Sunday, September 2, 2012

Rain water harvesting


बहुपयोगी पळस

पत्रावळीनिर्मिती, रंग उद्योग, लाख उद्योग, दोरनिर्मिती उद्योग, औषधीनिर्मिती उद्योगासाठी पळस फायदेशीर आहे. पळसाच्या "ल्युटीया' या जातीची फुले केशरी लाल ऐवजी पिवळी असतात. ही झाडे बागेमध्ये मुद्दामहून लावली जातात. "पळस वेल' नावाची दुसरी प्रजाती आहे. यास शास्त्रीय भाषेत "ब्युटीया सुपरबा' म्हणतात. याच्या फुलापासून पिवळा रंग मिळतो."फाबेशिया' कुळातील या वृक्षाला शास्त्रीय भाषेत "ब्युटीया मोनोस्पर्मा' या नावाने ओळखले जाते. हा मध्यम उंचीचा पर्णझडी वृक्ष भारतातील उष्ण व समशीतोष्ण जंगलामध्ये मुख्य वृक्ष म्हणून विंध्य, सह्याद्री, हिमालय पायथ्याचे जंगल इ. ठिकाणी आढळतो. ब्रह्मदेश, श्रीलंकेतही हा वृक्ष आढळतो. फुले लाल, केशरी रंगाची आणि पाने गळून गेलेल्या झाडावर येतात. त्यामुळे जंगलात जाळ निघाल्याचा भास उन्हाळ्यात होतो म्हणून या वृक्षास इंग्रजीत "फ्लेम ऑफ फॉरेस्ट' या नावाने ओळखले जाते. 

या वृक्षाचा डिंकाचा व्यापार "बेंगाल किनो' या नावाने चालतो म्हणून इंग्रजीत दुसरे नाव "बेंगाल किनो' असे आहे. हिंदीत ढाक, पलस, तेसू आणि संस्कृतमध्ये "पलाश' म्हणून पळसाच्या झाडाला ओळखले जाते. पळसाचे झाड 10-15 मीटरपर्यंत वाढते. पाने हिवाळ्यात गळून पडतात आणि वसंतात नवी येतात. ती येण्यापूर्वीच फुले येतात. फुले केशरी लाल गुच्छाने असतात. फुले पक्ष्यांच्या आकाराची दिसतात म्हणून यास "किंशुक' असेही म्हणता. शेंगांमध्ये एकच चपटे बी असते बीचा रंग काळसर बदामी असतो. 

रोपवाटिका आणि लागवड ः 
फेब्रुवारी-मार्च महिन्यांत फुले येऊन बियाणे एप्रिल-जूनपर्यंत परिपक्व होते. जमा केलेले बियाणे एक वर्षापर्यंत उगवते. लागवडीपूर्वी नाण्यासारखे असलेले चपटे बियाणे दोन-तीन तास कोमट पाण्यात ठेवावे, यामुळे 73 ते 90 टक्के रुजवा मिळतो. बियाणे पेरल्यानंतर उगविण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो. चार महिन्यांच्या कालावधीत रोपे शेडनेटमध्ये केल्यास एक ते दोन फुटांची होतात. लागवडीसाठी हलकी, मध्यम निचऱ्याची जमीन वाढीसाठी अनुकूल असते. सुरवातीला वाढीचा वेग कमी असतो. खत, पाणी, तणनियंत्रण, आग व गुरे यापासून संरक्षण केल्यास झाडे चांगली वाढतात. लागवड 5 x 5 मीटर अंतराने करावी. बागबगीचे, रस्ते, कार्यालये, गायराने, ग्रामपंचायतीच्या रिकाम्या जागा इ. ठिकाणी या वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे शक्‍य आहे. 

उपयोग भाग ः पाने, फुले, बिया, मुळे आणि खोड. 

रासायनिक घटक ः या वनस्पतीच्या भागामध्ये "बट्रीन', आयसोबट्रीन, कोरिओपोसीन, सल्फुरेन इ. ग्लायकोसाईड्‌स असतात. 
उपयोग ः पानांचा उपयोग पुरातन काळापासून द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी होत आला आहे. पळसाची मुळे गरम पाण्यात उकळून सालीपासून धागे काढतात. त्यांचे दोरखंड बनविले जातात. बियांपासून पिवळे तेल मिळते. तेही औषधात वापरले जाते. फुलापासून केशरी लाल रंग मिळतो त्याचा उपयोग कपड्यांना रंग देण्यासाठी होतो. खोडाचा उपयोग खोकी-फळ्या करण्याकरिता केला जातो. पळसाच्या खोडावर लाखेचे किडे चांगले वाढतात. खोडामधून डिंक मिळतो. तो लालसर रंगाचा असतो. डिंक आणि बियांचे चूर्ण पोटातील किडे पाडण्याकरिता केला जातो. मूत्राशयाचे विकार, किडनीचे विकार इ. मध्ये फुलांचा वापर केला जातो. 

