ्या अर्थाने डाळिंबाचे नियोजन करण्यास त्यांनी सुरवात केली. ठेंग यांची एकूण पाच एकर क्षेत्रात भगवा वाणाच्या डाळिंबाची बाग आहे. त्यातील दोन एकर क्षेत्र उत्पादनक्षम असून उर्वरित तीन एकर बाग नवी आहे. रोपे परिसरातील जाणकार शेतकऱ्यांच्या शेतातून आणली आहेत. सुरवातीच्या काळात डाळिंबाचे समाधानकारक उत्पादन मिळाले नाही. 2010 मध्ये उत्पादन वाढवताना दोन एकर क्षेत्रात त्यांना केवळ चार टन उत्पादन मिळाले. सुमारे 50 हजार रुपयांचा खर्च वजा जाता दीड लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ यांचा अभ्यास करताना अद्याप चांगल्या उत्पादनवाढीची अपेक्षा होती. पीक व्यवस्थापनात आपले काय चुकते आहे याबाबत ठेंग यांनी आत्मपरीक्षण केले. पुन्हा नव्या उमेदीने या फळबागेकडे लक्ष दिले. राज्यात बारामती, सांगोला परिसरातील डाळिंब बागांना भेटी दिल्या. तेथील शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले. त्यांनी केलेल्या सूचनांचे पालन केले. याच काळात खानजोडवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश भानुदास सूर्यवंशी यांची भेट झाली. त्यांनीही सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बागेची आंतरमशागत करून जानेवारी 2011 मध्ये पानगळ करून पुढील नियोजनाला सुरवात केली. गरजेनुसार बागेला कीडनाशकांच्या फवारण्या केल्या. खतांची मात्रा संतुलित प्रमाणात दिली. दोन एकर बागेतून सुमारे 20 टन उत्पादन मिळाले. हा माल जागेवरच 50 रुपये किलो दराने विकला. त्यापासून दोन एकरांत 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या पिकातील आत्मविश्‍वास हळूहळू वाढू लागला. सुधारित तंत्राने ही शेती कशी करायची त्याची माहिती होऊ लागली. पुढील हस्त बहर घेण्यासाठी बागेची आंतरमशागत केली. सुमारे 15 सप्टेंबरला छाटणी केली. 

नियोजनात झाडाच्या अवतीभवतीचे पूर्ण बेड खोदून बाजूला केले. त्यानंतर प्रत्येक झाडास 50 किलो शेणखत, 20 किलो कोंबडी खत, एक किलो निंबोळी पेंड, एक किलो डीएपी आदींचा वापर केला. सिलिकाचाही वापर केला. त्याचबरोबर मुख्य अन्नद्रव्यांसोबत गंधक, झिंक, फेरस, बोरॉन, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज यांचा वापरही गरजेनुसार केला. 13-0-45, 0-52-34, 12-61-0 आदी विद्राव्य खते पिकाला दिली. 

अंकुश म्हणाले, की पूर्वी डाळिंब पिकातील तांत्रिक माहिती फार नव्हती. प्रयोगशील शेतकऱ्यांकडून ती शिकून घेतली. सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्याचे महत्त्व, त्यांच्या झाडांवर दिसणाऱ्या कमतरता माहीत नव्हत्या. 

प्रगतिशील शेतकऱ्यांकडून त्या शिकून घेतल्या. फुलकिडींचा प्रादुर्भावही कसा असतो, त्याचे नियंत्रण कसे करायचे याची माहिती घेतली. निंबोळी पावडरीचा वापरही वाढवला आहे. आटपाडी येथील सूर्यवंशी यांनी आमच्या भागातील एका शेतकऱ्याची बाग कसण्यासाठी घेतली आहे. आठवड्यातून एक दिवस त्यांचीही बागेला चक्कर व्हायची. आमच्या भागात तेलकट डाग किंवा मर आदींचा प्रादुर्भाव आढळला नाही. मात्र वर्षात अन्य किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी सुमारे 12 फवारण्या घेतल्या. सटाणा (जि.नाशिक) भागातील शेतकऱ्यांचा डाळिंब शेतीतील अनुभव चांगला असल्याने त्यांच्याकडूनही काही गोष्टी आत्मसात केल्या. छाटणी तंत्रज्ञान त्यातून समजले. हस्त बहर घेण्यासाठी प्रति झाडास अंदाजे पाचशे रुपयांचा खर्च केला. यात खते, कीडनाशके, मजुरी आदींचा समावेश होता. बागेतून एकरी 15 टनांपर्यंत उत्पादन मिळाले. या मालाला किमान 40 रुपयांपासून कमाल 84 रुपयांपर्यंत दर मिळाला. एकूण क्षेत्रातून सुमारे 19 लाख रुपये उत्पन्न मिळाले. उत्पादन खर्च साडेपाच लाख रुपये आला. मालाची विक्री स्थानिक बाजारपेठ, अकोला, पुणे मार्केट आदी ठिकाणी केली. सांगोल्याच्या व्यापाऱ्यांकडूनही माल खरेदी करण्यात आला. स्थानिक बाजारपेठेतच सर्वाधिक म्हणजे 84 रुपये दर मिळाला होता. 

अंकुश म्हणाले, की आमच्या भागात मजुरीची समस्या आहे. मात्र त्यांना जास्त पैसे देऊन शेतीची कामे करवून घेतली जातात. तसेच आम्ही दोन्ही बंधू व आमचे सारे कुटुंबीय शेतीत राबत असल्याने मजुरांवरील अवलंबत्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण बागेला ठिबक सिंचनाची सोय केली असून विहीर व बोअर हे पाण्याचे स्रोत आहेत. अन्य पारंपरिक पिकांमधून जेथे 25 ते 30 हजार रुपयांचे उत्पन्नही मिळत नाही तेथे त्या तुलनेत डाळिंब पिकातून काही लाखांचे उत्पन्न मिळू लागले आहे ही समाधानाची बाब आहे. या पिकात अधिक ज्ञान मिळवून सुधारित तंत्र वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपर्क- अंकुश श्रीकृष्ण ठेंग- 9011044842 
रा. वाघापूर, ता. चिखली, जि. बुलडाणा

शेतकऱ्यांनो, कृषी उद्योजव व्हा..

मानसिकता बदला ! 
सी. ई. पोतनीस, 
व्यवस्थापकीय संचालक, निटॉर 
उद्योजक होण्यासाठी बिझनेस, उद्योग रक्तात असावा लागतो, हे चुकीचे आहे. पिढ्यान्‌ पिढ्यांच्या उद्योगांपेक्षाही अनेक नवीन उद्योजकांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. उद्योजकता ही मानसिकता आहे. त्यामुळे उद्योजक होण्यासाठी सर्वप्रथम आपण आपली मानसिकता तशी घडवली पाहिजे. 

सकारात्मक व नकारात्मक अशा दोन प्रकारच्या धारणा असतात. आपल्यावर लहानपणापासून नकारात्मक धारणेचा पगडा असतो. आपल्याला लहानपणापासून 18 वर्षांपर्यंत एक लाख 48 हजार वेळा "तुला हे जमणार नाही', असे ऐकवले जाते. नकारात्मकतेसह सुरवात ही उद्योजकतेसाठी धोक्‍याची घंटा असते. उद्योग माझ्यासाठी नाही, अशी धारणा असणारा कधीच उद्योजक होऊ शकणार नाही. धारणा असेल तसे विश्‍व घडते. म्हणून धारणा सकारात्मकच हवी. स्वतःवरील विश्‍वास हा व्यवसायाचा पाया असतो. बहुतेक तरुण मुलांची व्यवसायाची कल्पना फारच छोटी, त्रोटक असते. त्यात दूरदृष्टी नसते. स्वप्नं पाहायचीच तर ती मोठीच पाहिली पाहिजेत. कारण प्रेरणा ही फक्त मोठ्या गोष्टीतून येते. शाळा महाविद्यालय सोडले की आपण शिकणे थांबवतो. खरे तर तेथून पुढे शिकण्याची खरी सुरवात होते. प्रत्येक अनुभव स्वतः घेण्यापेक्षा इतरांच्या अनुभवातून शिकले तर वेगाने प्रगती करता येते. यासाठी पुस्तके, भाषणे, चर्चासत्रे अतिशय महत्त्वाची असतात. मी केव्हा शिकणार आणि केव्हा उद्योग करणार, अशी चिंता करण्याची गरज नाही. दररोज तासभर वेळ दिला तरी ते सर्व सहजसाध्य होऊ शकते. उद्योजकाकडे नेतृत्व अंगभूत असावे लागत नाही. महात्मा गांधी, बिल गेट्‌स, नारायणमूर्ती या प्रत्येकाने स्वतःतील न्यूनगंडावर मात करून नेतृत्व घडवले. आयुष्यात प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक करायला हवी. यासाठी जाणीवपूर्वक जगणे हा यशाचा पहिला मार्ग आहे. एकमेकांच्या सहयोगातून निर्माण केले तर अधिक लाभ मिळतो. कृषी क्षेत्रात यापुढील काळात सहयोगातून क्रांती होणार आहे. त्यामुळे ही वृत्ती निर्माण करावी व त्यादृष्टीने त्याकडे बघावे. आपण बुध्यांकाला अवास्तव महत्त्व देतो. उद्योगासाठी तुमचा बुध्यांक नाही तर भावनांक खूप चांगला असावा लागतो. तुमची स्वतःबरोबर व दुसऱ्याबरोबर वागण्याची क्षमता तुमचे यश ठरवते. उद्योजकाच्या अंगी शिस्त हवी. त्याशिवाय कुठलाच उद्योग घडू शकत नाही. वेळ चुकली की सर्व चुकते. उद्योजकाचा एक पाय वर्तमानात व दुसरा भविष्यात असावा लागतो. मुळात उद्योगाचा हेतू उदात्त हवा. 

