Monday, June 11, 2012

वाढली पाहिजे शेतकऱ्याची पत


शेतीतले सर्व खर्च भरमसाट वाढत असतानाच त्यात भर पडतेय दुर्लक्ष होत जाणाऱ्या मनुष्यबळाची! पंजाब असो वा महाराष्ट्र, मजूर मिळत नाही आणि स्वतःला कामे होत नाहीत म्हणून शेती बटाईने देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यंदाच्या पाडव्याला मराठवाड्यात चाळीस ते साठ हजार रुपये वर्षाला देऊनही सालगडी मिळणे अवघड झाले होते. रोजी दोनशे रुपये मिळूनही मजूर शेतावर येण्यास तयार नाही. त्यापेक्षा कमी रोजी मिळूनदेखील कुरिअर सेवा, चहाची टपरी, वडापावचा गाडा या कामांना पसंती दिली जाते. याचे कारण एकमेव आहे. शेतावर काम करण्याला प्रतिष्ठाच नाही, हा संदेश खोलवर गेला आहे. त्याचा फटका सध्या शेतीला बसत आहे. शेतीकामासाठी मजुरी वाढत चालली आहे, एकंदर उत्पन्नाच्या पन्नास टक्के वाटा मजुरीसाठी जात आहे, मजूर माजले आहेत, असा सूर यातून अजिबात आळवायचा नाही. श्रमासाठी त्यांना तेवढा मोबदला आवश्‍यकच आहे; परंतु या प्रक्रियेत उत्पादन खर्चात भरमसाट वाढ होत आहे. 
शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ होण्यास खत व कीडनाशके वापरण्याची पद्धत देखील कारणीभूत आहे. आपली हरित क्रांती ही केवळ उत्पादनवाढीपुरतीच राहिली. त्याकाळी विज्ञान प्रसारकांनी काटेकोरपणा शिकवला नाही. पुढे शेती प्रशिक्षण व प्रसार कार्यक्रमच गुंडाळला गेला. शेती व्यवहार हा पूर्णपणे व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेला. बियाणे, खते, कीडनाशके यांचा वापर किती करावा, याचा सल्ला विक्रेता देतो (डॉक्‍टरची फी परवडत नाही, खोकला - सर्दीचा खर्च पाचशेपर्यंत जातो, त्यापेक्षा विक्रेत्याच्या सल्ल्याने औषध घेणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे, त्याच पद्धतीने). कित्येक गावांमध्ये विक्रेता हाच सावकारसुद्धा असतो. तंत्रज्ञान व्यापाऱ्यांच्या तावडीत गेले आणि हकनाक बदनाम झाले. पाणी असो, खत वा कीडनाशक; या सगळ्यांच्या वापरात मोकाट पद्धत रूढ झाली. कुठेही, कितीही, कधीही अशी रीत झाली. नासाडीची पर्वा नाही. रासायनिक खत वापरण्याचीसुद्धा एक शास्त्रीय रीत आहे. प्रत्येक वनस्पतीच्या मुळांचं क्षेत्र (रूट झोन) भिन्न असतं. त्याची माहिती घेऊन व मातीची तपासणी करून खत घातल्यास उपयोग होतो, नाही तर खत वाया जातं. आपल्याकडे शेतीमध्ये ज्ञानाचा वापर अजिबात होत नाही. विक्रेता सांगतो तेवढी पोती खत ओतलं जातं, शिवाय शेजाऱ्यांपेक्षा जोमदार पीक यावं म्हणून आणखी मात्रा टाकली जाते. या खताच्या नासाडीला विज्ञान जबाबदार नाही. रासायनिक खताचा वापर वाढण्याचं दुसरं कारण खताचे उत्पादन व विक्रेते हे आहेत. त्यांचा खप कसा वाढेल याची गणितं त्यांना चोख माहीत असतात. गावात स्थानिक पुढाऱ्यांच्या मताला खूप महत्त्व असतं. त्या पुढाऱ्याला हाताशी धरून कंपन्या शेतकऱ्यांच्या गळ्यात रासायनिक खतं व कीडनाशकं मारतात. बिचाऱ्या शेतकऱ्यालाही वाटत राहतं, "नवीन खत घातलं की पीक जोमानं येईल आणि कीडनाशक फवारलं की कीड नाहीशी होईल.' या सर्व प्रकारांत अज्ञान व माहितीचा अभाव हे मूळ कारण आहे. परिणामी शेतातलं उत्पादन विशेष वाढत नाही, खत व कीडनाशकांवरील खर्च मात्र वाढत जातो. देशात दर एकरी खताची नासाडी किती होते याचा अंदाज घेण्यासाठी 2001 मध्ये राष्ट्रीय सर्वेक्षण करण्यात आलं. दर एकरी दहा हजार रुपयांची खतं वाया जातात, अशी धक्कादायक माहिती त्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून मिळाली. भारतामध्ये दर हेक्‍टरी सुमारे एक हजार रुपयांचे कीडनाशक देखील वाया जाते. मोकाट शेतीचे पर्यावरणावर भीषण परिणाम झाले. देशातील तेरा कोटी हेक्‍टर जमीन (एकंदर तेहतीस कोटी हेक्‍टर जमिनीपैकी) खराब झाली आहे. वारा, अति पाणी, मीठफुटी या कारणांमुळे माती अशी अनमोल संपदा नष्ट होत आहे. मानवी शरीरावरील त्वचा सोलून काढल्यावर काय होईल? जखमा वाढतील, हेच शेतीबाबतही घडत आहे. मातीची धूप हे शेतीसमोरील भीषण संकट आहे. 