उपवनांची निर्मिती ः 

शेतीमध्ये अन्न, वस्त्र, निवारा इ.साठी लागणारी वनश्री सांभाळली जाते, वाढविली जाते म्हणून शेती हे उपवनांचे उत्तम उदाहरण आहे. बागा, उद्याने इ. मध्ये आवश्‍यकतेनुसार उपयुक्त वनश्रीचे संवर्धन होऊ शकते, यानुसार याची नावे आपणास देणे शक्‍य आहे. जसे अशोक वृक्षांची लागवड यास "अशोकवन'; वेलीची लागवड "लतावन'; औषधी वृक्षांची, वनस्पतींची लागवड "औषधी वाटिका'; विविध ऋतूंमध्ये फुलणारी वृक्षप्रजाती लागवड यास "ऋतूवन'; आपल्या राशीवृक्षाचा संग्रह यांस "राशीवन' आणि नक्षत्र वृक्षाची शास्त्रीय पद्धतीने लागवड यास आपण "नक्षत्रवन' असे संबोधतो. अशा पद्धतीने वनश्रींचे उपयोग, अढळ, उत्पत्तीस्थान, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व इ. वरून निर्मिती केलेल्या उपवनांस आपण नाव देऊ शकतो. शहरांमध्ये मान्यवरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वनांची लागवड केली जाते, यांस आपण स्मृतिवन असे संबोधतो. उपवनाचा विस्तार एखाद्या घरातल्या लहानशा बागेपासून शेकडो एकरांच्या वनसदनापर्यंत असू शकतो. अशी उपवने नजीकच्या काळात पशू-पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने तर आहेतच; परंतु जैविक विविधता संवर्धन, जतनासाठीही तेवढीच उपयोगी आहेत. वाढणारी लोकसंख्या त्यासाठी लागणारे इंधन, प्राणवायू, उपजे, लाकूड इ. आपणास उपवनापासून प्राप्त होऊ शकते. याचबरोबर आपला परिसरही आपण रम्य, सुशोभित करू शकतो. गावांच्या सामाईक जागा, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, कार्यालये, गायराने, नद्या, काठ, रस्ते इ. ठिकाणी आपण उपवने निर्माण करू शकतो. 

बहुपयोगी बिब्बा

बिब्बा या वृक्ष प्रजातीचा उपयोग रेझीन, औषधी, साबण उद्योग, आगरोधक, प्लॅस्टिक, वंगण इ. अनेक उद्योगांसाठी होतो. बिब्बा फळातील रसायन वॉटर प्रूफिंग साहित्य, वेगवेगळ्या रंगनिर्मितीसाठी केला जातो. 

बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून पाच ते सात मीटरपर्यंत वाढतो. याची पाने साधी, शेंड्याला गोलाकार, पृष्ठभाग, गुळगुळीत, पाठीमागून खरबरीत असतात. पाने काहीशी हृदयाकृती, पानांचा कडा काहीशा सरळ रेषेत ओल्या असतात. पानांत मुख्य शिरेवर 15 शिरा असतात. फुले हिरवट- पांढरट, छोटेसे देठ असलेली असतात. फळे एक इंच आकाराची असतात. काळ्या रंगाची बी यास "नट' असे म्हणतात. काजूप्रमाणे बिब्ब्याचे बोंड येते, ते पिकल्यानंतर पिवळे होते. हे भाजून खाल्ले जाते. बिब्ब्याला जुलै-ऑगस्टमध्ये फुले येण्यास सुरवात होते आणि परिपक्व फळे जानेवारी, मार्च या कालावधीत मिळतात. बिब्ब्याची परिपक्व फळे झाडाखालून जमा करावीत. फळांचा मोठा आकार असतो. रंगाने गर्द काळी फळे रोपनिर्मितीसाठी वापरावीत. सुप्तावस्था मोडण्यासाठी बी 10 ते 15 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवून दोन दिवस कोमट पाण्यात ठेवावे. त्यानंतर ओल्या गोणपाटात बांधून ठेवावे. या पद्धतीने संस्कार केल्यानंतर पिशवीत पेरावे. 5 x 8 इंच आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पिशवीमध्ये उच्च दर्जाची रोपे तयार करता येतात. 

लागवड ः 

रोपे दोन ते चार फुटांची झाल्यानंतर ती 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन त्यात लावावी. लागवडीपूर्वी खड्डे भरतेवेळी मातीत सुपर फॉस्फेट, सेंद्रिय खत, शेणखत, हिरवळीचे खत आवश्‍यकतेनुसार टाकावे. लागवड मध्यम, हलक्‍या, निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. आवश्‍यकतेनुसार पाणी, खत, तण व्यवस्थापन करावे. पाच-सात वर्षांत झाडांना फळे येण्यास सुरवात होते. 

उपयोग ः 
बिब्बा फळांपासून काळा रंग मिळतो. तो कपड्यावर घट्ट बसतो. कपड्यांवर नावे टाकण्यासाठी आणि गोंदणासाठी हा रंग वापरला जातो. म्हणून यास इंग्रजीत "मार्किंग नट' म्हणून संबोधले जाते. पूर्वी कपड्यांना रंग देण्यासाठी वापर केला जात असे. सद्यःस्थितीत "वॉर्निश' "पेन्ट' बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये बिब्बा तेलाचा वापर केला जातो. बिब्बा फळात जे रसायन असते, त्याचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, वेगवेगळ्या रंगनिर्मितीसाठी केला जातो. बिब्बा फळांत मोठ्या प्रमाणात "फिलॉल' रसायन असते. त्याचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, रंगनिर्मितीसाठी केला जातो. अर्धवट वाळलेले तेल लाकूड पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी लाकडांना लावले जाते. गाड्यांच्या ऍक्‍सलला वंगविण्यासाठी तेलाचा वापर होतो. या वृक्षांचा उपयोग लाखेचे किडे वाढविण्यासाठी केला जातो. टॅन, टॅनिन काढण्यासाठी फळांचा वापर केला जातो. आयुर्वेदासारख्या औषधी पद्धतीत अनेक औषधी बिब्बा फळांपासून बनविल्या जातात. बिब्बा वापरण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण करणे आवश्‍यक असते. फळांचा वापर अस्थमा, कफ, मेंदूविकार, फीट, सांधेदुखी, घशाचे विकार, कुष्ठरोग, मूळव्याध इ. विकारांत केला जातो. परंपरागत औषधी पद्धतीत मुळे, बिया, पाने वापरली जातात. 