...असा करा प्रकल्प अहवाल
निशिकांत देशपांडे, 
बॅंकिंग तज्ज्ञ 
कृषी उद्योगासाठी कर्ज, गुंतवणूक, शासकीय अनुदाने, सवलती हवी असेल तर प्रकल्प अहवाल तयार करणे अत्यावश्‍यक असते. सुयोग्य प्रकल्प अहवाल हा उद्योजक, बॅंक, वित्तीय संस्था, शासनाची धोरणे, योजनांची उद्दिष्टे, तांत्रिक, आर्थिक बाजू, बाजारपेठ अभ्यास, सामाजिक फायदे या सर्वांचा एकत्रित विचार करून तयार होतो. तुम्ही प्रकल्प वेगळ्या पद्धतीने पाहिला, तुमचे सर्वोत्तम पाऊल टाकले तर बॅंक तुमच्या मागे येईल. प्रकल्पासाठी सल्लागार काळजीपूर्वक निवडावा. संबंधित सल्लागार बॅंकांच्या काळ्या यादीत किंवा गुप्त नकारात्मक यादीत नसल्याची खातरजमा करावी. उद्योग कसा अपेक्षित आहे, तुमची माहिती, शैक्षणिक व तांत्रिक पात्रता, अनुभव, आर्थिक गुंतवणूक, आर्थिक माहिती, क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट व कंपनी क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट याबाबत सविस्तर माहिती असावी. वीजपुरवठा, कच्चा माल व त्याची गुणवत्ता, सल्लागार या तांत्रिक बाबी, बाजारपेठेचा अभ्यास, विक्री कशी होणार, निर्यातीच्या संधी, विविध प्रमाणपत्रे, प्रकल्पाचा एकूण अपेक्षित खर्च व प्रस्तावित अंशदान, कर्ज उभारणी याचाही विचार करावा. मुलाखतीची चांगली तयारी करावी.कर्जाची दीर्घ मुदत व परतफेड सुरू होण्याआधी दिलेली मुदत लक्षात घेऊन तेवढ्या कालावधीचे संभाव्य ताळेबंद पत्रक तयार करावे. खेळते भांडवल कसे उभारणार, वीज, पाणी, पगार, वेष्टण, प्रसिद्धी, कर्जाच्या परतफेडीचे नियोजन काय आहे. विविध परवाने मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न व सद्य:स्थिती याची माहिती बॅंकेला द्यावी. तुमची क्षमता, प्रकल्पाची क्षमता, कोणते उत्पादन घेणार, किती, उत्पादन प्रक्रिया, आवश्‍यक यंत्रसामग्री व ती कोठून घ्यावी, तांत्रिक बाजू, व्यापारी दृष्टिकोन, आर्थिक बाजू, परवाने, अभिप्रेत व्यवस्थापन, लागू असलेले राज्य व केंद्राचे कायदे, मनुष्यबळ, कुशल, निमकुशल, विक्री व्यवस्थापन, प्रोत्साहने व अनुदाने, उपलब्ध व्यवसायाभिमुख सेवा लक्षात घेऊन प्रकल्प अहवाल तयार करावा. 

फायनान्स महत्त्वाचा... प्राजक्ता देव, 
अर्थ विषयक सल्लागार 
आर्थिक बाबींचा नीट अभ्यास करून व्यावहारिकपणे निर्णय घेतल्यास खूप फायदा होतो. व्यवसाय करताना नफा, तोटा, व्यवसायाची वाढ, उलाढाल, डिमांड, शासकीय धोरण, किंमत या गोष्टी माहिती हव्यात. प्रॉफिट व मार्जिनऐवजी किती पैसे गुंतवले व किती परतावा मिळाला, याकडे सर्वाधिक लक्ष हवे. परतावा पुरेसा नसेल तर तो व्यवसाय बंद करून दुसरा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. रोख उलाढाल वृत्तांत, नफा तोटा वृत्तांत व ताळेबंद तयार करणे व अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे असते. अनेकदा नफा कागदोपत्री असतो, पैसे हाती आलेले नसतात. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी "कॅश फ्लो' म्हणजेच तुमच्या हाती नक्की किती रक्कम राहते, हे महत्त्वाचे असते. कॅश फ्लो हा व्यवसायाच्या टिकाऊपणाचा निर्देशांक असतो. कॅश फ्लो व्यवस्थित नसल्याने 90 टक्के उद्योग बंद पडतात. उद्योजकाला स्वतःचा कॅश फ्लो मांडता आला पाहिजे. वैयक्तिक खर्च, स्थिरमत्ता संपादन केल्याने हाती पैसा राहत नाही. त्यामुळे कॅश फ्लोचे योग्य नियोजन करूनच खर्चाचे व गुंतवणुकीचे नियोजन केले पाहिजे. भांडवली जमेमुळे कॅश फ्लो वाढतो. कॅश फ्लो तयार करताना रोख उत्पन्न, देणेकऱ्यांकडून वसुली व व्याज व इतर उत्पन्न; कच्चा माल खरेदी, कामगार मजुरी, उत्पादन खर्च, परिवहन खर्च व मार्केटिंगचा खर्च, एकूण महसुली खर्च, निव्वळ रोख नफा, वजा होणारी स्थिर मालमत्ता प्राप्ती, भांडवली जमा व गुंतवणूक, निव्वळ भांडवली जावक, व्यवसायातील रोख मिळकत, मालकाने काढलेली रक्कम, वैयक्तिक खर्च, इत्यादींचा विचार करून निव्वळ शिल्लक रोख रक्कम म्हणजेच कॅश फ्लो आखता येतो. वैयक्तिक खर्च हा नेहमी रोख मिळकतीहून कमीच असला पाहिजे. व्यवसायाची ध्येय, ते कसे साध्य करता येईल याचा तर्क व मांडणी याचा विचार करून प्रकल्पाचा नियोजन आराखडा तयार करावा. आर्थिक, विपणन, व्यवस्थापन व कार्यांच्या नियोजनाचा त्यात समावेश असावा. 

निर्णय ठाम हवा
सत्यवान काशीद, संचालक, एशियन बायोटेक्‍नॉलॉजीस 
कृषी शिक्षण घेतल्यानंतर मी शासकीय नोकरीच्या मागे न लागता सात-आठ वर्षे विविध कृषी उद्योगांमध्ये राज्यभर कामाचा अनुभव घेतला. या अनुभवाच्या जोरावर उद्योगाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसतानाही स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. भांडवल काही नव्हते. विचार पक्का व निर्णयावर ठाम असल्यास उद्दिष्ट नक्कीच साध्य होते. तुम्ही जसा विचार कराल, जसे कर्म कराल तसे तुम्ही घडता. उद्योग सुरू करताना माझ्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी पहिल्या दोन- तीन महिन्यांत 200-300 वितरक नेमले. प्रत्येकाकडून 25 हजार रुपये अनामत रक्कम घेतली. यातून उद्योगासाठी मुख्य भांडवल उभे करून पुढील सर्व विकास, विस्तार केला. 2006 मध्ये नाशिकमध्ये शून्यातून सुरू केलेल्या माझ्या जैविक खते व औषधी निर्मितीचा उद्योगाची उलाढाल आता 25 कोटी रुपयांहून अधिक वाढली आहे. कुठलाही व्यवसाय करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वे केला पाहिजे. मार्केटमध्ये काय स्कोप आहे, ग्राहकांची गरज काय हे लक्षात घेतले तर जास्त फायदा होतो. उद्योग सुरू करण्याआधी बारकाईने सर्वेक्षण, अभ्यास केला पाहिजे. ग्राहकांच्या व तुमच्या गरजेतून उद्योगांच्या नवनवीन संधी खुल्या होत जातात. शेतकऱ्यांचा फायदा डोळ्यांसमोर ठेवून काम केल्यास कृषी उद्योगात प्रचंड संधी आहेत. 

कोणताही उद्योग यशस्वी करणे हे "टीम वर्क' असते. कर्मचाऱ्यांना कामाचे समाधान मिळाले पाहिजे. करचुकवेगिरी कधीच लपत नाही. कधी ना कधी कर भरावाच लागतो. त्यातून सुटका नसते. कोणताही उद्योग करताना गुणवत्तेशी तडजोड करता कामा नये. अनेक कंपन्या 20-30 हजार रुपयांत "आयएसओ' प्रमाणपत्रे मिळवतात. प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. निकष पाळले तरच ग्राहकांचा व पर्यायाने कंपनीचाही फायदा होतो. खरेदी- विक्री करतानाही नियम व अटींचे पालन केले पाहिजे. रक्कम चेक देणे, बिलिंग, कायदेशीर बाबी, शासकीय परवाने, उत्पादनाचे प्रमाणपत्रे, तपासणीचे रिपोर्ट बारीक सारीक गोष्टींचे काटेकोर पालन केले पाहिजे. 

नाबार्डच्या योजना
सुनील जाधव, नाबार्ड 
गेली 30 वर्षे नाबार्ड शेतीला होणारा पतपुरवठा सुलभ व्हावा, शेतीसाठीचा पतपुरवठा वाढावा यासाठी कार्यरत आहे. नाबार्डमार्फत राष्ट्रीयीकृत बॅंक, शेतकरी ग्रामीण बॅंका, जिल्हा सहकारी बॅंकांना कर्जपुरवठा केला जातो. शेतकरी मंडळे व बचत गटांच्या संगोपनाचे विस्ताराचे कार्य नाबार्डने केले. 

कृषी उद्योगांसाठी नाबार्डच्या 25 हून अधिक योजना आहेत. या सर्व योजनांची सविस्तर माहिती नाबार्डच्या विभागीय कार्यालयांमध्ये अथवा संकेतस्थळावर मिळू शकते. यामध्ये हरितगृहातील शेती, विविध प्रकारची फळबाग लागवड, दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, शेतीचे यांत्रिकीकरण आदी सर्व बाबींचा समावेश आहे. अन्नप्रक्रिया उद्योगांसाठीही नाबार्डकडून अर्थसाहाय्य केले जाते. नाबार्डमार्फत कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जात नाही. फक्त कर्ज उपलब्ध करून दिले जाते. किमान 50 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन "कंपनी ऍक्‍ट 1956' मधील कलम 518 नुसार कंपनी स्थापन केली, तर तिला नाबार्डमार्फत थेटपणे कर्ज मिळू शकते. ही उत्पादक कंपनी शेतीसंबंधी कोणत्याही उद्योग व्यवसायात काम करू शकते. त्यांना योग्य तारणावर 10 ते 12 टक्के व्याजदराने पाहिजे तेवढे कर्ज उपलब्ध करून देण्याचे नाबार्डचे धोरण आहे. उत्पादक कंपन्यांना पतपुरवठ्याची काहीही मर्यादा नाही. मागेल तेवढे कर्ज मिळू शकते. लघु सिंचन योजना, ऊस तोडणी यंत्रे, ट्रॅक्‍टर, प्रक्रियेची यंत्रसामग्री, पशुधन, गांडूळ खत, जैविक खते आदी अनेक बाबींसाठी नाबार्डच्या पतपुरवठ्याच्या योजना आहेत.

