Wednesday, July 18, 2012

तंत्र मिरची लागवडीचे

मिरचीची रोपवाटिका तयार करताना जमीन पाणथळ नसावी. त्या ठिकाणी सावली नसावी. पाणीपुरवठ्याची सोय जवळच उपलब्ध असावी. रोपे तयार करण्यासाठी एक किलो बियाणे प्रति हेक्‍टर पुरेसे होते. गादी वाफ्यावर पेरणीपूर्वी तीन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. रोपवाटिकेमुळे पिकांची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. हराळी किंवा लव्हाळा असणारी जमीन रोपवाटिकेसाठी निवडू नये, रोपवाटिकेच्या क्षेत्रासाठी जमिनीची खोल नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमिनीच्या उतारानुसार 3 x 1 मीटरचे गादी वाफे तयार करावेत. पेरणीपूर्वी गादी वाफ्यात 30 ग्रॅम ब्लायटॉक्‍स जमिनीत मिसळावे; तसेच 10 ते 12 किलो चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. दोन ओळींतील अंतर आठ ते दहा सें.मी. ठेवून, एक ते 1.5 सें.मी. खोलीवर बियांची पातळ पेरणी करून बारीक मातीने बियाणे झाकावे. बियाण्याची उगवण होईपर्यंत आच्छादन झाकून सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे, त्यानंतर जरुरीप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. नंतर 10 ते 12 दिवसांनी दोन ओळींमध्ये एक सें.मी. खोलीपर्यंत खुरप्याने काकरी पाडून प्रत्येक वाफ्यास 25 ते 30 ग्रॅम फोरेट देऊन पाणी द्यावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी प्रति वाफ्यास रोपांच्या जोमदार वाढीसाठी 20 ते 25 ग्रॅम युरिया दोन ओळींमध्ये काकरी पाडून द्यावा आणि मातीने झाकावा. फुलकिडी व करपा रोगापासून संरक्षण होण्यासाठी 12 मि.लि. नुवाक्रॉन अधिक 25 ग्रॅम डायथेन एम - 45 प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून उगवण झाल्यानंतर दर दहा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. साधारणपणे चार ते पाच आठवड्यांत रोपे लागवडीस तयार होतात. रोपांची उंची जास्त झाल्यास पुनर्लागणीच्या अगोदर शेंडे कापावेत. 

हिरव्या मिरचीच्या फळांमध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात; तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस ही खनिजद्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर प्रथिने, क्षारही असतात. मिरचीचा आहाराबरोबरच औषधातही मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या रासायनिक पदार्थामुळे मिरचीला तिखटपणा प्राप्त होतो. अन्नप्रक्रिया उद्योग, तसेच रंगनिर्मितीमध्ये ओलिओरेझिनचा वापर केला जातो. 
मिरची पिकास वाढीच्या सुरवातीच्या काळात उष्ण व दमट, तर पक्वता अवस्थेत कोरडे हवामान चांगले मानवते. मिरची पिकाच्या वाढीसाठी 25 ते 28 अंश सेल्सिअस तापमान आदर्श असते. अतिथंड हवामान (दहा सेल्सिअस खाली) मिरचीला मानवत नाही. मिरचीची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामांत चांगल्या प्रकारे करता येते. खरिपासाठी मे - जूनमध्ये रोपे तयार करून त्यांची जून - जुलैमध्ये पुनर्लागण; रब्बीसाठी सप्टेंबर - ऑक्‍टोबरमध्ये रोपे तयार करून ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये पुनर्लागण व उन्हाळी हंगामासाठी डिसेंबरमध्ये रोपे तयार करून त्यांची जानेवारी - फेब्रुवारीमध्ये पुनर्लागण करावी. 

मिरचीची लागवड हलक्‍या, वालुकामय जमिनीपासून खोल, काळ्या कसदार जमिनीपर्यंत यशस्वीरीत्या करता येते. गाळाच्या व पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते. जमीन कोणत्याही प्रकारची असली तरी उत्तम निचरा होणारी, उत्तम सुपीकता असलेली व चांगली पाणी धारण क्षमता असलेली निवडावी. भारी जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होत नसल्यास रोपांच्या वाढीवर परिणाम होतो. आम्ल जमिनी मिरची लागवडीसाठी योग्य नसतात. चुनखडीच्या जमिनीत चांगले उत्पादन मिळते. चांगल्या उत्पादनासाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा आणि ईसी 0.2 पर्यंत असावा. लागवडीसाठी जमीन भुसभुशीत असणे आवश्‍यक असते. 