"ब्रॅण्ड'वर खपतात इस्राईलची द्राक्षे

शेतकरी, विक्रेता आणि ग्राहक अत्यंत चोखंदळ, तत्पर असल्याने इस्राईल व युरोपीय बाजारपेठेत शेतीमाल उत्पादने अत्यंत दर्जेदार असतात. बागेचे योग्य व्यवस्थापन केल्याने इस्रायली शेतकऱ्यास एकरी सरासरी 15 टन द्राक्ष उत्पन्न मिळते. निर्यातीच्या द्राक्षाप्रमाणेच स्थानिक विक्रीसाठी निकषांचे तंतोतंत पालन केले जाते. 

इस्राईलमध्ये इतर फळपिकांच्या प्रमाणेच द्राक्ष लागवडदेखील आहे. येथील द्राक्षे स्थानिक बाजारपेठेसह निर्यात केली जातात. इस्राईलमधील द्राक्ष शेतीमध्ये आधुनिक तंत्र पाहायला मिळते. द्राक्ष शेतीमध्ये दक्षिणेकडील लखीश फार्म आघाडीवर आहे. इस्राईलमध्ये मोशाव प्रकारात प्रत्येक जण आपापली शेती खासगी पद्धतीने करतो. खते, बी-बियाणे, कीडनाशके सहकारी संस्थेमार्फत पुरविली जातात. तसेच शेतकऱ्यांचा उत्पादित शेतीमाल सहकारी संस्थांच्या माध्यमातून अथवा समूहाने विक्रीसाठी पाठविला जातो. मोशावमध्ये किबूत्झप्रमाणे समानता नसून प्रत्येकास आपापल्या मालाच्या दर्जाप्रमाणे जो दर मिळेल तो कसलीही कपात न करता दिला जातो. या पद्धतीत 35 टक्के लोक शेती करतात. या ठिकाणी 2000 पासून द्राक्ष लागवड केली जात आहे. पूर्वी द्राक्षाच्या जंगली जातीची लागवड होती.

...अशी आहे द्राक्ष शेती 
लखीश भागात द्राक्ष बाग लागवडीसाठी चांगली जमीन आणि हवामान असल्याने 66 लोकांच्या मोशाव समूहाने 500 हेक्‍टर क्षेत्रात द्राक्षांच्या वेगवेगळ्या जातीची लागवड केली आहे. द्राक्ष बागेसाठी निवड केलेली जमीन हलकी असून सामू 7.5 आहे. जमिनीची खोली 20 ते 35 सें.मी. एवढी आहे. या ठिकाणी अर्ली स्वीट, सुपेरिअर, थॉमसन, सेव्हीयर, स्कॅलॉश या बियांच्या तर मस्कत, व्हाइट ग्लोब, जैनी या बियांच्या जातीची लागवड केली जाते. बिया असलेल्या जैनी जातीच्या द्राक्षांना मुस्लीम धर्मियांकडून चांगली मागणी आहे. इस्राईलमधील एकूण उत्पन्नाच्या 30 टक्के द्राक्षांचे उत्पादन लखीश फार्मवर होते. हा फार्म 80 वर्षांचे निवृत्त लष्करी अधिकारी सांभाळतात. त्यांचा एक मुलगा लष्करात तर दुसरा मुलगा त्यांच्याबरोबर शेती करतो. द्राक्ष बागेसाठी शासनाने पाण्याचा कोटा ठरवून दिला आहे. कोट्याप्रमाणे शेतकऱ्यास पाणी दिले जाते. शासनाने पुरविलेले 25 टक्के शुद्ध पाणी आणि प्रक्रिया केलेले 75 टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. सध्या शेतीसाठी 1000 लिटर पाण्याचा दर 2.5 शकेल म्हणजे 36 रुपये आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा दर 18 रुपये एवढा आहे. पाणी मोजून मापून दिले जात असल्याने उत्पादनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जपून वापरले जाते. 

येथील शेतकऱ्यांनी द्राक्ष मंडपाची उंची पाच फूट ठेवली आहे. दोन ओळींतील अंतर आठ फूट तर रोपातील अंतर तीन फूट आहे. द्राक्ष बागेस जास्त सूर्यप्रकाश मिळावा म्हणून Y स्वरूपातील मंडपाची रचना आहे. या रचनेमुळे बागेमधील भाग जास्तीत जास्त उघडा राहून पानांना जास्त सूर्यप्रकाश उपलब्ध होतो, हवा खेळती राहते. आपल्यासारखी द्राक्षवेलीची दोन वेळा छाटणी केली जात नाही. येथे उत्पादनासाठी एप्रिलमध्ये एकदाच छाटणी करून नोव्हेंबरपर्यंत उत्पादन मिळते. छाटणीपासून मंडपाच्या मधल्या भागातील फांद्या छाटून बाजूच्या फांद्यांच्या वाढीस चालना दिली जाते. द्राक्ष बागेवर दोन फूट संपूर्ण शेडनेट तर बाजूला कीड प्रतिरोधक जाळी असल्यामुळे बागेस ऊन, वारा किंवा कीटकांचा त्रास होत नाही. एका ठिकाणी 15 एकर क्षेत्रात द्राक्ष बाग असली तरी चार जातींची चार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लागवड केली आहे. वेगवेगळ्या जातींची लागवड केल्याने जास्त काळ द्राक्ष पुरवठा करणे शक्‍य होते. द्राक्ष बागेसाठी खतांचा वापर पूर्णपणे शिफारशीप्रमाणे न करता प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे असे तंत्र विकसित केले आहे. 