गुणवंतरावांच्या प्रयत्नांतून चिबड जमीन झाली सुपीक


हर्सूल (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) या छोट्या गावात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा शानदार झाडांमधून प्रवेश करावा लागतो. कोणी बरे एवढ्या मेहनतीने हे सर्व केलं असावं? असा प्रश्‍न शेजारील शेताकडे पाहत गावाकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येतो. पुढे गेल्यावर शेतात प्रवेश करण्यासाठी दोन मोठे लोखंडी दरवाजे दिसतात. त्यावरील शेतीमालकाच्या नावाची पाटी आपले लक्ष वेधून घेते. गुणवंतराव देशमुख असे या मालकाचे नाव. 
गावालगतच त्यांची पाच एकर वाडी आहे. या वाडीला तारेचं कुंपण केलं आहे. शेतात प्रवेश करताच उजव्या बाजूला विहीर दिसते. मोठ्या मेहनतीने ही विहीर खोदून त्यांनी सिंचनाची सोय केली आहे. विहिरीला लागून पाण्याचे लहानसे सिंमेटचे टाके असून, या टाक्‍याच्या रस्त्याकडील बाजूस गुणवंतरावांचे कुलदैवत विठ्ठल मोठ्या ऐटीत विसावले आहे. 

आगळावेगळा इतिहास - 
या शेताला आगळावेगळा इतिहास आहे. करंडा या नावाने ते साऱ्या गावात प्रचलित होतं. या शेताची दशा पाहूनच कुणीतरी तसं नाव ठेवलं असावं. पावसाळ्यात नाल्यातून वाहणारं सारं पाणी या शेतात गोळा व्हायचं. त्यामुळे ही जमीन चिबड झाली होती, त्यातून उत्पादनाची अपेक्षाच नव्हती. म्हणून तर गुणवंतरावांना ती अगदी कमी भावात मिळाली. हे शेत हाती येताच गुणवंतरावांत दडलेला गुणी शेतकरी बाहेर आला. त्यांनी शेतीचं नियोजन करायला सुरवात केली.

चिबड जमिनीचं केलं चीज 
शेतात साचणारं पाणी आणि त्यामुळे चिबडलेली जमीन हा खरा प्रश्‍न होता. शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी दोन चरे खोदून घेतले. शेताच्या मधोमध एकमेकांना छेदणाऱ्या या चरांमुळे साचलेलं पाणी चरांत गोळा होऊ लागलं. हे पाणी पीव्हीसी पाइपद्वारे जमा करून ते सरळ विहिरीत सोडलं. त्यामुळे दोन कामं झाली. जमिनीतील अनावश्‍यक पाणी निघालं, शेतातील विहिरीचं पुनर्भरण झालं. साहजिकच विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. गुणवंतरावांनी शेणखताचा भरपूर उपयोग केला. स्वतःकडील व गावातून विकत घेऊन एकरी 25 गाड्या शेणखत शेतात टाकलं. अशाप्रकारे जमिनीचा पोत सुधारण्याचा प्रयत्न झाला. खते, फवारणी, निंदणी व डवरणीची वेळ चुकू न देणं, हे गुणवंतरावांचं वैशिष्ट्य आहे. 

शेताची सजावट - मोकाट जनावरांचा त्रास टाळण्यासाठी त्यांनी काटेरी तारेचं कुंपण करून घेतलं. शेतात प्रवेश करण्यासाठी मोठा लोखंडी दरवाजा बसविला. कुंपण व दरवाजामुळे शेताला शोभा आली. या सौंदर्यात भर टाकावी म्हणून बोगनवेल, गुलाब आदींनी शेताचं सुशोभन केलं. झाडं जशी मोठी होऊ लागली, तशी शेताला शोभा येऊ लागली. येता - जाता लोक याविषयी गुणवंतरावांना विचारू लागले. गुणवंतरावांचा उत्साह वाढला. त्यांनी झाडांची विशेष काळजी घ्यायला सुरवात केली. नागपूर - नांदेड या महामार्गाला लागूनच शेत असल्याने येणाऱ्या - जाणाऱ्या अशा प्रत्येकाची नजर शेताकडे वळते. शेताचं सौंदर्य पाहण्यासाठी काही प्रवासी जाणीवपूर्वक इथे थांबतात. काहीजण आपल्या कुटुंबासह वनभोजनाचा आनंद घेतात. या रस्त्यावरून जाणाऱ्या लग्नाच्या वरातीही येथे हमखास थांबतात. अनेकांना येथे फोटो काढण्याचा मोह अनावर होतो. 

पिकांचे नियोजन व भरघोस उत्पादन - 
शेताला नवं सौंदर्य मिळवून देतानाच गुणंवतरावांनी भरघोस उत्पादन घेण्यास सुरवात केली. परिसरातील पारंपरिक कपाशी, सोयाबीन या पिकांसोबतच गहू, हरभरा पिके ते घेतात. सोबत कांदा, वांगी, मिरची ही भाजीपाला पिके घ्यायलाही सुरवात केली आहे. संत्र्याची लागवड असून, पुढील वर्षापासून विक्रीला सुरवात होईल. तीन एकरांत 410 झाडे आहेत. या बागेत सोयाबीनचे आंतरपीक घेतले जाते. सोयाबीन काढल्यावर गहू, हरभरा पिके याच बागेत घेतली जातात. कापूस लावण्यासाठी ते पावसाची वाट पाहत नाहीत. गावातील अन्य शेतकरी कापूस लागवड करीत असताना गुणवंतराव डवरणी देत असतात. शेतातील विहिरीचे पुनर्भरण केल्याने सिंचनासाठी उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होते आणि त्यामुळे कापसाची उन्हाळी पेरणी शक्‍य होते. लागवड लवकर केल्याने पीक आधी येते. कामासाठी मजूर सहज उपलब्ध होतात. भावही चांगला मिळत असल्याचा गुणवंतरावांचा अनुभव आहे. शिवाय, खरिपाचे पीक आटोपून रब्बीचे पीक घेण्यासाठी जमीन तयार करायला वेळ मिळतो. रब्बीचेही पीक इतरांपेक्षा आधी घेऊन उन्हाळवाही चांगली करता येत असल्याचे गुणवंतराव आवर्जून सांगतात. कपाशी पीक 21 दिवसांचे झाल्यावर युरिया, पोटॅश व डीएपी एकत्र करून खताचा पहिला डोस देतात. पिकाची स्थिती व पोषणाची गरज पाहून खतांचे नियोजन केले जाते. डवरणीचे पाच फेर देऊन पिकाला भर दिली जाते. तीन ते चार वेळा निंदणी करून तणांपासून संरक्षण केले जाते.
 
बैलांचाही छंद - 
गुणवंतरावांना गोऱ्हे विकत घेऊन त्यांना शिकविण्याचा छंद आहे. दरवर्षी किंवा दोन वर्षांत एकदा तरी पाच ते दहा हजारांत गोऱ्हे विकत घेतात. त्यांना शेतीकाम, बैलगाडी असे सविस्तर प्रशिक्षण देऊन तयार करतात. असे प्रशिक्षित बैल 70 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत विकतात. त्यातून चांगला नफा मिळतोच, शिवाय शेतीसाठी बैलही उपलब्ध होतात. हे काम नफा मिळविण्यासाठी किंवा व्यवसायासाठी न करता तो छंद असल्याचे गुणवंतराव म्हणतात. 

* उत्पादन (एकरी) व उत्पन्न दृष्टिक्षेपात - 
वर्ष 2011-12 
कापूस = उत्पादन - एकरी 18 क्विंटल - भाव 4,000 रु. भावाने 72 हजार रु. उत्पन्न 
सोयाबीन = 10 क्विंटल - दर दोन हजार 200 रु.प्रमाणे 22 हजार रु. 
गहू = 6 क्विंटल, दर एक हजार 200 रु., उत्पन्न सात हजार 200 रु. 
हरभरा = 6.5 क्विंटल, दर तीन हजार रु.प्रमाणे 19 हजार 500 
वांगी = 10 गुंठे क्षेत्रात 17 क्विंटल उत्पादन. उत्पन्न 12 हजार रु. 
कांदे = 10 गुंठे क्षेत्र - 20 क्विंटल उत्पादन, उत्पन्न सहा हजार रु. 
मिरची - पाच क्विंटल उत्पादन, उत्पन्न सहा हजार रु. 

एकूण एकरी उत्पादन = 1 लाख 44 हजार 700 रु. 

* वर्ष 2010-11 
कापूस 16.5 क्विंटल = सहा हजार 500 रु. दराप्रमाणे एक लाख सात हजार 250 रु. 
सोयाबीन 11 क्विंटल = एक हजार 900 रु.प्रमाणे 20 हजार 900 रु. 
एकूण - एक लाख 28 हजार 150 रु. 

शेतात सिंचन सुविधा उपलब्ध करून त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. शेतातील उपलब्ध साधन सुविधांचा किंवा अल्प प्रयत्नाने मिळणाऱ्या सुविधांचा शोध शेतकऱ्यांनी घ्यावा, त्यातून आवश्‍यक बाबींची पूर्तता करून मग उत्पादन वाढविण्याकडे वळावे. पावसाच्या पाण्याचे संकलन करून विहिरीची पाणीपातळी वाढविण्यासारखे सोपे उपाय शेतकरी करू शकतात. 
- गुणवंतराव देशमुख 

संपर्क - गुणवंतराव देशमुख - 9552985336. 

प्रयोगातून जरबेरा फुलला अभ्यासातून अधिक बहरला


पुणे- बंगळूर महामार्गावर साताऱ्यापासून जवळ नागठाणे गाव आहे. येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून मनोहर साळुंखे यांची जिल्ह्यात ओळख आहे. हलक्‍या व मध्यम स्वरूपाच्या 17 एकर शेतीत त्यांचे विविधांगी प्रयोग उभे आहेत. द्राक्षे, कलिंगड, पपई, केळी, भाजीपाला शेतीबरोबर इमूपालन व्यवसाय त्यांनी साकारला आहे. हे सर्व व्याप सांभाळण्यासाठी वेळ व कामाची सांगड घालण्यात ते यशस्वी ठरले आहेत. 

