Tuesday, July 10, 2012

20 गुंठ्यांतील शेवग्याने दिले लाखाचे उत्पन्न

अनेक शेतकरी प्रगतिशील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहून प्रेरणा घेतात व आपल्यासाठी नवे असलेल्या पिकाचा प्रयोग करून पाहतात. अर्थात यश-अपयश या पुढील गोष्टी असतात. मात्र प्रयत्नवादातून काही ना काही अनुकूल असे पदरी पडू शकते. सांगली जिल्ह्यातील कुंडल (ता. पलूस) येथील सूतगिरणी कामगार शहाजी लाड सांगली येथील एका सूतगिरणीमध्ये सुमारे 22 वर्षे नोकरीस होते. गिरणी बंद पडल्यानंतर ते आपल्या गावी कुंडलला परतले. वडिलोपार्जित त्यांची तीन एकर शेती पलूस परिसरात ती आहे. संपूर्ण जमीन खडकाळ स्वरूपाची आहे. या ठिकाणी शेती विकसित करण्यासाठी प्रथम त्यांनी कूपनलिका व विहीर खोदून पाण्याची सोय केली. 

साधारणपणे 20 ते 25 वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्तीच्या काळातील आयुष्य निवांत जगण्याची इच्छा बहुतेकांना असते. लाड यांनी मात्र शेतीतच आपले जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. मुलगा व पत्नीचीही त्यांना साथ मिळाली. 

लाड यांनी वास्तव्यासाठी शेतातच घर बांधले आहे. त्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट स्थापन केला आहे. त्या गटाचे लाड सदस्य आहेत. या गटाद्वारे चर्चासत्रे, शेतीच्या विविध योजनांची माहिती याची चर्चा होत असे. त्यातूनच शेवगा शेतीची माहिती लाड यांना मिळाली. पूर्वी शेताच्या बांधावर किंवा घराच्या परसात शेवग्याचे झाड अशी संकल्पना होती. खुद्द लाड यांचीही अशीच धारणा होती. मात्र सातारा जिल्ह्यातील खंडाळा- पारगाव परिसरातील एका प्रयोगशील शेतकऱ्याची शेवगा पिकाची यशकथा त्यांच्या पाहण्यात आली. तेथे जाऊन त्यांनी लागवड, पिकाचे संगोपन या विषयी माहिती घेतली. त्यातून हे पीक फायदेशीर ठरेल असे वाटल्यानंतर त्याची लागवड करण्याचा निर्णय पक्का केला. 

शेवगा पिकाचे नियोजन 
लाड यांच्याकडे ऊस, हळद अशी पिके आहेत. उसाचे उत्पादन तसे कमी म्हणजे एकरी 35 ते 40 टनांपर्यंतच. त्यांची एकूण शेती तीन एकर. त्यामुळे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने काही नव्या पिकाची वा प्रयोगाची गरज होतीच. 

मुलगा वैभव परिसरातील साखर कारखान्यात नोकरीस आहे. त्याला मदतीला घेतले. शेवगा पिकासाठी वीस गुंठे जमीन निवडली. जमिनीची नांगरट व चांगली मशागत केली. तीन फूट अंतराच्या सऱ्या सोडल्या. सप्टेंबर- ऑक्‍टोबर 2011 च्या पहिल्या आठवड्यात या क्षेत्रात कांदा लावला. एका आठवड्याने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून आणलेल्या कोइमतूर जातीच्या शेवग्याच्या बियाण्यांची टोकण केली. दोन झाडांतील अंतर पाच फूट व दोन ओळींतील अंतर सहा फूट ठेवले. आठ ते दहा दिवसांत बियाण्यांची उगवण झाली. गरजेप्रमाणे पाण्याच्या पाळ्या दिल्या. तीन महिन्यांनी कांद्याचे पीक काढले. त्या वेळी शेवग्याच्या झाडाची उंची साडेतीन फुटाच्या आसपास होती. फुटवे वाढावेत यासाठी शेंडा खुडण्यात आला. 