संगणक प्रणालीचा वापर ः 
काड्यांची संख्या, मण्यांची विरळणी व इतर कामे आपल्यासारखी केली जातात. द्राक्ष बागातील सर्व यंत्रणा या संगणकाला जोडल्या आहेत. मातीत बसविलेल्या टेन्शीओमीटरद्वारे कमी जास्त झालेल्या पाण्याची संगणकाला माहिती दिली जाते. या माहितीनुसार संगणक पाणी यंत्रणा आपोआप कार्यान्वित करतो. कॅमेराद्वारे खते व पाण्याच्या विभाजनाची छायाचित्रे संगणकाला पाठविली जातात. त्यामुळे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी दिलेली खते व पाण्याचे किती प्रमाणात मुळांनी शोषण केले आहे आणि किती पुरवठा केला आहे याची तंतोतंत माहिती मिळते. हंगामापूर्वी माती, पाण्याचे परीक्षण करूनच खत आणि पाण्याच्या मात्रा ठरविल्या जातात. बागेत यंत्राद्वारे कीडनाशकांची फवारणी केली जाते. लखीश येथील 15 एकर द्राक्ष बागेच्या व्यवस्थापनासाठी पाच प्रशिक्षित महिला कायमस्वरूपी कार्यरत होत्या. या महिलांना द्राक्ष व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे द्राक्ष शेतीमधील सर्व कामे योग्य वेळेत पूर्ण केली जातात. द्राक्षाच्या विरळणीच्यावेळी विशेष काळजी घेतली जाते. बागेतील स्वच्छता, खेळत्या हवेमुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव खूप कमी असतो. जमिनी काही प्रमाणात चुनखडीयुक्त असल्याने वेगवेगळ्या रसायनांचे (सूक्ष्म अन्नद्रव्ये, रासायनिक खते, संजीवके) मिश्रण असलेल्या बॅग जमिनीत ठेवल्याने मुळांना हळूहळू दीर्घकाळ सर्व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. लखीश फार्मने तयार केलेली "कॉम्प्लेक्‍स बॅग' द्राक्ष उत्पादनवाढीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. पाणीपुरवठ्यासाठी द्राक्षवेलीच्या दोन्ही बाजूंस दोन लॅटरल्स बसविल्या आहेत. टेन्शीओमीटर असल्याने मुळांना गरजेएवढेच पाणी दिले जाते. संपूर्ण क्षेत्रास पाणी देण्यासाठी एका ठिकाणी अद्ययावत पाण्याची व्यवस्था बसवून त्याला संगणक जोडला होता. वेगवेगळ्या जाती, क्षेत्राची पाण्याची व खतांची गरज वेगळी असल्याने ठिकठिकाणी नॉब व व्हॉल्व्ह बसविलेले असतात. सर्व नॉब संगणक स्वयंचलित पद्धतीने कार्यान्वित करतो. 

शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेच्या जवळच द्राक्षाची प्रतवारी आणि पॅकिंगगृहाची सुविधा आहे. येथील शेतकऱ्यांनी 1000 टन क्षमतेचे शीतगृह उभारले आहे. लखीश फार्मच्या दर्जेदार उत्पादनात येथील विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा आहे. विद्यापीठाचे कीटकशास्त्र, रोगशास्त्रज्ञ व पीकशास्त्रज्ञ दर 15 दिवसांनी द्राक्ष बागेस भेट देतात. हवामान केंद्रांचा वेळोवेळी सल्ला घेतला जातो. शेतकरी, विक्रेता आणि ग्राहक अत्यंत चोखंदळ, तत्पर असल्याने इस्राईल व युरोपीय बाजारपेठेत उत्पादने अत्यंत दर्जेदार असतात. बागेचे योग्य व्यवस्थापन केल्याने इस्रायली शेतकऱ्यास एकरी सरासरी 15 टन उत्पादन मिळते. उत्पादित सर्व माल उच्च प्रतीचा असल्याने निर्यात मालासारखेच स्थानिक मालासाठीही निकषांचे तंतोतंत पालन केले जाते. आपल्यासारखे स्थानिक विक्रीसाठी वेगळी आणि निर्यातीसाठी वेगळी द्राक्षे अशी प्रतवारी या देशात नाही. शेतकऱ्यास स्थानिक ठिकाणी प्रति किलोस 50 ते 60 रुपये दर मिळतो. निर्यातक्षम द्राक्षास प्रति किलोस 120 ते 125 रुपये दर मिळतो. 

महाराष्ट्राला संधी : 
नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आधुनिक द्राक्ष तंत्रज्ञान आत्मसात करून गुणवत्ता व उत्पादन वाढ साधली आहे. जागतिक बाजारपेठेत इस्राईल, चिलीबरोबरीने आपली स्पर्धा आहे. आपले शेतकरी द्राक्ष उत्पादनवाढीच्या दृष्टीने कल्पकतेचा वापर करीत असले, तरी गुणवत्तेत सातत्य राखले जात नाही. चिली, इस्राईलमध्ये एकरी सरासरी द्राक्ष उत्पादकता 15 ते 20 टन आहे. निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन 90 टक्के आहे. आपल्याकडे एकरी उत्पादन 12 ते 15 टन असले तरी त्यापैकी फक्त 15 ते 20 टक्के द्राक्षे निर्यात योग्य असतात. हे चित्र बदलायचे असले तर अरब, युरोप देशांत तसेच न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया देशांत द्राक्ष निर्यातीचे कोणते निकष आहेत त्याप्रमाणे उत्पन्न घेण्याची गरज आहे. 

प्रगत देशात हवामान बदलाचे परिणाम त्वरित समजण्यासाठी प्रक्षेत्रावर स्वयंचलित हवामान यंत्रे बसविली आहेत. हवामानाचा अचूक अंदाज आल्याने रोग, किडी व वातावरणातील बदललेल्या घटकावर कमी खर्चात नियंत्रण करणे शक्‍य होते. आपल्याकडे विभागनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रांची जलद गतीने उभारणी झाली पाहिजे. द्राक्षाची योग्य प्रतवारी, पॅकिंग व गुणवत्ता राखून परदेशात निर्यातीच्या संधी वाढविल्या पाहिजेत. 