-फुलशेतीविषयी 
सन 2005-06 मध्ये ते हरितगृहामधील जरबेरा शेतीकडे वळले. राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत 20 टक्के अनुदान घेऊन 80 फूट रुंद व 450 फूट लांबीच्या आकारातील गॅलव्हनाईज पाइपच्या साहाय्याने शेड उभारले. शेडनेट व प्लॅस्टिक पेपरने ते बंदिस्त केले. त्यामध्ये जरबेरा फुलांची शेती सुरू केली. जमिनीची पूर्वतयारी म्हणून 450 ब्रास पूर्ण निचरा होणारी लाल माती प्रति ब्रास 700 रुपयांप्रमाणे विकत आणली. फुलपिकाला सेंद्रिय कर्ब पुरविण्याच्या उद्देशाने मातीत 150 ब्रास शेणखत व 5 टन सेंद्रिय खत मिसळले. पाण्याचा निचरा होण्यासाठी 20 ब्रास वाळू तसेच जमिनीचा पोत टिकवण्यासाठी 10 ब्रास भाततूस मिसळले. फॉरमॅलीनच्या साह्याने निर्जंतुकीकरण केले. बेडवर दोन ड्रीपर ठेवून इनलाईन ठिबक सिंचन केले. जुलै 2006 मध्ये चेन्नई येथून रोपे मागवून 23 हजार 100 रोपांची लावण केली. रोपांना वाढीच्या अवस्थेनुसार ठिबकदद्वारे 19-19-19, 12-61-0, 13-0-45, 0-52-34, 0-0-50 व सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली. पाने व फुलांवर येणाऱ्या रोग-किडींचा योग्य अटकाव करण्यासाठी योग्य कीडनाशकांचा वापर केला. हंगामातील वातावरणानुसार 150 ते 450 मि.लि.पर्यंत प्रति रोपास पाणी पुरवले जाते. लावणीपासून अडीच ते पावणेतीन महिन्यानंतर फुलांचे उत्पादन घेण्यास सुरवात झाली. फुलांची काढणी एकाड एक दिवसाने केली जाते. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत काढणी पूर्ण करण्याचा नित्यपणा आहे. या वेळेत फुलांची काढणी केल्यामुळे कमी तापमानात तजेलदार व देठात ताठरपणा असणारी फुले मिळतात हा अनुभव साळुंखे यांनी सांगितला. उत्पादित फुले पॅकिंगसाठी पॅकहाऊसमध्ये घेऊन प्रत्येक फुलास प्लॅस्टिकची पिशवी वापरली जाते. दहा फुले एकत्रित घेऊन रबर बॅंडच्या साहाय्याने बंच बनवला जातो. असे एकूण 40 बंच एका बॉक्‍समध्ये भरले जातात. शेतालगत कृषी विभागाच्या अनुदानावर 80 x 18 फूट अंतराचे पॅकहाऊस उभारले आहे. त्याचा वापर द्राक्षे, पपई, केळी, कलिंगड, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची व कारली यांच्या पॅकिंगसाठी झाला आहे. 

हरितगृहातून प्रति तोड्यास सात ते आठ हजार फुले मिळतात. तोडलेली फुले 2006 ते 2011 पर्यंत सातारा येथील अजिंक्‍यतारा फळे, फुले खरेदी-विक्री संस्थेच्या माध्यमातून पुणे, मुंबई, दिल्ली, लुधियाना, लखनौ, हैदराबाद, गुंटूर, कोलकता, बंगळूर आदी ठिकाणी विक्रीस पाठवली. अलीकडे फुलांची विक्री स्वतः सुरू केली आहे. 
जरबेरा रोपांपासून तीन ते चार वर्षे सलग उत्पादन घेतले जाते. त्यानंतर नवीन रोपांची लागवड केली जाते. याकामी रोपांसह इतर खर्चास एकरी सात ते आठ लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. हा खर्च शेतकऱ्यांना न पेलणारा असाच आहे. जास्तीत जास्त दिवस उत्पादन देण्याच्या दृष्टीने रोपांचे काळजीपूर्वक संगोपन साळुंखे यांनी केले आहे. आजमितीला सलग सहाव्या वर्षी फुलांचे उत्पादन ते घेत आहेत. याकामी महिन्यातून एकवेळ सर्व रोपांची काळजीपूर्वक स्वच्छता केली जाते. रोपाभोवतीचा काडी कचरा, वाळलेली पाने, फुलांचे तुटलेले देठ स्वच्छतेवेळी बाजूला काढले जातात. त्यानंतर संपूर्ण बेड हलवून घेतला जातो. त्यावर एकरी तीन पोती निंबोळी पेंड, तीन पोती 5-10-5, 75 किलो डीएपी, 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 10 किलो ग्रॅन्यूअल ह्युमिक ऍसिड, मॅग्नेशिअम-कॅल्शिअम-सल्फर प्रति 10 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये 10 किलो एकत्रित मिसळून दिले जाते. वर्षातून एकवेळ बाजारपेठेतील दर कमी होतो. त्या वेळी वाढलेल्या फुटव्यांच्या संख्या नियंत्रित केली जाते. त्याचबरोबर बेडवरील दुरुस्त्या केल्या जातात. दरवर्षी ही कामे नित्यपणे केली जातात. फुटवे रोगमुक्त ठेवणे, पॉलिहाऊसमधील हवा खेळती ठेवणे याचबरोबर रोपांची मर टळून रोग नियंत्रित करणे सुलभ झाले. त्या अनुषंगाने उत्पादित फुलांची प्रत व संख्या चांगली मिळवण्यात यश आले आहे. 

साळुंखे यांनी फुटव्यांपासून रोपनिर्मितीचा प्रयोगही केला आहे. फुले काढताना निघालेल्या फुटव्यांच्या पाने व मुळांची योग्य छाटणी घेऊन त्यापासून पिशवीमध्ये रोपनिर्मिती करून पाहिली. या प्रयोगात यश मिळाले. हरितगृहामधील एकूण जातींपैकी दोन ते तीन जाती कमी उत्पादन देणाऱ्या होत्या. त्या पूर्णपणे काढून त्या ठिकाणी फुटव्यांपासून तयार केलेली नऊ हजार रोपे लावली आहेत. याकामी पाच ते सहा लाख रुपये खर्च अपेक्षित होता. तो कमी झाल्याने उत्पन्न वाढल्याचे त्यांनी सांगितले. फुटव्यांपासून तयार केलेल्या रोपांपासून फुलांचे उत्पादन आजमितीला चांगले मिळत आहे. त्यांनी हा अनुभव आजूबाजूच्या हरितगृह शेतकऱ्यांना दिला आहे. 

साळुंखे यांना पत्नी सौ. सुनीता, थोरले बंधू नानासाहेब व त्यांच्या पत्नी सौ. सुवर्णा तसेच जिल्हा कृषी अधीक्षक विकास पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील राजेंद्र सरकाळे यांचे मार्गदर्शन मिळते. 

लागवडीच्या पहिल्या वर्षी अनुभव कमी असल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. परंतु दुसऱ्या वर्षापासून प्रति झाडाकडून प्रति वर्षी 42 ते 46 फुलांचे उत्पादन मिळाले. आजअखेर एक फूल निर्मितीसाठी एक रुपया 17 पैसे एवढा खर्च आला आहे. विक्रीपश्‍चात प्रतिकूल दोन रुपये 20 पैसे मिळतात. चढ-उतारानुसार सर्व खर्च गृहीत धरून प्रतिफुलाला एक रुपया एवढा वार्षिक नफा मिळवता आल्याचे त्यांनी सांगितले. 

मनोहर साळुंखे- 9822603075. 

सध्या हरितगृहात मोठ्या प्रमाणात जरबेरा फुलांची लागवड झाल्याने व फुलांना हंगामी मागणी असल्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात चढ- उतार होत असतात. साळुंखे यांनी जरबेरा फुलांच्या विक्रीकरिता अवलंबलेली करार पद्धत व उत्पादन खर्च कमी करण्याकरिता रोपांपासून तयार केलेले फुटवे पुनर्लागवडीला वापरून उत्पादनखर्चात केलेली बचत ही शेतकऱ्यांना अनुकरणीय आहे. 
विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा. 

साळुंखे यांनी विविध पीक पद्धती स्वीकारली आहे. त्यामध्ये व्यावसायिकदृष्ट्या नियोजन केले आहे. बाजारपेठेतील शेतीमालाच्या विक्रीदराचा अंदाज घेऊन पीकनियोजन व व्यवस्थापन केल्यास शेती किफायतशीर ठरू शकते याची प्रचिती त्यांचे शेत पाहून येते. त्यांनी आपल्या शेतात उच्च तंत्राचा अवलंब केला आहे. नियंत्रित पद्धतीने पाणी, खतांचा संतुलित वापर व मार्केटिंगचे योग्य व्यवस्थापन यशस्वी केल्याचे पाहण्यास मिळते. 

कष्टाला जोड कल्पकतेची आदर्श शेती बाबाजींची


आंबेगाव तालुक्‍यातील (जि. पुणे) सातगाव पठारावरील पेठ हे बाबाजी धुमाळ यांचे गाव. वडिलोपार्जित 57 गुंठे कोरडवाहू जमीन वगळता त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नव्हते. डिझेल मेकॅनिक बनायच्या उद्देशाने त्यांनी आळेफाटा येथे ट्रॅक्‍टर गॅरेजमध्ये काम करायला सुरवात केली. पुढे मित्रांकडून उसने पैसे, बॅंकेकडून कर्ज घेऊन 1972 मध्ये 26 हजार रुपयांना जुना ट्रॅक्‍टर, 1600 रुपयांना ट्रॉली, नांगर अशी अवजारे विकत घेतली. पुढे या ट्रॅक्‍टरनेच त्यांच्या प्रगतीला गती दिली. 
ट्रॅक्‍टर घेतल्यानंतर बाबाजींनी जमीन सपाटीकरण करून देण्याचा व्यवसाय सुरू केला. जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांत विविध भागांत रात्रंदिवस ट्रॅक्‍टर चालवण्याचे काम करतानाच देवगाव येथे 11 एकर पडीक माळरान जमीन खरेदी केली. येथूनच खऱ्या अर्थाने शेतीचा श्रीगणेशा झाला. पै - पै जोडत शेती 50 एकरपर्यंत वाढवली. या वाटचालीत थोरले बंधू बबनशेठ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेतीत सुरवातीला जिरायती ज्वारी, मटकी, हुलगा अशी पिके घेतली. 1983 मध्ये शेतातच घर बांधून ते देवगावमध्ये स्थायिक झाले. घोडनदीवरून साडेतीन हजार फूट लांबीच्या दोन स्वतंत्र पाइपलाइन करून अनुक्रमे 10 व 15 अश्‍वशक्तीच्या मोटारींनी शेतात पाणी खेळवले. एक विहीर असून त्यावर दहा अश्‍वशक्तीची मोटर आहे. तिन्ही पाइपलाइन स्वतंत्र आहेत. 