"मानसिक यातनांमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे शारीरिक यातना,' हे कार्ल मार्क्‍स यांचं निदान भारतीय शेतकऱ्यांकरिता 300 वर्षे अबाधित सत्य राहिलं आहे. कितीही यातना झाल्या तरी शेती काही सोडता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आयुष्यालाच सोडचिठ्ठी देण्याचं ठरवलं. 

भारतामधील शेतकऱ्यांकरिता एकविसाव्या शतकाची पहाट हे भयंकर दुःस्वप्न ठरलं. 2002 ते 2007 या काळात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व पंजाब राज्यातील सुमारे 17,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. केवळ 2006 या वर्षात शेती आतबट्ट्याची होऊन कर्ज फेडण्याची उमेद संपली. कुटुंबाला पोसण्यासाठीच्या यातना सोसण्याची क्षमता न उरल्याने महाराष्ट्रातील 4,453 शेतकऱ्यांनी मरण कवटाळले. या प्रत्यक्षातील आत्महत्या होत्या. असफल, अप्रत्यक्ष व होऊ घातलेल्या आत्महत्या गावागावांत दिसू लागल्या आहेत. प्रसारमाध्यमे ढिम्म होती. "द हिंदू' दैनिकाचे पत्रकार पालागुम्मी साईनाथ यांनी अनेक लेखांमधून शेतकऱ्यांची दैन्यावस्था लोकांपर्यंत पोचवली, त्यामुळे केंद्र व राज्य सरकार हादरून गेले. 

शेतकऱ्याची पत - 
भारताच्या स्वातंत्र्याची सत्तावन्न वर्षे उलटल्यानंतर 2004 मध्ये पहिला शेती आयोग स्थापला गेला. शेतीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने 2007 मध्ये शेती अहवाल सादर केला. वरच्यावर शेतजमिनीचा आकार आकसत आहे. 11 टक्के शेतकरी भूमिहीन आहेत. 40 टक्के शेतकऱ्यांना एक एकरपेक्षा कमी जमीन कसावी लागते. 34 टक्के शेतकऱ्यांकडे एक ते पाच एकर जमीन आहे. केवळ 12.6 टक्के शेतकरी पाच एकरपेक्षा अधिक जमीन बाळगून आहेत. सर्वेक्षणातील ही माहिती सांगून डॉ. स्वामिनाथन जमिनीची पुनर्रचना करण्याचे आवाहन करतात. "लागवडीखालील जमीन व जंगलांचा अकृषक कारणांकरिता उपयोग रोखला पाहिजे. विशेष आर्थिक क्षेत्र (स्पेशल इकॉनॉमिक झोन)पेक्षा विशेष कृषी क्षेत्र (स्पेशल ऍग्रिकल्चर झोन) अत्यंत महत्त्वाचे आहेत. अत्यल्पभूधारक व भूमिहीनांना पडीक जमीन कसण्यास द्यावी. जंगलात राहणाऱ्या आदिवासींना वनसंपत्तीचा लाभ घेऊ द्यावा. जमिनीचा आकार, खरेदीचा उद्देश व खरेदीदार यांचे स्वरूप विचारात घेऊन शेतजमिनीच्या विक्रीवर नियंत्रण आणले जावे,' अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली आहे. 