"ब्रॅण्ड नेम'ने विक्री 
इस्राईलमध्ये लखीश फार्मची उत्पादने अत्यंत दर्जेदार समजली जातात. तेलअवीव, जेरुसलेम या ठिकाणी असलेल्या मोठ्या मॉलमध्ये लखीश फार्मची द्राक्षे विक्रीला असतात. द्राक्षाच्या बॉक्‍सवर "लखीश ग्रेप्स' असा शिक्का असतो. लखीश फार्मची उत्पादने गुणवत्ताक्षम व दर्जेदार असल्याने त्याला खूप मागणी असते. लखीश द्राक्षांना युरोपमध्येही चांगली मागणी आहे. द्राक्षाच्या बॉक्‍समध्ये चुकून डाग असलेली किंवा लहान-मोठी द्राक्ष भरली गेली असल्यास मॉल व्यवस्थापनाकडून लखीश फार्मला संपर्क केला जातो. लगेचच खातरजमा करण्यासाठी फार्मचे व्यवस्थापक स्वत: मॉलला भेट देऊन पुढील नियोजन करतात. 

व्यवस्थापन नवीन कलमांचे...


नवीन फळबाग लागवडीसाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. जमिनीतील उपलब्ध पाणी आणि तीव्र उन्हापासून रोपांची काळजी घेण्यासाठी पाणी देण्याच्या योग्य पद्धतीचा वापर, नवीन फळझाडांना सावली, आच्छादनाचा वापर, बाष्परोधकांचा वापर करावा. 

नवीन फळझाडांना सावली - 
नवीन लागवड झाल्यानंतर कलमे - रोपांना वाऱ्यापासून संरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा, त्यावर झाडाचे खोड सैलसर बांधावे. कलम चांगले वाढू लागल्यावर कलमावरची बांधलेली प्लॅस्टिकची पट्टी सोडून घ्यावी. पुढील वाढीच्या काळात सोसाट्याच्या वाऱ्यापासून फळांचे व झाडाचे नुकसान टाळण्यासाठी बागेभोवती वाराप्रतिबंधक झाडे लावावीत. रोपांच्या कोवळ्या शेंड्यांचे प्रखर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कलमाच्या चारही बाजूंनी बांबू रोवून त्यावर मांडव करावा. सावलीसाठी तुराट्याचा, पाचटाचा, भाताचे तणीस किंवा वाळलेल्या गवताचा वापर करावा. दक्षिण व पश्‍चिम बाजूंनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तुराट्याचा कूड करावा. 

आच्छादनाचा वापर - 
उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, त्यामुळे बरेच पाणी वाया जाते. ते रोखण्यासाठी फळझाडांच्या बुंध्यांभोवती आळ्यामध्ये पाचट, तणीस, गव्हांडा, वाळलेले गवत, भुसकट किंवा पॉलिथिन शीट यांसारखे आच्छादन पसरून टाकावे, त्यामुळे बाष्पीभवन कमी होते.
 
पाणी देण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर - 
रोपांच्या किंवा झाडांच्या मुळांपाशी पिकांच्या गरजेनुसार ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. या पद्धतीमुळे रोपांच्या मुळ्यांच्या परिसरातील भाग नेहमी ओलसर राहतो. पाण्याद्वारे खते देता येतात. कमी क्षेत्रातील जास्त अंतरावरील फळझाडांच्या लागवडीत मटका सिंचन पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. याकरिता झाडांच्या वाढीनुसार साधारण पाच ते सात लिटर पाणी बसेल एवढी लहान लहान मडकी पहिल्या दोन ते तीन वर्षांकरिता वापरावीत. या पुढील जास्त वयाच्या झाडांकरिता 10 ते 15 लिटरची मडकी निवडावीत. ती शक्‍यतो जादा छिद्रांकित किंवा आडीत कमी भाजलेली असावीत. म्हणजे ती आपोआप झिरपत राहतात. पक्‍क्‍या भाजलेल्या मडक्‍याच्या खालील बुडाकडील बाजूस लहानसे छिद्र पाडावे व त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी (केसर) बसवावी, जेणेकरून पाणी लवकर गळून जाणार नाही. प्रत्येक झाडास दोन मडकी बसवावीत. ती बसविताना प्रथमतः मडक्‍याच्या आकाराचा खड्डा खोदून तेथे मडके गळ्याबरोबर जमिनीत पुरावे आणि त्यामध्ये संध्याकाळी पाणी भरून ठेवावे. हे पाणी मडक्‍यावाटे झिरपत राहते. ही पद्धत मोठ्या बागेत वापरता येत नाही. कारण मडके भरण्यासाठी मजुरांचा खर्च वाढत राहतो. ही पद्धत कमी क्षेत्रात फायदेशीर आहे. सीताफळ, आंबा, आवळा, पेरू यांसाठी चांगली आहे. मडके पाण्याने भरल्यानंतर त्यावर झाकणी, लाकडी फळी, जाड कागद किंवा खपट याचा वापर करून झाकण करावे, त्यामुळे मडक्‍यातील पाणी बाष्पीभवनाने वाया जाणार नाही. 