ऊस उत्पादनात सातत्य, बहुविध भाजीपाला पद्धती पाण्याची सोय झाल्यावर आठ - दहा वर्षे ढोबळी मिरची, काकडी, कांदा, बटाटा, कलिंगड, टोमॅटो आदींचे उत्पादन घेतले. उत्तर पुणे जिल्ह्यात ढोबळी मिरची यशस्वी करण्याचे श्रेय बाबाजींकडे जाते. गेल्या 32 वर्षांपासून ऊस उत्पादनात ते जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्‍यांत सातत्याने आघाडीवर आहेत. विघ्नहर सहकारी साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी आपला ऊस गुऱ्हाळात नेऊन गूळ तयार करून घेत. मंचरजवळील पेठच्या बाजारात विक्री करत. "विघ्नहर' सुरू झाल्यानंतर उसाचे क्षेत्र 30 एकरपर्यंत वाढवले. त्यात स्थिरता आल्यावर 1985च्या दरम्यान 15 एकरांत संत्रा, मोसंबी, नारळ, आंबा, चिकू, डाळिंब यांची लागवड केली. चिकूची 200 झाडे आहेत. ऑक्‍टोबर ते सप्टेंबर या वर्षाच्या कालावधीचा करार व्यापाऱ्यांसोबत केला जातो. दर पंधरा दिवसांनी चिकूची काढणी होते. नारळाची दोन एकरांत 30 बाय 30 फूट अंतरावर सुमारे 100 झाडे आहेत. याच बागेत आंब्याची रत्ना, पायरी, तोतापुरी, मलगोबा, हापूस जातींची 300 झाडे आहेत. वर्षभरात सुमारे सहा - सात हजार नारळ मिळतात. प्रति नग सात ते आठ रुपये या दराने विक्री होते. आंब्याची वाशी बाजार समितीत विक्री होते. दोन एकरांवर हापूस आंब्याची 150 झाडेही लावली आहेत. 

उसात कुशलता 
बाबाजी 11 वर्षे आपला ऊस भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देत आहेत. सध्या 20 एकरांवर ऊस आहे. प्रत्येकी दहा एकरांत फुले 265 व त्याचा खोडवा आहे. गेल्या वर्षी पाण्याचा मोठा ताण पडल्याने उत्पादन घसरून एकरी सरासरी 60 टनांचा उतारा मिळाला. त्यापासून बोध घेत सिंचनाच्या आराखड्यात बदल केला आहे. वसंतदादा साखर संस्थेने (व्हीएसआय) 2003-2005 मध्ये 86032 जातीच्या उतिसंवर्धित रोप लागवडीचा "प्रात्यक्षिक प्लॉट' त्यांच्याकडे घेतला. त्यातून एकरी 100 टन उत्पादन मिळाले. "भीमाशंकर'मार्फत 2009-10 मध्ये त्यांना सर्वोच्च 2650 रुपये प्रति टन दर मिळाला. यंदा सर्व उसाला इनलाईन ठिबक सिंचन असून, त्यासाठी एकरी 40 हजार रुपये खर्च आला. 

- वनशेतीतही अग्रेसर 
बाबाजींनी 2003 मध्ये साडेपाच एकर क्षेत्रावर सागाची सहा हजार टिश्‍यू कल्चर रोपे कर्नाटकातून आणून लावली. त्यालाही ठिबक सिंचन आहे. सागात पहिली दोन वर्षे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा "काबुली 2' हरभरा व अन्य आंतरपिके घेतली. दीड वर्षापूर्वी पाऊण एकरात 10 बाय 12 फूट अंतरावर डाळिंबाच्या 300 रोपांची लागवड केली. यंदा पहिल्या वर्षी 300 क्रेट (सरासरी 16 किलो प्रति क्रेट) उत्पादन झाले. ज्वारी, गहू, खरबूज, कलिंगडाचेही यशस्वीपणे उत्पादन ते घेतात. काटेकोर शेतीतून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळविण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. 

- प्रेसमडपासून कंपोस्ट निर्मिती 
पिकांसाठी सेंद्रिय खताच्या वापरावर बाबाजींचा भर आहे. दरवर्षी सुमारे दोनशे ते सव्वादोनशे टन कंपोस्ट खत ते तयार करतात. यासाठी साखर कारखान्यातील सुमारे दोनशे टन प्रेसमड (मळी) वापरले जाते. त्यात पाच ते दहा टन राख (कारखान्यातील), 10 ते 20 टन शेणखत, एक ते दोन टन सुपर फॉस्फेट व अर्धा टन युरिया जेसीबी यंत्राच्या साहाय्याने मिसळतात. त्यात कंपोस्टिंग कल्चर, स्फुरद विघटक जिवाणू, ऍझोटोबॅक्‍टरचा वापर होतो. संपूर्ण ढिगाला दोनदा जेसीबी यंत्राने पलटी दिल्यानंतर दहा ते अकरा महिन्यांत हे मिश्रण कुटून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते. फळझाडांसाठी 18ः46ः0, 10ः26ः26, युरिया, एसएसपी व निंबोळी खताचा गरजेनुसार वापर होतो. 

- ठिबक तंत्रज्ञानात निष्णात 
बाबाजींनी 1987-88 पासून सर्व पिकांमध्ये ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे. एका खासगी कंपनीच्या संशोधन व विकास विभागाच्या तज्ज्ञांकरवी पाइपलाइनवरील दाब नियंत्रित ठेवणारी विशिष्ट पद्धतीची फिल्टर यंत्रणा (मॅनिफोल्ड) विकसित करून घेतली. यात प्रत्येकी 50 घनमीटर क्षमतेचे तीन सॅण्ड फिल्टर व 160 घनमीटर क्षमतेचे दोन स्क्रीन फिल्टर वापरण्यात आले. फळबागांसाठी ते सेमिऍटोमॅटिक सॅण्ड फिल्टर व 40 घनमीटरचा स्क्रीन फिल्टर वापरतात. भुईमूग, मेथी, कोथिंबीर यांचे मायक्रो स्प्रिंकलरद्वारे उत्पादन घेतात. साखर कारखान्यांचे तज्ज्ञ, शेतकरी, प्राध्यापक, विद्यार्थी त्यांच्या शेतीला आवर्जून भेट देतात. 

पीक, कीड - रोगांचा शास्त्रीय अभ्यास 
पिकांच्या शास्त्रीय अभ्यासाबरोबर अनेक किडी - रोगांची शास्त्रीय नावे, रासायनिक कीडनाशकांतील घटक, त्याबाबतची माहिती बाबाजींना तोंडपाठ आहे. त्यांची धनेश, मनोहर व गणेश ही मुलेही वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीत कार्यरत असून, त्यांचा शेतीचा दांडगा अभ्यास आहे. धनेश कृषी पदवीधर व एमबीए आहे.

विजेवरील ट्रॅक्‍टरचलित जनरेटर 
धुमाळ यांनी अवघ्या 90 हजार रुपयांत 20 केव्ही क्षमतेचा ट्रॅक्‍टरवर चालणारा, जोडणी करून कोठेही नेता येणारा, कमी आकारमान व वजनाचा जनरेटर तयार केला आहे. यासाठी डायनामो विकत घेऊन गरज व संकल्पनेनुसार वर्कशॉपमध्ये त्यात बदल करून घेतले. त्यांच्या 45 वर्षे जुन्या ट्रॅक्‍टरच्या रोटर शाफ्टवरून डायनामोला गती देऊन जनरेटर कार्यान्वित केला जातो. एकाच वेळी साडेसात अश्‍वशक्तीच्या दोन किंवा 15 अश्‍वशक्तीची एक मोटर चालविण्यास तो सक्षम आहे. त्यासाठी दर ताशी चार ते पाच लिटर डिझेल म्हणजेच 225 रुपयांपर्यंत खर्च येतो. याच क्षमतेचा नवा स्वयंचलित जनरेटर तीन लाख रुपयांदरम्यान बाजारात मिळतो. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी असे जनरेटर तयार केले आहेत. घरच्या घरी कमी खर्चात ट्रॅक्‍टरचलित फवारणी पंपही बाबाजींनी तयार केला आहे. 

"लिची'च्या शेतीने वाढवली आर्थिक गोडी

ठाणे जिल्ह्यात डहाणू तालुक्‍यातील बोर्डी येथील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी सतीश महादेव म्हात्रे यांनी कुशल मार्गदर्शन व शास्त्रीय सल्ल्याच्या साह्याने बोर्डीसारख्या ठिकाणी लिची या फळाची लागवड यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना 2009 चा "कै. वसंतराव नाईक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विशिष्ट हवामानाची अपेक्षा लिची फळपिकाला असल्याने त्याची लागवड फारच कमी भागात झालेली दिसते. पारंपरिक क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी लिची शेतीचे खूप कमी प्रयत्न झाले आहेत. लिची उत्पादकांमध्ये जागरूकता, यथायोग्य माहिती व प्रभावी आणि पद्धतशीर प्रयत्न झाल्यास राज्यात या पिकाचा चांगला विकास होईल, अशी आशा आहे. 

प्रत्येक शेतकऱ्याचा विविध प्रकारची यशस्वी शेती करण्याकडे कल असतो. ज्याद्वारे तो विविध प्रयोग करतो. यातूनच तो नवीन क्षेत्रात प्रवेश करतो. अशाच पद्धतीने ज्या भागात चिकू, केळी, नारळ व आंबे यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, तेथे लिची फळाचे उत्पादन घेण्याची प्रेरणा म्हात्रे यांना मिळाली. सुरवातीला त्यांनी एका पारशी शेतकऱ्याकडून लिचीची 20 कलमे घेऊन आपल्या 20 गुंठे जमिनीत लावली. काळानुरूप त्यांनी तीन भागांमध्ये ही संख्या 100 कलमांपर्यंत म्हणजे सुमारे एक हेक्‍टरपर्यंत वाढविली. त्यातील सुमारे 70 झाडे उत्पादनक्षम आहेत. म्हात्रे यांनी मोठ्या धाडसाने रुजवलेली लिचीची शेती आता चांगलीच वाढली आहे. त्यामध्ये परिसरासाठी म्हात्रे यांचे कार्य पायोनिअर म्हणावे लागेल. 