बॅंकेत शेतकऱ्याला यत्किंचित पत नाही. सहज व माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध होत नाही. साहजिक सावकार हाच मार्ग उरतो. दरमहा तीन ते पाच टक्‍के म्हणजे दरसाल 36 ते 60 टक्के व्याजाने कर्ज घेणे भाग पडते. शेतीमध्ये तोटा भरून काढण्याकरिता कर्ज, चक्रवाढ व्याजाचा वक्र चक्रव्यूह, चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे थेट मृत्यू! हा अटळ रस्ता चुकवण्याकरिता डॉ. स्वामिनाथन यांनी काही उपाय सुचवले. शेतकऱ्यांना दरसाल चार टक्के सरळ व्याजाने सहज कर्ज उपलब्ध व्हावे, अल्प दरात देशभरात सर्व पिकांकरिता विमा योजना चालू करावी, कित्येक शेतकऱ्यांना आरोग्य उपचारासाठी कर्ज काढावे लागते. आरोग्य विमा योजना देशभर चालू करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी घेऊन प्रत्येक राज्याने शेती आयोग स्थापन करावेत. अवर्षण वा अतिवृष्टीनंतर तातडीने मार्गदर्शन करण्यासाठी आपत्तीप्रवण गावांतून सल्ला देणारी ज्ञान केंद्रे चालू करावीत. शेतीमधील उत्पादकता वाढवण्याकरिता उत्तम दर्जाचे संशोधन व पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. 

"जागतिक पातळीवरील शेतीमालाच्या उत्पादकतेशी तुलना केल्यास भारत कमालीचा पिछाडीवर आहे, हे स्पष्ट जाणवते. इंडोनेशियासारखा देश दर हेक्‍टरी 6,622 किलो तांदूळ पिकवतो; आपण मात्र 2,500 किलोच्या आसपास घोटाळत आहोत. त्यात सुधारणा होण्यासाठी देशभर माती तपासणीनंतर योग्य खत उपलब्ध करून दिले पाहिजे,' अशा शिफारशी केल्या आहेत. शेतीमालाचा भाव ठरवणे ही सरकारने शेतकऱ्यांची चालवलेली क्रूर चेष्टा आहे. एकच भाव सरसकट लागू करता येत नाही. प्रत्येक ठिकाणची व प्रत्येक पिकाची मजुरी वेगळी असते. बैलजोडीचे, ट्रॅक्‍टरचे भाडे भिन्न असते, हे गृहीत धरून उत्पादन खर्च काढला पाहिजे. "उत्पादन खर्चावर किमान 50 टक्के नफा देऊन शेतीमाAgriculture Informationलाची आधारभूत किंमत ठरवावी,' अशी सूचना शेती आयोगाने केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो धूळखात पडून आहे. त्यावरून सरकारची आस्था साफ दिसते. विरोधी पक्ष सरकारला जाब विचारत नाहीत. संसदेत शेतीप्रश्‍नावर रणकंदन होताना दिसत नाही. 


Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120612/5546044929795757382.htm

संत्रा बागेत केले कपाशीचे पीक यशस्वी


अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई येथील एका शेतकऱ्याने नवीन संत्रा बागेत कापसाचे आंतरपीक घेऊन चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. फरदडसहित एकरी 35 क्विंटल उत्पादन त्यांनी घेतले. कापसाला दरही चांगला मिळाल्याने हे पीकही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरले आहे. 
प्रा. जितेंद्र दुर्गे,  प्रा. डॉ. विजेंद्र शिंदे 

बीटी कपाशीचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक शेतकरी विविध पद्धतीने प्रयोग करताना दिसत आहेत. 
यामध्ये काहीजण लागवडीचे अंतर बदलून पाहतात, तर काहीजण ठिबक सिंचन, तसेच खते, पीक संरक्षण, सूक्ष्म 
अन्नद्रव्ये, लाल्या विकृतीचे नियंत्रण यावर अधिक भर देऊन उत्पादनवाढ साधण्याचा प्रयत्न करतात. 

अमरावती - मोर्शी रोडवरील नेरपिंगळाई हे गाव तसे पाहिले तर पिंगळाई देवीचे मंदिर, तसेच भाजीपाला उत्पादनासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. भाजीपाला पिकांसोबतच या भागात संत्रा, सोयाबीन, तसेच कपाशीचे पीकसुद्धा घेतले जाते. गावातील प्रगतिशील शेतकरी गोपाल दामोदर शार हे परिसरात कपाशीसोबतच सर्वच पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ते शेती करतात. बीटी कपाशी घेण्यापूर्वी ते कपाशीचे एकरी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन घेत असत. आताही बीटी कपाशी घेऊ लागल्यापासून त्यांनी उत्पादन चांगले ठेवण्यात सातत्य ठेवले आहे. शार यांची एकूण जमीन सुमारे साडेपाच एकर आहे. त्यामध्ये ते कपाशीसोबत सोयाबीन, मिरची, कांदा, भुईमूग आदी पिके घेतात. पाण्यासाठी त्यांच्याकडे विहिरीची सोय आहे. ठिबक सिंचनाच्या ऐवजी त्यांनी स्प्रिंकलरची सोय केली आहे. सन 2009 मध्ये त्यांनी संत्रा बाग लावली. हे क्षेत्र सुमारे अडीच एकरांपर्यंत आहे. या नव्या बागेत सध्या उत्पादन घेण्यासाठी नगदी पिकाचा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे 5.5 × 1.5 फूट या लागवडीच्या अंतरानुसार बीटी कपाशीची आंतरपीक म्हणून लागवड केली. शार शक्‍यतो पूर्वहंगामी लावणीवर अधिक भर देतात. मागील वर्षाच्या खरिपात मेचा अखेरचा आठवडा ते जूनचा पहिला आठवडा या दरम्यान त्यांनी कपाशीचे नियोजन केले. लागवड कोरड्यात करून घेतली. दोन झाडांतील दीड फूट अंतरानुसार एका ठिकाणी एक बी डोबून घेतले. त्यानंतर स्प्रिंकलरच्या साहाय्याने शेत ओलावून घेतले व कपाशीची उगवण करून घेतली. 