बंधाऱ्यातून वाढवा जलसंधारण


कोकण विजय बंधारा - 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने हा बंधारा विकसित केला आहे. नालापात्रात उपलब्ध असलेल्या दगडांचा वापर करून कोकण विजय बंधारा बांधता येतो, त्यासाठी कुशल कारागिरांची गरज भासत नाही. बंधारा बांधल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूस म्हणजेच पाण्याकडील बाजूस प्लॅस्टिक अस्तरीत केल्यास दगडांच्या पोकळ्यांतून होणारी पाण्याची गळती कमी करता येते. बंधाऱ्यासाठी जागा निवडताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. ज्या नाल्यावर बंधारा बांधावयाचा आहे, त्याचा उतार तीन टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावा. बंधाऱ्याच्या खालच्या व वरच्या बाजूस नाला सरळ असावा. नाल्यास सुस्पष्ट काठ असावेत. नाल्याची उंची एक ते दोन मीटर असावी. लोकसहभागातून अशा प्रकारचे बंधारे साखळी पद्धतीने बांधल्यास प्रभावीपणे जलसंधारण करता येईल. 
फायदे - 
1) नाल्यातून वाहून जाणाऱ्या मातीची धूप थांबते.
 2) लोकसहभागातून जलसंधारण साधता येते. 
3) खर्च कमी लागतो. 
4) कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता नाही. 
5) पाणी अडविलेल्या जलसाठ्याचा वापर रब्बी पिकास सिंचनासाठी करता येतो. 
6) भूगर्भात पाण्याचे पुनर्भरण होऊन परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. 
7) दुबार पिकांखालील क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. 

1) वनराई बंधारा - 
वनराई बंधारा हा एक कच्च्या बंधाऱ्याचा प्रकार आहे. हे बंधारे नदी - ओहोळांवर बांधले जातात. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा अधिक होऊ शकेल आणि वाहणाऱ्या पाण्याचे कमी रुंदीचे पात्र लक्षात घेऊन हा बंधारा घातला जातो. यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये वाळू भरून, पिशव्या शिवून बंधाऱ्यासाठी वापरल्या जातात. नदीपात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहास आडव्या अशारीतीने सांधेमोड पद्धतीने पिशव्या रचल्या जातात. वनराई बंधाऱ्याच्या बांधणीसाठी जागेची निवड हा महत्त्वाचा भाग आहे. प्रथम नालापात्राची पाहणी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त जलसाठा करणे शक्‍य होईल, अशी जागा निवडावी. नदीपात्र अरुंद व खोल असावे, जेणेकरून साठवणक्षमता पुरेशी होईल. नालापात्राचा उतार तीन टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावा. नालापात्रास स्पष्ट काठ असणे जरुरीचे आहे. वनराई बंधाऱ्यासाठी निवडलेली जागा वळणालगतची असू नये. गावोगावी श्रमदानातून अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात वनराई बंधारे बांधून जलसाठे निर्माण करता येतील. 

मेंढ्यांमधील रोगांचे नियंत्रण

आंत्रविषार : 
हा प्रादुर्भावातून उद्‌भवणारा जिवाणूजन्य आजार आहे. मुसळधार पाऊस पडून गेल्यावर ऊबदार वातावरणात हे जिवाणू मातीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढतात. प्रामुख्याने हा आजार चांगल्या पोषित, पौष्टिक चाऱ्यावर चरणाऱ्या, मांसाने भरीव असणाऱ्या मेंढ्यांना व शेळ्यांना बाधित करतो. कोकरांनी आजारास बळी पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त प्रमाणात पिलेले दूध होय. प्रादुर्भाव झालेली नवजात कोकरे हवेमध्ये उडी घेऊन जमिनीवर कोसळतात, थरथर कापतात. 

उपाय योजना - 
मेंढ्यांना शिफारशीत लस द्यावी. तीन महिन्यांवरील वयोगटातील कोकरांनादेखील लस टोचून घ्यावी. कोकरांना लस दिल्यानंतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. लस टोचल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्याकरिता 21 दिवसांचा कालावधी लागतो. प्रादुर्भावादरम्यान दीर्घक्रियाशील प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत.

फाशी :

हवामानातील अचानक बदल, मुसळधार पाऊस व दुष्काळ परिस्थितीमुळे फाशीचा रोग पसरतो. यात खूप ताप येतो, जनावर थरथरते, तोल जातो, नाकातोंडातून काळपट रक्तस्राव होतो, श्‍वास घेण्यास त्रास होतो व शेळी-मेंढी ताबडतोब मरते.
 
उपाय योजना - 
पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधक लसीकरण करावे. मेलेल्या शेळ्या-मेंढ्या वर-खाली चुनखडी (चुना) टाकून खोल खड्ड्यात पुराव्यात. त्यांची कातडी विकू नये. शवचिकित्सा करू नये.

जरबा :
हा आजार अतिसूक्ष्म विषाणूंपासून होतो. याचा प्रसार चावणाऱ्या चिलटांपासून म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या होतो. जास्त पाऊस व ढगाळ वातावरणामध्ये चिलटांची उत्पत्ती डबक्‍यात पाणी साठल्यामुळे अधिक प्रमाणात होते.
 
लक्षणे - 
तोंडातील आतील भाग लालसर पडतो, काही वेळा लाळ येते, शेळ्या-मेंढ्या कुचंबतात, डोळे लाल होतात, जनावर लंगडू लागते, छातीला व जबड्याखाली जखमा होतात. फुफ्फुसदाह होऊन मेंढ्या मरतात. यात मरतुकीचे प्रमाण पाच ते वीस टक्के आहे. या आजारातून बऱ्या झालेल्या मेंढ्यांना अशक्‍त, कमकुवत कोकरे निपजतात.
 
उपाय योजना - 
पावसाळ्यात सायंकाळी वाडग्यात करंज, कडुनिंब, निरगुडीच्या पाल्याची धुरी करावी. असे केल्याने चिलटांचे प्रजनन कमी होऊन संख्या वाढत नाही. बाधित मेंढीस पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत. कोमट पाण्यात मीठ टाकून मेंढ्यांचे तोंड धुवावे.

बुळकांडी :
या आजारात शेळ्या-मेंढ्यांमध्ये ताप येणे, नाकातून पाणी येणे, चिकट व रक्तमिश्रित जुलाब होणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसून येतात.
 
उपाय योजना - 

पशुतज्ज्ञांकडून नियमित पी.पी.आर. लस टोचून घेणे. वाडग्यात स्वच्छता पाळावी. आजारी मेंढ्यांना वेगळे ठेवावे.

