Thursday, April 5, 2012

ठिबकद्वारे खते देण्याची कोणती यंत्रणा असते?

ठिबक सिंचनाचे फायदे पूर्णत: मिळण्यासाठी पिकास आवश्‍यक असलेली खते ठिबक संचाद्वारे देणेच जास्त योग्य. सिंचनाच्या पाण्यासोबतच खते देण्याच्या या प्रक्रियेस फर्टिंगेशन म्हणतात. ठिबक सिंचनाद्वारे खते देण्यासाठी खताची टाकी (फर्टिलायझर टॅक), व्हेंच्युरी, फर्टिलायझर इंजेक्‍शन पंप व एचटीपी पंप वापरले जातात.

खताची टाकी (फर्टिलायझर टॅंक)
यामध्ये एक स्टीलची/ लोखंडी टाकी फिल्टरच्या पूर्वी (इनलेटला) जोडलेली असते. या टाकीचे कार्य व रचना सोपी असते. या टाकीमध्ये खताचे द्रावण किंवा विद्राव्य खते ठिबक सिंचनामधून पाण्याबरोबर दिली जातात.
खताच्या टाकीची क्षमता 60 लिटरपासून 100 लि. पर्यंत असते. फक्त टाकीमधील पाणी उलट प्रवाहाच्या दिशेने विहीर, तलाव, नदी आदी पाण्याच्या स्त्रोतामध्ये मिसळू नये यासाठी वितरण नळीवर नॉन रिटर्न व्हॉल्व्ह (झडप) बसविणे आवश्‍यक आहे. फर्टिलायझर टॅंकरद्वारे खते देण्याची पद्धत सर्वांत सोपी असली तरी त्यामुळे सर्व झाडांना समप्रमाणात खते दिली जात नाहीत.

व्हेंच्युरी
व्हेंच्युरीद्वारे खते देणे ही सर्वांत योग्य, कार्यक्षम, खात्रीशीर व सोपी पद्धत. व्हेंच्युरी हे अत्यंत सोपे व योग्य साधन असून सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहे. याचा उपयोग खते देण्यासाठी व आम्ल व क्‍लोरिन प्रक्रिया करण्यासाठीही केला जातो. व्हेंच्युरी ही फिल्टरच्या पूर्वी बसवून यामध्ये पाणी देण्याच्या मुख्य पाइपला व्हेंच्युरी जोडली जाते. खतमिश्रीत पाण्यात व्हेंच्युरीचे एक टोक सोडून दुसरे टोक मुख्य पाइपला जोडले जाते. मुख्य पाइपवरील व्हॉल्वच्या साहाय्याने दोन्ही बाजूंनी पाण्याच्या दाबामध्ये फरक निर्माण केला जातो व खतमिश्रित पाणी मुख्य प्रवाहात हळूहळू सोडता येते. व्हेंच्युरीच्या शोषणाचा दर व्हेंच्युरीच्या आकारानुसार 30 ते 1500 लिटर प्रती तास एवढा असतो. हा दर पाइपलाइनवर बसविलेल्या व्हॉल्व्हद्वारे कमी जास्त करता येतो. व्हेंच्युरीच्या आत जाणारे पाणी व बाहेर येणारे खत मिश्रित पाणी यांच्या मार्गाजवळ दाब अनुक्रमे 1.5 कि.ग्रॅम आणि 0.75/1 कि. ग्रॅम प्रती चौ.से.मी. असावा. व्हेंच्युरी इंजेक्‍टर हे 0.75 1.0, 1.5 व 2 इंच आकारामध्ये उपलब्ध असतात. पाण्यात विरघळणारी सर्व खते या प्रक्रियेने पिकांना देता येतात.

फर्टिलायझर इंजेक्‍टर पंप
या प्रकारामध्ये खतांचे द्रावण टाकीत किंवा बादलीत तयार केले जाते व इंजेक्‍टर पंपाच्या साहाय्याने ठिबक सिंचनाद्वारे पिकांना दिले जाते. सध्या बाजारात या पंपाचे तीन मॉडेल उपलब्ध आहेत. त्यांचा खते शोषून घेण्याचा दर ताशी 40, 160 व 400 लिटर एवढा आहे. फर्टिलायझर इंजेक्‍टर पंपाने पिकांना योग्य तीव्रतेची व अत्यंत तंतोतंत दिली जातात.