उगवणीनंतर तीन - चार दिवसांनी स्प्रिंकलरच्या साहाय्याने हलके पाणी दिले. उगवण झाल्यानंतर रासायनिक खताचा पहिला डोस दिला. कपाशीचे पीक साधारणतः 30 दिवसांचे झाले असताना दोन ओळींच्या मधोमध गाळ पाडून घेतला व कपाशीचे पीक गादीवाफ्यावर करून घेतले. यामुळे दोन प्रकारचे फायदे झाले. पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन शक्‍य झाले, तसेच पाटपाण्याच्या माध्यमातून ओलित करण्याची सोय झाली. तसेच, स्प्रिंकलरचे पाइप टाकण्यासाठी नालीचा उपयोग करता आला व झाडांना इजा होण्याचा धोका कमी झाला. कपाशीचे पीक साधारणतः तीन - चार फूट उंचीचे झाल्यानंतर (लागवडीपासून साधारणतः 65 दिवसांनी) झाडांचे शेंडे खुडून घेतले. यामुळे फळफांद्यांच्या संख्येत वाढ झाली, तसेच दोन कांड्यांमधील अंतर कमी राखले गेले. झाडांचे बूड तसेच मुख्य खोड जाड झाले, त्यामुळे कपाशीचे झाड बोंडांचे वजन सहन करू शकले. फळफांद्यांची संख्या वाढल्यामुळे आपोआपच पात्या, फुलांच्या संख्येत वाढ शक्‍य झाली. फळफांद्या येण्याच्या अवस्थेला रासायनिक खतांचा दुसरा डोस दिला. त्यानंतर कपाशीचे पीक पात्या-फुलांवर असताना रासायनिक खतांचा तिसरा डोस दिला. अशाप्रकारे रासायनिक खतांचे व्यवस्थापन करताना खतांची मात्रा तीन वेळा विभागून दिल्यामुळे पिकाला आवश्‍यक असलेली अन्नद्रव्ये योग्य वेळी उपलब्ध झाली. त्यामुळे पिकाच्या जोमदार व बळकट वाढीसाठी फायदा झाला. कपाशी पिकाचे रस शोषण करणाऱ्या किडींपासून, तसेच बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्याकरिता कीटकनाशक तसेच बुरशीनाशकाची वेळोवेळी फवारणी केली. त्याचबरोबर वाढनियंत्रक, सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर आवश्‍यकतेप्रमाणे केला. आंतरमशागतीकरिता निंदण, डवऱ्याचे फेर, तसेच तणनाशकाची फवारणी यांचाही योग्य समन्वय साधला. अशाप्रकारे पिकाच्या आवश्‍यकतेनुसार योग्य लागवड व्यवस्थापनाच्या माध्यमातून एकरी क्षेत्रात सुरवातीच्या टप्प्यात व फरदड पिकाचे सुमारे सहा क्विंटल असे एकूण 35 क्विंटल उत्पादन, तर दोन एकरांतून सुमारे 70 क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले. अलीकडील वर्षांत एकरी किमान 25 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न शार यांनी केला आहे. कापसाला सुरवातीच्या टप्प्यात 4100 रुपये प्रति क्विंटल, तर त्यानंतर 3800 ते 3900 पर्यंत दर मिळाला. दोन एकर क्षेत्रातून सुमारे दोन लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दोन एकरांकरिता उत्पादन खर्च सुमारे 59,400 रुपये आला. खर्च वजा जाता दोन एकरांतून सुमारे 2,20,600 रुपये निव्वळ नफा मिळविला. 

संत्रा पिकाला असलेला भाव पाहून हे पीक परवडेल असे शार यांना वाटते. त्यांच्या परिसरात सोयाबीन हे पीकही घेतले जाते. मात्र, या पिकाच्या तुलनेत कापसाला मिळत असलेला भाव, त्याचे उत्पादन यांचा विचार करता आर्थिकदृष्ट्या हे पीक फायदेशीर होत असल्याचा अनुभव शार यांना मिळाला आहे. यंदाही बीटी कपाशी घेणार असून, अधिक उत्पादनवाढीचे उद्दिष्ट ठेवल्याचे त्यांनी सांगितले. 

शार यांना आलेला उत्पादन खर्च साधारणपणे असा - 
दोन एकरांकरिता जमा - खर्च (रुपये) 

- जमिनीची पूर्वमशागत - 3000/- 
- बियाणे - 1900 
- लागवड मजुरी - 1100 
रासायनिक खते - 9000 
निंदण (तीन वेळा) - 2400 Agriculture Information
डवरणी (चार वेळा) - 2000 
तणनाशक (मजुरीसहित) - 1200 
ओलित (नऊ वेळा) - 3000 
पीक संरक्षण (मजुरीसहित) - 7800 
फरदडसह वेचणी (नऊ वेचण्या) - 28000 
एकूण लागवड खर्च रु. 59,400 रु. 

कपाशीचे मिळालेले उत्पादन 70 क्विंटल 
मिळालेला दर प्रति क्विंटल - 4000 
मिळालेले उत्पन्न - 2,80,000 रु. 
निव्वळ नफा रु. 2,20,600 




ref. link : http://www.agrowon.com/Agrowon/20120612/4623058111462907262.htm

उत्पादनाचे लक्ष्य गाठून जयवंत झाले शेतीत यशवंत


सांगली जिल्ह्यातील रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील जयवंत मोरे यांनी पीक बदल करून त्यातून सोनेरी प्रगती साधली आहे. सोयाबीनऐवजी बटाटा, उसात कांदा, त्यानंतर कलिंगड वा ढोबळी मिरची आदी विविध पिकांच्या प्रयोगांतून मोरे यांनी प्रयोगशील वृत्ती जोपासली आहे. कष्टाला अभ्यास, नियोजनाची जोड देत मोरे यांनी बदलत्या शेतीचा वेध घेत व पीक उत्पादनाचे लक्ष्य ठेवीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. 