पायलाग - 
शेळ्या-मेंढ्या या पायलाग आजारास लवकर बळी पडतात. आर्द्र हवामान व ओलसर माती प्रसारास कारणीभूत ठरते. खुरे मऊ होणे, खुरांना सूज येणे, दुर्गंधी येणे, खुरांतून रक्त येणे, खुरांत खपल्या होणे, मेंढी लंगडणे, ताप येणे, वजन कमी होणे, खूर गळून पडणे, काळजी न घेतल्यास खुरांत अळ्या पडणे, भूक नाहीशी होणे, अशक्तपणा येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.
 
उपाय योजना - 
1) वाढलेली खुरे कापून योग्य निगा राखावी. 2) दररोज लेंडी लोटून वाडग्याची स्वच्छता राखावी. 3) 15 दिवसांतून एकदा वाडग्यात चुन्याचा सडा द्यावा. 4) मेंढ्यांना मूत्र व लेंड्या साठलेल्या जागी ठेवणे टाळावे. 5) लंगडणाऱ्या मेंढ्या कोरड्या जागेत इतर मेंढ्यांपासून वेगळ्या ठेवाव्यात. 6) मेंढ्यांना दररोज दहा टक्के झिंक सल्फेटच्या द्रावणातून चालत घेऊन जावे. 7) कायम लंगडणाऱ्या मेंढ्या विकून टाकाव्यात. 8) लंगडणाऱ्या मेंढ्या विक्रीनंतर, तीन आठवड्यांनंतर नवीन मेंढ्या कळपात समाविष्ट कराव्यात. 9) खुरे पोटॅशिअम परमॅंगनेटच्या पाण्याने स्वच्छ धुवावीत.

कोकरांचे व्यवस्थापन - 
कोकरांना जन्माच्या पहिल्या पाच ते सहा तासांत दूध ओढण्यास मज्जाव केल्यास त्यांच्या शारीरिक वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. कोकरू उभे राहण्यास व आईचे दूध पिण्यास कोकरास 15 ते 30 मिनिटे लागतात. कोकराचा प्रतिकूल वातावरणात जन्म झाल्यास अतोनात हानी होते. पावसाळ्यात चिखलामुळे उठता येत नाही. रुक्ष, उन्हाळी हवामानात कोकरांच्या शरीरातील पाण्याचे बाष्पीभवन होते, निर्जलीकरणाने मृत्यू ओढवितात. थंडीमध्ये गारठून मृत्यू होतात. प्रथम तीन दिवसांत कोकरांना दूध पुरेशा मात्रेत न मिळाल्यास मृत्यू ओढवतात. प्रथम विणाऱ्या मेंढीत मातृत्वाचा अभाव आढळतो. व्यवस्थापन योग्य नसल्यास किंवा शारीरिक अस्वस्थता असल्यास प्रौढ मेंढ्यादेखील त्यांच्या कोकरांस सोडून देतात. विण्याची क्रिया अति जास्त लांबल्यास येणाऱ्या थकव्यामुळे मेंढ्या कोकरांकडे लक्ष पुरवीत नाहीत. गर्भारपणाच्या शेवटच्या टप्प्यात मेंढ्यांना एकसारखे हाताळल्यास उदा. -लोकर कातरताना, कोकरांचे शारीरिक आकारमान सरासरीपेक्षा कमी असल्यास, कॅल्शिअम क्षाराची आणि "अ' जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास कोकरांच्या मरतुकीचे प्रमाण वाढलेले पाहावयास मिळते. 

जन्मलेल्या कोकरांमध्ये लोह व तांबे आदी क्षारांची कमतरता असल्यास कोकरे माती खाऊ लागतात, जुलाब होतात, त्यांना नीट चालता येत नाही, ओव्यांतील दूध ओढता येत नाही, कोकरे भेंडाळतात व तोंडावर पडतात, वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो; परिणामी भूक मंदावते, अशक्तपणा येतो व त्यामुळेदेखील मृत्यू ओढवू शकतो. 

प्रतिबंधात्मक उपाय - 
1) मेंढ्यांना गाभणकाळात शेवटचे सहा आठवडे आणि दुग्धोत्पादन काळातील प्रथम आठ आठवडे उत्तम प्रतीचा आहार पुरविणे आवश्‍यक असते. गाभण कालावधीतील शेवटच्या सहा आठवड्यांत 200 ते 450 ग्रॅम खुराक मिश्रण दररोज द्यावे. यामुळे कोकरे सशक्त, वजनदार निपजतात व माता मेंढीस दूधदेखील विपुल प्रमाणात फुटते.
2) कोकराचा विकासदर हा मेंढीचे दुधाचे प्रमाण व गुणवत्ता यावर अवलंबून असतो.
3) विण्यास आलेल्या मेंढ्यांचे दिवसातून दोन ते तीनदा लक्षपूर्वक निरीक्षण करून मेंढ्यांना कमीत कमी अस्वस्थ करावे.
4) परित्यागीत कोकरांना पालक माता उपलब्ध करून द्यावी.
5) गरज लागल्यास विणाऱ्या मेंढीस तत्काळ व कौशल्यपूर्ण मदत देणे अपरिहार्य असते, तसेच या वेळेस जंतुसंसर्ग होऊ नये याकरिता स्वच्छता बाळगावी.
6) मरण पावलेल्या कोकरास योग्य पद्धतीने मातीत पुरावे, जेणेकरून सांसर्गिक रोगास आळा घालणे सोपे होईल.
7) मेंढ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व सावलीचा पुरवठा विपुल प्रमाणात उपलब्ध असावा.
8) आपल्याकडे आजतागायत लोकर कातरणी ही कात्रीच्या साह्याने केली जाते, त्यामुळे लोकर कातरणी करताना ओव्यांस इजा होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. परभक्षींचा प्रतिबंध करावा.
9) उणीव सड असणाऱ्या मेंढ्या कळपातून काढून टाकल्यास मरणप्रमाण कमी करणे शक्‍य होते.
10) कोकरू जन्मल्यावर त्याची नाळ शरीरापासून पाच सें.मी. दुरून कापून काढावी, त्यास टिंक्‍चर आयोडीन लावावे.
11) कोकरू तीन ते चार महिन्यांचे झाल्यानंतर पशुवैद्याच्या सल्ल्यानुसार जंतनिर्मूलन करावे.
12) औषधोपचार आणि लसीकरणापूर्वी पशुवैद्याचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

मोसंबीची फळगळ ...