खत व्यवस्थापन 
शेवगा पिकाला रासायनिक खतांपेक्षा जैविक खतांवर भर दिला. शेण, गोमूत्र, गूळ, डाळीचे पीठ याचे मिश्रण करून कुजवून स्लरी तयार केली. दर पंधरा ते वीस दिवस या प्रमाणे ही स्लरी पाण्याद्वारे किंवा झाडाभोवती गोलाकार पद्धतीने दिली. पीक संरक्षणात कडुनिंबावर आधारित कीडनाशकाचा वापर केला. 
मार्केटिंग सुमारे साडेचार महिन्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनास सुरवात झाली. शेंगांनी लगडलेली झाडे पाहून लाडही भारावले. एकेका झाडाला सत्तर ते ऐंशीपर्यंत शेंगांची संख्या होती. शेंगांची लांबी तीन ते चार फुटांपर्यंत होती. रंगही हिरवा होता. परिसरातील इस्लामपूर, सांगली, कऱ्हाड, विटा येथील बाजारात सौद्याद्वारे शेंगाची विक्री होत होती. गोणपाट जमिनीवर अंथरून त्यात या शेंगा बांधल्या जात होत्या. चाळीस ते पन्नास किलोचे पॅकिंग तयार केले जात होते. सुरवातीला शेंगांचा दर प्रति किलो 20 रुपये होता. मध्यंतरी तो तीस रुपयांपर्यंतही गेला. सध्याही एवढाच मिळत आहे. सरासरी दर 23 रुपये मिळाला. स्थानिक बाजारात लाड यांच्या घरातील महिला सदस्यांनी शेंगांची विक्री केली. मंडईत प्रति तीन ते चार शेंगांना 10 रुपये या भावाने आठवडा बाजारात 50 ते 60 किलो शेंगा विकल्या जात. वाहतूक, विक्रीसाठी लागणारा वेळ व तुलनेत विकला जाणारा माल हे गणित परवडणारे नव्हते. यासाठी सौद्यातच शेंगा विक्रीला प्राधान्य दिले. काही वेळा व्यापाऱ्यांनी जागेवरही खरेदी केली. 

धान्य महोत्सवातही सहभाग 
सांगलीच्या कृषी विभागातर्फे शेतकरी ते थेट ग्राहक असा धान्य महोत्सव झाला. तेथे शेंगा विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. 

जमाखर्च (रुपयांत) 
मशागत- 1000 
बियाणे- 1500 
खते, कीडनाशके- 3750 
स्लरी - 1000 
भांगलण व काढणी - 2300 
आंतरमशागत - 1000 
वाहतूक - 3000 
बारदान खर्च - 450 


एकूण- 14,000 रु. 

एकूण हंगामात लाड यांना प्रति किलो सरासरी 23 रुपये दर मिळाला. एकूण क्षेत्रातून चार टनांपर्यंत माल निघाला. साधारणपणे 96 हजार रुपये मिळाले. कांद्याच्या आंतरपिकातून 16 हजार रुपये मिळाले. एकूण एक लाख 12 हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले. उत्पादन खर्च 14 हजार रुपये वजा जाता 98 हजार रुपये नफा मिळाला. युवा शेतकरी रवींद्र लाड, कृषी विभाग यांचेही सहकार्य लाड यांना या प्रयोगात मिळाले. 

यांत्रिकीकरण 
लाड ज्या गटाचे सदस्य आहेत त्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 14 छोटे पॉवर टिलर खरेदी केले आहेत. त्याद्वारे शेवगा तसेच ऊस शेतीतील आंतरमशागत केली जाते. त्याद्वारे भांगलणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. 
लाड यांना शेवग्याच्या खोडवा राखायचा आहे. जमिनीपासून एक फूट अंतरावर जेथून फुटवे फुटले आहेत त्यापासून थोड्या अंतरावर फांद्यांची छाटणी त्यांना करायची आहे. मात्र खोडवा पिकातून अपेक्षित उत्पादन मिळेल काय या विचारात ते आहेत. त्यासाठी ते सल्लाही घेणार आहेत. 

लाड यांच्या शेती नियोजनातील वैशिष्ट्ये- 
आंतरपिकातून मुख्य पिकातील उत्पादनखर्च कमी करणे 
रासायनिक खतांचा मर्यादित वापर 
जैविक स्लरी देण्यावर भर 
यांत्रिकीकरणाला सुरवात 

संपर्क - शहाजी लाड- 9975111300 
वैभव लाड- 9623443824 


Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120706/5554582116795004730.htm