श्‍यामराव गावडे 

नोकरीच्या मागे लागलेली तरुणाई असे चित्र दिसणाऱ्या सध्याच्या काळात शेती क्षेत्र निवडून त्यात करिअर करणे विशेष बाब आहे. रेठरे हरणाक्ष येथील जयवंत मोरे यांनी इचलकरंजी येथून टेक्‍स्टाईल इंजिनिअरची पदवी घेतली. चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. परंतु घरच्या शेतीतच राबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 

साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या एकरी शंभर टन ऊस उत्पादन योजनेत सहभागी होऊन त्यांनी उसाचे उत्पादन वाढवले आहे. त्यातून एकरी सरासरी 40 टन उत्पादन त्यांनी 75, 80, 90 अशा टप्प्याने दहा वर्षांच्या प्रयत्नांतून शंभर टनांवर नेले. उत्पादन वाढवताना जमिनीचा पोत चांगला राहावा व आर्थिक उत्पन्नही वाढावे यासाठी पीक पद्धतीत त्यांनी सतत बदल केला. 

...असा करतात पीकबदल 
मोरे पूर्वहंगामी उसाची (को-86032, फुले-265) लागवड करतात. त्याआधी ताग, धैंचा ही हिरवळीची पिके घेतात. गेल्या वर्षी त्यांनी सोयाबीनसाठी शेत तयार केले. मात्र सोयाबीनच्या दराचा विचार केला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी-पुणे) येथील माजी शास्त्रज्ञ ए. एन. साळुंखे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोयाबीनच्या ऐवजी बटाटा लागवडीचा निर्धार केला. बटाटा हे पीक या भागात प्रथमच केले जाणार होते. निमसोड येथून खासगी कंपनीकडून बियाणे खरेदी केले. कंपनीच्या नियमानुसार करारपत्र भरून दिले. त्यामध्ये उत्पादित केलेला बटाटा प्रति किलो दहा रुपये दराने कंपनी विकत घेणार होती. (बाजारात त्या वेळी सात ते आठ रुपये दर बटाट्याला होता) बटाटा लागवड करताना साडेचार फुटाची सरी सोडून गादीवाफे तयार केले. त्यावर सहा इंच अंतरावर बेणेप्रक्रिया करून बटाटा टोकला. या शेतात आधी सबसरफेस पद्धतीचे ठिबक केले होते. बटाट्यासाठी बेसल डोस म्हणून 10-26-26 च्या तीन बॅग, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खत पाच बॅगा यांचा वापर केला. ठिबक सिंचनातून 12:61:0, 0:52:34, 0:0:50 ही खते गरजेप्रमाणे दिली. चांगल्या वातावरणामुळे बटाट्याचे पीक चांगले फोफावले. बटाटा पिकात करपा रोगाचा मुख्य प्रादुर्भाव असतो. त्याच्या नियंत्रणासाठी अधिक भर दिला. बटाटा पीक परिसरात प्रथमच असल्याने त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. बटाटा काढणीयोग्य झाल्यानंतर बैलांच्या अवजाराने काढणी केली. एकरी सुमारे आठ टन उत्पादन झाले. कंपनी कराराप्रमाणे 10 रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. त्यावर प्रति किलो अडीच रुपये बोनस मिळाला. सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न सुमारे 80 दिवसांत मिळाले. खर्च वजा जाता 59 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या बटाट्यावर कंपनी प्रक्रिया करून चीप्ससारखे उत्पादन तयार करते. बटाट्याच्या तुलनेत सोयाबीन खर्च एकूण 13,100 रुपयांपर्यंत येतो. प्रति एकर सरासरी 12 क्विंटल उत्पादन मिळते. गेल्या तीन वर्षांमधील दर पाहिला तर तो दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे. उत्पन्न 24 हजार रुपये धरल्यास खर्च वजा जाता 11,900 रुपये इतके उत्पन्न मिळते. त्या तुलनेत बटाट्याचे आंतरपीक फायदेशीर ठरल्याचे मोरे यांनी सांगितले. 