फळगळीची कारणे आणि उपाययोजना - आंबेबहरातील फूल व फळगळ ही फुले लागल्यापासून सर्वसाधारण तीन टप्प्यांत होते. 
1) मोसंबीस जितकी फुले लागतात, त्याच्या एक ते दोन टक्केच फळांची काढणी होते. फुलापासून बाजरी ते ज्वारीच्या आकाराची फळे असताना फळांची पहिली गळ होते, कारण हा काळ फेब्रुवारी- मार्चचा असतो. या काळात उन्हामुळे तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअसच्या वर जाते. अशा उष्णतेने फळांतील ऑक्‍झिनचे प्रमाण एकदम कमी होते, त्यामुळे फळांच्या देठात ऑब्सिशन झोन तयार होतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होते. हा झोन तयार होण्यास कोरडी हवा, उन्हाच्या झळा कारणीभूत ठरतात. यामुळे पुढे फळांची गळ होते. 
2) अन्नद्रव्यांची कमतरता - जमिनीतून नत्राचा पुरवठा कमी झाल्यास किंवा सर्वसाधारणतः अन्नद्रव्यांची जमिनीतून कमतरता भासल्यास अशी गळ होते. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे काढणीपूर्वीची फळगळसुद्धा होऊ शकते. 
3) रोगामुळे होणारी फळगळ - लिंबूवर्गीय झाडावरील फळगळ प्रामुख्याने बोट्रिडीप्लोडिया थिओब्रोमी, कोलेट्रो ट्रिकम ग्लोईओस्पोरिऑइड्‌स व काही अंशी अल्टरनेरिया सिट्री या बुरशींमुळे होते. या बुरशी फळाच्या देठाद्वारे फळामध्ये प्रवेश करून पूर्ण वाढलेल्या फळाचे नुकसान करतात. या बुरशींचे जिवाणू झाडावरील जुन्या वाळलेल्या फांद्यांमुळे मोठ्या प्रमाणात पसरतात. तसेच काळीमाशी, मावा आदींच्या साखरयुक्त चिकट- गोड पदार्थावरील वाढलेल्या बुरशीमुळे पेशीक्षय लवकर होऊन फळगळ होते. फळ काढणी अगोदरची फळगळ ही मुख्यतः रोग, कीड तसेच जमिनीतील कमी- जास्त ओलाव्यामुळे आणि नत्राच्या अचानक भासलेल्या कमतरतेमुळे होते. 

उपाय योजना - 1) अशा परिस्थितीमध्ये फळगळ नियंत्रित करण्यासाठी अन्नद्रव्याचा योग्य पुरवठा ठेवावा. 
2) बागेत आर्द्रता तयार होण्यासाठी शक्‍य झाल्यास मोकळे पाणी द्यावे. बागेभोवती वाराप्रतिबंधक झाडांची लागवड करावी. 
3) झाडावर फळे बाजरी ते ज्वारीच्या आकाराची असताना एनएए, कार्बेन्डाझिम आणि युरियाच्या मिश्रणाची फवारणी करावी. हे मिश्रण तयार करण्यासाठी दीड ग्रॅम एनएए पावडर एक कपभर ऍसिटोनमध्ये चार ते पाच मिनिटे चांगली मिसळावी, त्यात पाणी टाकत द्रावण हलवत ठेवावे. हे द्रावण 100 लिटर या प्रमाणात तयार करावे. या 100 लिटर द्रावणात 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि दिड किलो युरिया मिसळावा. या द्रावणाच्या दोन फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात. 
4) सध्याच्या फळगळ नियंत्रणासाठी पाऊस कमी असल्यास सिंचनाद्वारे योग्य तितके पाणी द्यावे. येत्या काळात पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास बागेत पाणी साचणार नाही अशा प्रकारे निचरा करावा. पाऊस जास्त झाल्यास जमिनीतून थोडासा युरिया (100 ग्रॅम प्रति झाड) द्यावा, त्यामुळे झाडाला जोम येतो. त्यानंतर वरीलप्रमाणे एनएए, कार्बेन्डाझिम आणि युरियाच्या मिश्रणाच्या 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. 

फळांतील रसाचे शोषण करणारा पतंग - 
आंबे बहराच्या फळांची वाढ झाल्यानंतर ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यांत या पतंगांचा उपद्रव होतो. हे पतंग फळांतील रसाचे शोषण करतात, यामुळे फळे जमिनीवर गळून पडलेली दिसतात.
 
नियंत्रणाचे उपाय - 1) या किडींच्या नियंत्रणासाठी बागेत झाडाखाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. रस शोषून घेणाऱ्या पतंगांसाठी विषारी आमिष करावे. त्याकरिता एक किलो गूळ + एक लिटर मोसंबी फळांचा रस + 200 मि.लि. मॅलॅथिऑन प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून मिश्रण तयार करावे. साधारणपणे 300 मि.लि. मिश्रण रुंद तोंडाच्या डब्यात ओतून हा डबा बागेतील झाडावर बांधावा. प्रति दहा झाडामध्ये एक डबा बांधावा.