यशस्वी प्रयोगासाठी चिकाटी 
लिची शेतीचा म्हात्रे यांचा सुरवातीचा अनुभव असमाधानकारक होता. तरीही चांगले यश मिळवायचे या हेतूने त्यांनी प्रयोग सुरूच ठेवला. फळे यायला सुरवात झाली तरी काही कारणांमुळे उत्पादनाच्या समस्या सुरूच राहिल्या. यामध्ये पालवीची वाढ न होणे, मोहोर व फळधारणा न होणे, कमी फळे लागणे, कीड व वटवाघळे यांच्या त्रासामुळे फळे न टिकणे, कमी दर्जाची फळे व त्यामुळे कमी नफा यासारख्या समस्यांशी म्हात्रे यांना सामना करावा लागला. मात्र, निराश न होता त्यांनी सन 2001 मध्ये मोठ्या प्रमाणात लिचीचे उत्पादन घेतल्या जाणाऱ्या बिहार राज्यातील काही भागांना भेट दिली. त्यातील मुजफ्फरमध्ये प्रगतिशील शेतकऱ्यांकडील लिची पिकाचे सूक्ष्म निरीक्षण केले. अशाच भेटीमध्ये त्यांना या लिची उत्पादकांनी मुजफ्फर येथील राष्ट्रीय संशोधन केंद्र (लिची) विभागातील शास्त्रज्ञ डॉ. राजेश कुमार यांना भेटण्याचा सल्ला दिला. स्थानिक शेतकऱ्यांना दर्जेदार फलोत्पादनासाठी ते मार्गदर्शन करीत होते. त्यानुसार म्हात्रे यांनी डॉ. राजेशकुमार यांच्याशी संपर्क साधून विविध समस्यांवर सखोल चर्चा केली. नियोजनात्मक कार्य करण्याचा आत्मविश्‍वास त्यांना तिथे मिळाला. त्यांच्या सल्ल्यानुसार म्हात्रे यांनी आपल्या बागेत लिचीची सुधारित पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली. जी जमीन फक्त चिकू बागायतीसाठीच प्रसिद्ध होती, तेथे म्हात्रे यांनी फुलवलेली लिचीची बाग परिसरातील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. लिचीच्या यशस्वी उत्पादनातून म्हात्रे यांना समाधान मिळालेच, शिवाय त्यांच्या या प्रयोगातून अन्य फलोत्पादकांनाही प्रेरणा मिळाली. 

लिची पिकाचे म्हात्रे यांचे अर्थशास्त्र 
म्हात्रे सुमारे 30 वर्षांपासून लिचीचा प्रयोग राबवत आहेत. प्रति झाड सुमारे 100 किलोपर्यंत उत्पादन मिळते. एकूण क्षेत्रातून त्यांना सहा टनांपर्यंत उत्पादन मिळते. स्थानिक बाजारपेठेत किलोला 150 रुपये दराने आपल्या लिचीची विक्री म्हात्रे करतात. मुंबई, अहमदाबादलाही ते शंभर रुपये दराने लिचीची विक्री करतात. साधारण एकरी तीन लाख रुपये उत्पन्नातून एक लाख रुपये खर्च वजा जाता दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती लागू शकते. 
साधारण 20 ग्रॅमचे एक फळ असते. दीडशे किलोच्या पेपर बॉक्‍समध्ये पॅकिंग करून माल पाठवला जातो. 
तोडणीनंतर त्वरित ताजा माल बाजारपेठेत पाठवला जातो. तोडलेली लिची फ्रीजमध्ये सुमारे आठवडाभर राहू शकते. 

लिची फळाविषयी म्हात्रे यांचे अनुभव 
म्हात्रे लिची फळाबाबत आपले अनुभव सांगताना म्हणाले, की जून किंवा सप्टेंबर - ऑक्‍टोबरच्या दरम्यान या पिकाची लागवड केली जाते. सुमारे सहा - सात वर्षांनी उत्पादनाला सुरवात होते. जानेवारीत मोहोर अवस्था सुरू होते, दीड महिना ती चालते. मेच्या मध्यावर लिचीची काढणी सुरू होते, ती सुमारे दहा दिवस चालते. 
एका घडाला 10, 20 ते 25 पर्यंत फळांचा घोस असतो. या काळात कीडनाशक फवारून चालत नाही. 
हे फळ अत्यंत चवदार, थोडे आंबट-गोड असते. एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा खाण्याची इच्छा होते. फळधारणेच्या काळात थंडी भरपूर लागते. किमान 12 ते 14 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता असते. मात्र, चार अंश से.पेक्षा कमी तापमान पिकाला मानवत नाही. पिकाला सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचीही गरज लागते. माती परीक्षणानुसार त्याचे नियोजन करावे लागते. जानेवारी - फेब्रुवारीच्या दरम्यान पाण्याची गरज अधिक भासते. म्हात्रे यांनी बागेत ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. डॉ. राजेश कुमार यांच्या सल्ल्याने म्हात्रे यांनी पाणी देण्याची पद्धत व पोषक घटकांचा पुरवठा यांचा विशेष अभ्यास करून लागवड पद्धतीत सुधारणा केली. झाडांचे वय, वाढ, स्थिती, फळधारणेचा काळ आदींचा विचार करून खते व पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केले. फळधारणेच्या काळात शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने विशेष काळजी घेतली. छाटणीचे तंत्र त्यांना चांगलेच उपयोगी पडले. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या लिची बागेला भेट दिली आहे. 

अन्य शेतकऱ्यांनी घेतली प्रेरणा 
ध्येयावर टिकून राहण्याच्या म्हात्रे यांच्या चिकाटीमुळे लिची लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्यास मदत मिळाली आहे. ते या पिकाचा प्रचार सर्वत्र करतात. एक प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतानाच अरब व युरोपीय देशांमध्ये लिचीची निर्यात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चालू हंगामात त्यांच्या बागेला मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे यांनी भेट दिली आहे. लिची फळांवर प्रक्रिया करून त्याची साठवणूक क्षमता वाढवता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे म्हात्रे यांचा या पिकाबाबत आत्मविश्‍वास वाढला आहे. 
डहाणू तालुक्‍यात आजच्या तारखेला जेमतेम 25 ते 30 हेक्‍टर जमीन क्षेत्रावर व हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्‍याच शेतकऱ्यांकडे लिचीची लागवड आहे. लिचीपासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता शेतकऱ्यांनी या पिकाकडे अभ्यास करून वळले पाहिजे, असे म्हात्रे सांगतात. त्यांच्याकडून बोर्डीसहित पालघर, वाडा आदी भागांतील शेतकऱ्यांनी लिचीची कलमे नेऊन त्यांची लागवड केली आहे. बोर्डी गावात अनेक शेतकरी थोड्यातरी क्षेत्रात लिचीचे पीक घेतात. अनेक शेतकरी या पिकाची स्वतंत्र बाग न करता चिकूच्या बागेत काही झाडे लावण्याचा प्रयोग करतात. या गावातून हंगामात एक ट्रक भरून लिची सुरतसारख्या ठिकाणी जाते.

मालाच्या गुणवत्तावाढीसाठी शेतकऱ्याने उभारले पॅकहाऊस

केवळ पीक उत्पादन महत्त्वाचे नसते. तर काढणीपश्‍चात तंत्रज्ञानालाही तितकेच महत्त्व देणे गरजेचे असते. 
काढणीपश्‍चात नियोजन योग्य प्रकारे न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या पातळीवर होऊ शकते. 
उत्पादन निघाल्यानंतर मालाची तात्पुरती साठवणूक, त्याची प्रतवारी, पॅकिंग या गोष्टीही तितक्‍याच गुणवत्तेने होणे गरजेचे असते. पावसाळा, उन्हाळ्यात अनेक वेळा अशा सुविधांच्या अभावी शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागते. कृषी विभागाकडे अशा प्रकारच्या पॅकहाऊससारख्या सुविधांसाठी अनुदान देण्याची सोय असते. मात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेणे गरजेचे असते. विदर्भातील एका शेतकऱ्याने ही गरज ओळखून आपल्या शेतात पॅकहाऊस उभारले आहे. 

सुभाषचंद्र आचलिया असे त्यांचे नाव आहे. ते यवतमाळ येथील एका कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आहेत. त्यांची सुमारे दहा एकर शेती आहे. भविष्यकाळातील शेतीची गरज ओळखून त्यांनी तसे तंत्रज्ञान आपल्या शेतात राबविण्यास सुरवात केली आहे. 

पॅकहाऊसचा लाभ घेणे गरजेचे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिक भाव मिळावा, शेतीमालाची प्रतवारी कायम ठेवून शेतातच मालाची साफ-सफाई करून त्याचे पॅकिंग करता यावे यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत पॅक हाऊसची निर्मिती करणे प्रामुख्याने सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांना शक्‍य होणार आहे. आचलिया यांनी याच अभियानांतर्गत अनुदानातून पॅकहाऊसची निर्मिती केली आहे. त्यामुळे प्रतवारी कायम ठेवून योग्य भावात माल विकण्याचा लाभ त्यांना मिळणार आहे. यवतमाळ तालुक्‍यात सिंचनाच्या सुविधा वाढल्या आहेत. बेंबळा प्रकल्प, डेहणी उपसा सिंचन, हातगाव वर्धा बॅरेज उपसा सिंचन, खर्डा डॅम या प्रकल्पांसह पंतप्रधान पॅकेजअंतर्गत झालेल्या विहिरीमुळे सिंचन क्षमतेत वाढ होणार आहे. सिंचन सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विविध पिके शेतकऱ्यांना घेणे शक्‍य होणार आहे. अशातच शासनाकडून पन्नास टक्के अनुदानावर आधारित मिळत असलेल्या पॅकहाऊसमुळे शेतीमालाची प्रतवारी टिकवून ठेवण्यास मदत मिळणार आहे. 

यवतमाळ-धामणगाव या मार्गालगत अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या सौ. मीनाक्षी संदीपकुमार आचलिया यांच्या शेतात या पॅकहाऊसची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे 612 चौरस फुटांवरील हा प्रकल्प आहे. यंदाच्या मार्चमध्ये तो उभारण्यात आला. त्यासाठी सुमारे पावणेचार लाख रुपये खर्च आला. कृषी विभागाकडून त्यांना तीन लाख रुपयांची मर्यादा होती. अनुदानापोटी ग्राह्य खर्चाचे पन्नास टक्के अनुदान म्हणजेच दीड लाख रुपये आचलिया यांच्या कर्जखात्यात जमा झाले आहेत. या पॅकहाऊसमुळे उत्पादित मालाची शेतावरच साफ-सफाई प्रतवारी व आवश्‍यक वजनाचे वा आकाराचे पॅकिंग करून तात्पुरती साठवणूक करण्यास मदत होणार आहे. फळे, फुले, भाजीपाला यांसारख्या नाशवंत मालाचे आयुष्य व दर्जा वाढविणे यासाठी उपयोगी पडणार आहे. कच्च्या मालावर प्राथमिक प्रक्रिया करून गुणात्मक वाढ करण्यास उपयोगी, मध्यस्थांची संख्या कमी करून प्रत्यक्ष उत्पादकाला वाजवी भाव मिळवून देणे व ग्राहकांना योग्य दरात माल उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. 