ऊस व कांद्याचे आंतरपीक मोरे यांनी त्यानंतर उसात कांदा ही आंतरपीक पद्धती वापरली. बटाटा पिकानंतर उसाची रोपवाटिका केली. एक डोळ्याच्या उसाची रोपे लावली. बटाट्याच्या जागी गादीवाफ्यावर कांदा लावला. आंतरपीक कांद्याचे पाच एकरात 35 टन उत्पादन मिळाले. सहा ते आठ रुपये किलोला दर मिळाला. ऊस लागवडीचा बहुतांश खर्च त्यातून निघाला. पिकाचे उर्वरित अवशेष उसाच्या मुळाशी बुजवून टाकले. त्याचा उसाला चांगला फायदा झाला. 

यांत्रिकीकरण व ठिबक मोरे यांनी काळाची गरज ओळखून 40 एकर शेतीवर पूर्णपणे ठिबक केले आहे. त्यातील 15 एकर क्षेत्रावर सबसरफेस पद्धतीचे ठिबक आहे. यांत्रिकीकरणाला प्राधान्य देताना पालाकुट्टी करण्याचे यंत्र तयार केले आहे. त्याचबरोबर खोडकी तासणे, बगला फोडणे आदी कामे करणारे यंत्र त्यांच्या भावाने विकसित केले आहे. त्याच्या साहाय्याने कामे केली जातात. 

पीक पद्धतीतील बदल ठरला महत्त्वाचा मोरे यांनी सतत नवनवीन पिके घेण्याचा प्रयोग केला. त्यातून पूर्वी हळद, आले घेतले. खोडवा गेल्यानंतर नगदी पिके करण्याचे त्यांचे नियोजन असते. थोडक्‍यात, ही पिके बोनस म्हणून घेतात. त्यांनी अशाच पद्धतीने तीन एकरात कलिंगड घेतले. त्यातून एकरी किमान 20 टन उत्पादन घेतले. सध्या पावणेतीन एकरावर ढोबळी मिरची आहे. अडीच एकरात दीडशे टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 15 टन विक्री झाली असून किलोला 22 रुपये दर मिळत आहे. कोलकत्याचे व्यापारी जागेवरून माल नेत आहेत. पुणे, सातारा, मुंबई या ठिकाणी मालाची विक्री केली. मॉलसाठीही मालाला मागणी आहे. उन्हाळ्यात मिरचीचे पीक सुकून जाऊ नये म्हणून साडीचे शेड उभारून त्यात मिरची जगवली. ऐनवेळचा गरजेनुसार घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरला. अन्य शेतकऱ्यांचे प्लॉट वाळून गेले तेथे मोरे यांचा प्लॉट चांगल्या अवस्थेत होता. 

मोरे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
* चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळले. 
* गेली दहा वर्षे पालाकुट्टी व पाचट कुजवून त्याचा शेतात वापर करतात. 
* संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचनाने पाणी देतात. 
* यांत्रिकीकरणावर भर. गरजेनुसार विविध यंत्रे भावाच्या साह्याने बनवली. 
* एकरी शंभर टन ऊस उत्पादनासाठी नेहमी धडपड. त्यात यशही मिळाले. 
खोडव्याचेही एकरी 70 ते 80 टनांपर्यंत उत्पादन 
- नेहमी शिकण्याची वृत्ती. शास्त्रज्ञांचे सतत मार्गदर्शन घेतात. 
- पिकांचा सविस्तर अभ्यास करून दर्जेदार, कमाल आणि लक्ष्य ठरवून उत्पादनाचे प्रयत्न 
- परिसरात जी पिके होत नाहीत ती घेण्यावर अधिक भर 
परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक झाले आहेत. कृषी मंडळाची स्थापना. 


Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120611/5578082911636012112.htmAgriculture Information