एचटीपी पंप
शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणारा एचटीपी स्प्रे पंप वापरून देखील विद्राव्य खते ठिबक सिंचनामधून देता येतात. यासाठी खताचे द्रावण किंवा विद्राव्य खते, पंपाने शोषण करून ठिबक संचाच्या मुख्य पाणी पाइपमध्ये मिसळण्यात येतात व पिकांना पाण्याबरोबर दिली जातात.
फर्टिगेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या विद्राव्य खतामध्ये खालील गुणधर्म असणे आवश्‍यक आहे,
- विद्राव्य खते संपूर्णपणे पाण्यात विरघळणारी असावीत.
- विद्राव्य खते आम्लधर्मी असावीत.
- विद्राव्य खते घन स्वरूपात उपलब्ध असावी यामुळे हाताळणी व वाहतूक करण्यासाठी सुलभ असतात.
- विद्राव्य खते क्‍लोराईडस व सोडियमसारख्या हानिकारक मूलद्रव्यांपासून मुक्त असावीत.
- विद्राव्य खते पाण्यात विरघळल्यावर साका तयार होऊ नये.
- विद्राव्य खतामध्ये दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध असावीत.

Source link: http://www.agrowon.com/Agrowon/20120323/5360225276973058954.htm

जमीन व्यवस्थापन

तलावातील गाळाचा वापर कसा करावा?

तलावात जमा झालेल्या गाळमातीत पिकांना पोषक अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतातील पिकांच्या वाढीसाठी फार उपयोगाची आहे. गाळमातीच्या वापरामुळे हलक्‍या व मध्यम जमिनीची कमी असलेली सुपीकता वाढविता येतेच; परंतु तिची ओलावा साठवण क्षमतासुद्धा पूर्ववत वाढविली जाते, तसेच अशा गाळमातीत नैसर्गिक अन्नद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ आणि चिकण मातीचे प्रमाण जास्त असते. या सर्व बाबी विचारात घेता गाव तलावात असणारा गाळ दर पाच वर्षांनी उन्हाळी हंगामात काढून तो हलक्‍या ते मध्यम जमिनीत योग्य प्रमाणात मिसळावा. त्यामुळे तलावाची कमी झालेली पाणी साठवण क्षमता पूर्ववत ठेवली जाते.

प्रत्येक शेतात गाळ वापराची मर्यादा निश्‍चित करणे ही आवश्‍यक महत्त्वपूर्ण गरज आहे. जी गाळमाती वापरावयाची आहे तिची प्रत आणि ज्या ठिकाणी गाळमाती वापरावयाची आहे, त्या शेतजमिनीचे माती परीक्षण करणेही तितकेच आवश्‍यक आहे. योग्य प्रमाणात गाळमातीच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश अन्नद्रव्याचे प्रमाण जादा दिसून आले. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून शिफारशीत खत कमी करता येणे शक्‍य आहे.
शेतात उपयोगात आणावयाच्या गाळमातीचे आणि ज्या शेतात माती वापरावयाची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे भौतिक व रासायनिक गुणधर्मांचे पृथक्करण करणे आवश्‍यक आहे. त्यातील चिकण मातीचे प्रमाण तपासावे.

शिफारशीत प्रमाणात वापरा गाळमाती
श्रसर्वसाधारण शेतकरी तलावामधील साठलेली गाळमाती फळबाग लागवड करताना खड्डे भरण्यासाठी वापरतात किंवा उथळ हलक्‍या जमिनीत सुपीकता वाढविण्याच्या उद्देशाने शेतात पसरतात. गाळमाती टाकत असताना तिच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केला जात नाही. ही गाळमाती टाकताना निरनिराळ्या प्रमाणात टाकली जाते. जमिनीच्या गरजेचा विचार केला जात नाही. त्यामुळे काही वेळा जास्त प्रमाणात गाळमातीचा वापर केला गेल्यास अशा जमिनी पाणथळ किंवा चोपण होण्याचा धोका संभवतो.

- फक्त गाळमाती जमा करून शेतातील मातीत चांगली मिसळावी. गाळमातीचा वापर करताना फक्त हलक्‍या आणि कमी पाणी साठवणक्षमता असलेल्या जमिनीस प्राधान्य द्यावे. गाळमाती व शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार गाळ वापर मात्रा निर्धारित करावी.
- मार्च ते मे महिन्यात पाणी साठवण पद्धती कोरड्या पडतात, त्याच वेळी साठवण पद्धतीतून गाळमाती बाहेर काढून शेतात पसरावी.
- फळबाग लागवड करताना गाळमाती, खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेतात उतारास आडवे चर खोदून त्यामध्ये भरावी.
- ज्या गाळमातीचा सामू 8.5 पेक्षा जास्त व विद्युत वाहकता 2.5 डेसी सायमन प्रति मीटर जास्त आहे अशी गाळमाती शेतात पसरू नये. पाणी साठवण पद्धतीच्या काठावरची माती खोदून शेतात पसरण्यासाठी वापरू नये. चांगल्या प्रतीची गाळमाती विटा तयार करण्यासाठी किंवा बिगर शेतीसाठी वापरू नये. चुनखडीयुक्त गाळमाती शेतात पसरविण्यासाठी वापरू नये.

Source link: http://www.agrowon.com/Agrowon/20120326/4933605461501104166.htm