फळ पिकांसाठी किमान 30-50 मेट्रिक टन प्रति वर्ष क्षमतेचे हे पॅकहाऊस उभारण्यात आले आहे. पॅकहाऊसमध्ये 20 x 20 फुटांचा मोठा हॉल आहे. 10 x 10 च्या दोन खोल्या असून त्यातील एक स्टोअर तर एक कार्यालयासाठी आहे. फळ किंवा भाजीपाला पिकाच्या आवश्‍यकतेप्रमाणे स्वच्छता, प्रतवारी, काढणीपश्‍चात पॅकिंग, सीलिंग, माल साठवणूक सुविधा, मोजमापे व हाताळणी यंत्रणा येथे उपलब्ध आहे. काढणीपश्‍चात व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्‍यक उपाययोजना, शून्य ऊर्जाधारित शीतकक्ष, पाण्याची सुविधा, टाकाऊ पदार्थाचा निचरा यांचा समावेश करण्यात आला आहे. फुलपिकांसाठीही हे पॅकहाउस उपयोगी पडणार आहे. 

विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बॅंकेच्या बाभूळगाव शाखेचे व्यवस्थापक नरेंद्र खत्री व तालुका कृषी अधिकारी सुरेश काळे यांच्या पुढाकाराने आचलिया यांना बॅंकेमार्फत तारण कर्ज देण्यात आले आहे. हे पॅकहाऊस सुमारे 40 दिवसांत उभारण्यात आले. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत दोन वेळा पाहणी करून पॅकहाऊसचे अनुदान खात्यात जमा झाल्याची माहिती लाभार्थी शेतकऱ्यांनी दिली. पॅकहाऊस भविष्यात उपयोगी पडणार असून विदर्भातील सिंचन सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ जरूर घ्यायला पाहिजे, असे मत सुभाषचंद्र आचालिया यांनी व्यक्त केले. 

आचलिया यांनी आपल्या दहा एकर क्षेत्रात पावणेदोन एकर क्षेत्रात कपाशी घेतली आहे. तर येत्या हंगामात दीड एकर क्षेत्रात ग्रॅंड नाईन केळी, एक एकर शेतात मिरची, अडीच एकर क्षेत्रात गवारगमसाठी गवार अशी पिके घेण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. तर 10 गुंठे क्षेत्रावर शेडनेटमध्ये काकडी, ढोबळी मिरची, कारले अशा पिकांचे नियोजन त्यांनी केले आहे. आचलिया म्हणाले, की यवतमाळ तसेच नागपूर बाजारपेठ आम्हाला जवळच्या आहेत. तेथे मालाची विक्री करण्याचे नियोजन आहे. पॅकहाऊस तर बांधले आहे. त्यादृष्टीने विविध पिके घेण्याचे नियोजन आहे. पॅकहाऊस उभारताना शासकीय निकष पाळले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनाही जर आपल्या मालासाठी त्याचा वापर करायचा असला तरी या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. सद्यःस्थितीत मी कांद्याची साठवणूक केलेली आहे. त्याचा फायदा मला होत आहे. सध्याच्या काळात शेतीत सुधारित तंत्राचा वापर करणे गरजेचे झाले आहे. त्या दृष्टीने शेतात बदल करीत असल्याचे आचलिया यांनी सांगितले. 
संपर्क - सुभाषचंद्र आचलिया, 9420122047 

शासनाकडून पन्नास टक्के अनुदानावर आधारित पॅकहाऊस संकलन व साठवणूक केंद्र हा फळबागांसाठी उपयुक्त ठरणारा प्रकल्प आहे. उत्पादित फळ व फुलपिकांची स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग आदी गोष्टींमुळे भाव जास्त मिळणार आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी पॅकहाऊसची निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी एक बाभूळगाव तालुक्‍यात आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊन पॅकहाऊसची उभारणी करावी. 

शेतीला जोड पूरक व्यवसायाची यशकथा राशीनच्या मोढळे कुटुंबीयांची

राशीन (जि. नगर) येथील मोढळे बंधूंनी जनावरे संगोपनात चांगले यश मिळवले आहे. त्याबाबत अनुभव सांगताना रमेश म्हणाले, की कोऱ्हाळे (ता. बारामती) येथे गेलो असताना गणपत जगताप यांचा तीनशे गाईंचा गोठा पाहिला. त्यातूनच गोठा व्यवस्थापनाची प्रेरणा मिळाली. प्रथम पाच गाईंची खरेदी करून छपरात गोठा सुरू केला. सन 2007 मध्ये गोठा उभारणीसाठी राष्ट्रीय बॅंकेकडून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये अडीच लाख रुपयांची रक्कम स्वतःजवळची गुंतवून सर्व सुविधांनी युक्त असा गोठा निर्माण केला. पाच गाईंपासून सुरू केलेल्या गोठ्यात आज 109 जनावरे असून, त्यात 80 टक्के होल्स्टिन फ्रिजन, दोन गावरान गाई, चार खोंड, एक गीर अशा विविध जातींचे संगोपन केले आहे. सुमारे वीस वर्षांपासूनचा पारंपरिक गोठा संगोपन व्यवसाय मोढळे कुटुंबीय चालवत आहेत. यात 125 जनावरांच्या क्षमतेचा गोठा "कामधेनू' नावाने उभा केला असून, त्यात 25 वासरांसाठी बंदिस्त गोठा केला आहे. या संपूर्ण गोठ्यात दोन गाईंच्या मध्ये कुंडी असून, त्याद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. स्प्रिंकलरद्वारे गोठ्यातील जनावरे आहे त्याच ठिकाणी धुण्याची सोय आहे. दिवसातून दोन वेळा गाईंना स्नान घातले जाते. घरच्या विहिरीवरून गोठ्यापर्यंत पाइपलाइन केल्याने दररोजच्या 10 ते 12 हजार लिटर पाण्याची सोय झाली आहे. 

चाऱ्याचे नियोजन : 
सुमारे वीस एकरवर चारापिकांची सोय आहे. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात चाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे; मात्र अजून तीन-चार महिने पुरेल इतका चारा आहे. वैरण, मका, ऊस, गोळी पेंड असा चारा प्रत्येकी आठ तासांच्या अंतराने तीन वेळा जनावरांना दिला जातो. एका वेळेस एका गाईस 15 किलो कुट्टी, तीन किलो गोळी पेंड, दोन वेळा आवश्‍यक व्हिटॅमिनसाठी मिनरल मिक्‍श्चर प्रत्येक गाईस 30 ते 35 ग्रॅम दिले जाते. खुराकासाठी 65 हजार रुपयांचे अत्याधुनिक कडबा कुट्टी यंत्र आणले असून, एक तासाला पाच टन चाऱ्याची कुट्टी तयार केली जाते, त्यामुळे जनावरांना वेळेवर चारा मिळतो. 

गोठ्याचे व्यवस्थापन : 
मोढळे यांनी कामधेनू गोठा स्वच्छ, दुर्गंधीमुक्त ठेवला असून, दररोज गोठा स्वच्छ धुतला जातो, त्यामुळे जनावरांना आजारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. वेळच्या वेळी विविध प्रकारचे लसीकरण त्यांना केले जाते. लाळ्या खुरकूत, बुळकांडी आदी रोगांसाठी प्रतिबंधक इलाज केले जातात. गोठा व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेशहून पाच मजूर आणले आहेत. मोढळे देखील गोठ्यात स्वतः राबतात. प्रति कामगार प्रति महिना सहा हजार रुपये पगार दिला देतो. गावरान गाईला खोंड झाले, तर ते 35 हजार रुपयांपर्यंत विकले जाते. जर्सी खोंडापेक्षा गावरान खोंडांना जास्त किंमत मिळते. जातिवंत वळूपासूनची पैदास असेल तर बाजारात चांगली किंमत मिळते. 

दूध शीतकरण केंद्राची निर्मिती : 
मोढळे म्हणाले की गोठा सुरू केल्यावर पहिले सहा महिने एक हजार लिटर दुधाचे संकलन व्हायचे, त्यामुळे शीतकरण केंद्राची गरज भासू लागली. त्यातूनच 2007 मध्ये बारामतीच्या एका कंपनीच्या साह्याने दीर्घ करार करून शीतकरण यंत्र आणले. शीतकरण केंद्र उभे केले. त्यामुळे आमच्याबरोबर परिसरातील शेतकऱ्यांचे दूधही संकलित करता येऊ लागले. आज घरचे पाचशे आणि इतरांचे अडीच हजार लिटर दूध मिळून एकूण सुमारे तीन हजार लिटर दुधाचे संकलन होते. हे दूध बारामतीच्या संस्थेकडे विक्रीला पाठवले जाते. लिटरला 16 रु. दर मिळतो. आठ हजार रुपये दिवसाचे उत्पन्न मिळते. खर्च सव्वा हजार रुपये येतो. सुमारे दोनशे ट्रेलर शेणखत मिळते. साडेतीन हजारांना शेणखताचा एक ट्रेलर याप्रमाणे केवळ शेणखतातून सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र हे खत न विकता ते शेतातच डाळिंब, मका, कडवळ आदी पिकांना वापरल्याने त्यातून उत्कृष्ट चारा मिळतो. आज गोठ्यात 70 टक्के कालवडी व 30 टक्के गाई आहेत. 

डाळिंबातून मिळवले यश 
भगव्या डाळिंबाची शेती, 
कुटुंबाची संयुक्त सुमारे 90 एकर शेती आहे. त्यात केवळ डाळिंब पिकालाच प्राधान्य दिले आहे. अन्य क्षेत्रात मका, कडवळ, तसेच खाण्यापुरती ज्वारी आहे. आर्थिक परिस्थिती बदलवणारे पीक म्हणून 1999 मध्ये अडीच एकर क्षेत्रात भगवा डाळिंबाची लागवड केली. सन 2002 मध्ये पहिले उत्पादन घेतले. ते थेट दिल्ली बाजारपेठेत विक्रीला पाठविले. लागवड करताना शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, बुरशीनाशक मातीत व्यवस्थित मिसळून खड्डे भरून घेतले व रोपांची लागवड केली. सन 2005 मध्ये आठ एकर नवी, तसेच 2009 मध्ये आणखी दहा एकर नवी लागवड केली. सन 2011 मध्ये पुन्हा पाच एकर अशी मिळून सुमारे 25 एकर क्षेत्राची डाळिंब बाग तयार केली. या बागेचे नियोजन मोहन या बंधूंसोबत सतीश मोढळे पाहतात. ते कृषी पदवीधर आहेत. राशीन येथे कृषी साहायकपदी कार्यरत असल्याने लागवडीचे नियोजन चांगल्या प्रकारे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. फळधारणेसाठी छाटणीच्या आधी प्रत्येक झाडाला 40 ते 50 किलो शेणखत, अर्धा किलो पोटॅश तसेच झिंक, फेरस, मॅग्नेशिअम, सल्फर या सूक्ष्म मूलद्रव्यांची मात्रा दिली जाते. गरजेनुसार कीडनाशकांच्या फवारण्या, तसेच पीकपोषणासाठी विद्राव्य खतांचा वापर केला जातो. डाळिंबाचे एकरी सरासरी उत्पादन आठ ते दहा टन आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत घरच्या शेणखतावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे झाडांचे पोषण अधिक चांगले झाल्याचे मोढळे म्हणतात. सध्या फळांची काढणी सुरू असून, किलोला 72 रुपये दर मिळाला आहे. अलीकडील वर्षांत सरासरी दर 55 ते 60 रुपये राहिला आहे. काही वेळा तो 80 ते 90 रुपयेही मिळाला. सांगोला, पंढरपूर, नाशिक असे व्यापारी जागेवर माल खरेदी करतात, त्यामुळे आडत, हमाली व वाहतूक दरात बचत होते. विहीर, जवळून गेलेला कॅनॉल यामुळे पाण्याची सोय आहे. अजून 35 एकर क्षेत्र डाळिंबासाठी वाढवण्यात येणार आहे. मोढळे यांची डाळिंबाची रोपवाटिकाही आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या प्रतिनिधींनी क्षेत्राची संयुक्त पाहणी करून रोपवाटिकेस मान्यता दिली. शासकीय दराप्रमाणे रोप विकले जाते. सध्या 25 रुपये प्रति रोप विक्री केली जाते. 


  • सन 1988 मध्ये रमेश मोढळे यांनी छपरात सुरू केलेला गाईंचा गोठा. 
  • याच गोठ्याचे आज "कामधेनू' नावाने आधुनिक रूपांतर केले आहे. 
  • मोढळे यांच्या कामधेनू गोठ्याला ऑस्ट्रियाच्या अभ्यासक व संशोधक प्रा. मारिया व रोमेला यांनी भेट दिली. 
  • भगव्या डाळिंबाने बहरलेले झाड दाखविताना सौ. मंदोदरी व सतीश मोढळे. 
  • डाळिंब बाजारपेठेत पाठविण्यापूर्वी प्रतवारी करताना मोढळे कुटुंबीय.
संपर्क - सतीश मोढळे - 9423389363 
रमेश मोढळे - 9975315405 

मोसंबीमधील मूळकूज, डिंक्‍या आणि ग्रीनिंग

ट्रिस्टेझा 

ट्रिस्टेझा हा एक विषाणूजन्य रोग असून, तो जवळपास सर्व लिंबूवर्गीय फळपिकांवर आढळून येतो. सोर ऑरेंज खुंटावरील मोसंबी या संयोगात रोगाची लक्षणे सर्वांत तीव्र दिसतात. झाडाची नवीन फूट पूर्णपणे किंवा अपूर्ण अवस्थेत दबून राहते. पाने निस्तेज किंवा त्यावर विविध पिवळ्या रंगाच्या छटा दिसतात. पाने लांब दिशेने परंतु आतील बाजूने कुरळी होतात. पानातील शिरा पिवळ्या दिसतात. काही पानातील शिरा अधिक जाड किंवा फुगलेली दिसतात. नवीन पालवीचे पोषण नीट न झाल्यामुळे पानगळ होते. कलम जोड जवळील सालीच्या आतील भागात सुईने टोकरल्यासारखी खोल व्रण (स्टेम पिट्‌स) आढळतात. पानातील शर्करायुक्त पदार्थ झाडामध्ये साठवले जाऊन यामुळे नवीन पालवी व फुले भरपूर येतात; परंतु अन्नद्रव्यांचे अभिसरणात अडथळा आल्यामुळे फळे अपक्व स्थितीतच वाळतात किंवा गळतात. जमिनीतील ओल कमी झाल्यावर नवीन पाने चटकन वाळतात व काही झाडे एकाएकी कोसळतात. मावा कीटक व विषाणू या रोगाचा प्रसार करतात. रोगग्रस्त मोसंबी झाडातील डोळकाडी कलमे तयार करण्यासाठी वापरल्याने रोगाचा प्रसार होतो. 

व्यवस्थापन-
रोगमुक्त मोसंबी मातृवृक्षातून डोळकाडी कलमे तयार करण्यासाठी वापरावी. विषाणूग्रस्त झाडे बागेतून काढून टाकावीत. विशेषतः नवीन पालवी आल्यावर मावा किडींचे नियंत्रण करावे. रंगपूर लिंबू व सहनशील जातीचा खुंट मोसंबीची कलमे तयार करण्यासाठी वापरावा. कलमे तयार करण्याकरिता वापरण्यात आलेला चाकू, कात्री सोडिअम हायपोक्‍लोराइटच्या द्रावणात (15 मि.लि. प्रति लिटर पाणी) निर्जंतुक करावी. 

मूळकूज, पायकूज व डिंक्‍या-
सुरवातीस रोगग्रस्त झाडाची पाने निस्तेज होऊन नंतर पानगळ होते. झाडाची तंतुमय मुळे कुजतात, अशा मुळांची दुर्गंधी येते. कूज मोठ्या मुळापर्यंत जाऊन नंतर झाडाच्या बुंध्यावर पायकूज होतो. तेथे उभ्या चिरा पडतात आणि त्यातून पातळ डिंकाचा स्राव होतो. पायकूजग्रस्त सालीखालचा भाग गडद तपकिरी रंगाचा होतो. झाडाअंतर्गत अन्नद्रव्यांचे अभिसरण मंदावल्यामुळे अकाली बहर येऊन फळे अपक्व स्थितीत गळतात. नवीन फुटलेल्या फांद्या हळूहळू सुकतात. ही मर बुंध्याकडे सरकत जाते आणि झाडाचा ऱ्हास होतो. जास्त पावसाळी वातावरणात फळकूज आणि पानगळ होते. 

हा रोग फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. या बुरशीचा प्रसार पावसाच्या पाण्यामार्फत किंवा सिंचनाच्या पाण्यामार्फत होतो. जंतूग्रस्त रोपे लागवडीस वापरल्याने नवीन लागवडीत रोगाचा शिरकाव होतो. जमिनीत सतत ओल राहणे किंवा मातीचे तापमान 24-32 अंश सेल्सिअस रोगजंतूच्या वाढीस अनुकूल आहे. 

व्यवस्थापन-
अतिभारी व निचरा नसलेल्या जमिनीत लागवड करू नये. लागवड करतेवेळी कलम जोड जमिनीपासून 20-25 सें.मी. उंचीवर असावा. आवश्‍यकतेपेक्षा जास्त पाणी झाडास देऊ नये, खोडास पाणी लागू देऊ नये, झाडास दुहेरी आळे (बांगडी) पद्धतीने पाणी द्यावे. मूळकूजग्रस्त मुळे छाटून त्या ठिकाणी ताम्रयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून मुळांवर शिंपडावे. यानंतर मातीने मुळे झाकावीत. पावसाळ्यापूर्वी फोसेटील-एल (30 ग्रॅम/ 10 लिटर पाणी) एक फवारणी व पावसाळ्यानंतर जमिनीपासून 60 ते 90 सें.मी. उंचीपर्यंत झाडांच्या खोडावर बोर्डो पेस्ट(1 किलो मोरचूद + 1 किलो चुना + 100 लि. पाणी) लावावी. पायकूजग्रस्त भाग चाकूने खरडून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट जमिनीपासून 60 ते 90 सें.मी. उंचीपर्यंत पावसाळ्यापूर्वी व नंतर लावावे. 20 ग्रॅम मॅन्कोझेब अधिक मेटॅलॅक्‍झिल हे संयुक्त बुरशीनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडास आवश्‍यकतेप्रमाणे (20-30 लिटर) द्रावण खोडाशेजारी ओतावे. फळकूज किंवा पानगळ नियंत्रणासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाची (मोरचूद 1 किलो + चुना 1 किलो + पाणी 100 लिटर) फवारणी करावी. आंतरमशागत करताना झाडाच्या खोडास, फांद्यांना आणि मुळांना जखम होऊ देऊ नये. सहनशील खुंटाचा कलम तयार करण्यासाठी वापर करावा. उदा. रंगपूर लाइम. 

ग्रीनिंग-
ग्रीनिंग हा एक अणुजिवाणूजन्य रोग आहे. लिंबूवर्गीय फळझाडांपैकी मोसंबी फळपिकावर त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव होतो. सुरवातीस झाडातील एखाद्या मोठ्या फांदीतील पाने निस्तेज व गर्द पिवळी दिसतात. पक्व पानातील शिरा पिवळ्या होतात किंवा पक्व पानात हिरवे-पिवळे चट्टे दिसतात. काही पानांच्या शिरेच्या दोन्ही बाजू पिवळ्या होऊन कडा फिक्कट पिवळ्या दिसतात (सूक्ष्म अन्नद्रव्य जस्ताच्या कमतरतेसारखी लक्षणे दिसतात.) नवीन फुटीमधील पाने लहान आकाराची, जाड आणि खरबरीत असतात. तसेच पाने सरळ दिशेने वाढतात. काही पाने पिवळी होऊन त्यामध्ये गडद हिरवे ठिपके (बेटे) दिसतात. अशा फांद्या खुरट्या राहतात. झाडांना अवेळी बहर येतो, फळे लहान व विकृत आकाराची, रंगाने एकसारखी नसलेली, संख्येने कमी, चवीला कडवट आणि त्यातील बी अनेकदा अपक्व राहतात. सूर्यप्रकाशात उघडी असलेली फळे पिवळी होतात आणि सावलीतील फळे हिरवी राहतात. "सिट्रस सिला' या रस शोषणाऱ्या किडीमार्फत या रोगाचा बागेत प्रसार होतो. रोगग्रस्त झाडातील डोळकाडी मोसंबी रोपवाटिकेत कलम तयार करण्यासाठी वापरल्यास या स्रोतांतून रोगाचा प्रसार होतो. रोपवाटिकेतून रोगग्रस्त कलमे नवीन लागवडीकरिता वापरल्यास अशा भागात रोगाचा शिरकाव होतो. 

व्यवस्थापन-
मोसंबीचे कलम तयार करण्यासाठी रोगमुक्त मातृवृक्षातून डोळकाडी वापरावी. रोगग्रस्त झाडे बागेतून काढून टाकावी. सिट्रस सिला कीटकांचा नवीन पालवी आल्यावर बंदोबस्त करावा. संसर्गदूषित भागातून डोळकाडी किंवा कलमे नवीन भागात लागवडीसाठी वापरू नये. मोसंबी कलम तयार करण्याकरिता वापरण्यात आलेले चाकू, कात्री सोडिअम हायपोक्‍लोराईटच्या द्रावणात (15 मि.लि. प्रति लिटर पाणी) निर्जंतुक करावी.