रोपांची पुनर्लागण - 
मिरची लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची खोलवर नांगरट करून, दोन - तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. खत कमी असल्यास कुण्या पाडून मूठभर शेणखत रोपलागवडीच्या ठिकाणी टाकावे. मार्करच्या साहाय्याने जमीन आखून कुण्या पाडाव्यात. दोन ओळींतील व दोन झाडांतील अंतर जमिनीचा प्रकार व जातीपरत्वे ठेवावे. साधारणतः उंच वाढणाऱ्या व पसारा जास्त असणाऱ्या जातीसाठी भारी जमिनीत 60 ु 60 सें.मी. व मध्यम जमिनीत 60 ु 45 सें.मी. एवढे अंतर ठेवावे. 
रोप लावणीच्या ठिकाणी फुलीवर चिमूटभर थिमेट ठेवून एका ठिकाणी दोन रोपांची पाणी टाकून पुनर्लागण करावी. पुनर्लागणीपूर्वी दहा लिटर पाण्यात 14 मि.लि. नुवाक्रॉन अधिक 25 ग्रॅम डायथेन एम-45 अधिक पाण्यात विरघळणारे गंधक 30 ग्रॅम याप्रमाणे द्रावण करून रोपांचा पानाकडील भाग द्रावणात दोन मिनिटे बुडवून रोपांची पुनर्लागण करावी. मिरची लागवडीसाठी योग्य वेळ माहिती असणे आवश्‍यक आहे. जिरायती परिस्थितीत रोप लागणीच्या वेळेवरच मिरचीचे उत्पादन अवलंबून असते. मिरची हे पीक आंतरमशागतीस चांगला प्रतिसाद देते. त्यासाठी जरुरीप्रमाणे खुरपणी व दोन ते तीन वेळा कोळपणी केल्याने तणांचा बंदोबस्त तर होतोच, शिवाय जमिनीत हवा खेळती राहून मुळांची व झाडांची वाढ चांगली होते. फुले भरपूर लागून फळांची संख्या वाढते. झाडे जमिनीवर लोळू नयेत म्हणून पुनर्लागणीनंतर एक महिन्याने झाडांना कोळप्यांनी भर द्यावी. 

खत मात्रा - 
खतांची मात्रा जातीपरत्वे ठरवावी. साधारणतः जिराईत मिरचीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या जातीसाठी 100 किलो नत्र (225 किलो युरिया), 25 किलो स्फुरद (150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्‍टरी या प्रमाणात द्यावे. 50 टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद पुनर्लागणीनंतर दहा दिवसांनी झाडाभोवती खुरप्याच्या साहाय्याने रिंग पाडून पहिला हप्ता द्यावा. पुनर्लागणीनंतर एक महिन्याने नत्राचा दुसरा हप्ता (फुले लागण्यास सुरवात होताना) 50 टक्के नत्र रिंग पद्धतीने झाडांना द्यावे. खतांमुळे झाडांना फांद्या, फुले, फळे भरपूर लागतात. पीक फुलोऱ्यात असताना फुलगळ होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. 

5) मिरचीच्या प्रमुख जाती - 
फळांचा रंग, आकार व लांबीनुसार मिरचीच्या भरपूर जाती लागवडीसाठी उपलब्ध आहेत. वाळलेल्या मिरचीसाठी पातळ साल, कमी बिया आणि घट्ट देठ असलेली मिरचीची जात योग्य असते; तर हिरव्या मिरचीसाठी लांबट, चकाकीयुक्त व आकर्षक हिरवी, फिक्कट हिरवी जात योग्य आहे. 

1) मुसळेवाडी सिलेक्‍शन - 
फळे मध्यम, सहा ते सात सें.मी. लांब, फळांचा रंग गर्द हिरवा असून, त्यावर काळ्या रंगाचे चट्टे असतात. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असून, रंग टिकून राहतो. ही जात बोकड्या, भुरी आणि डायबॅक रोगाला कमी बळी पडणारी आहे. वाळलेल्या मिरचीचे सरासरी उत्पादन 12 ते 16 क्विंटल आहे. ही जात महाराष्ट्रामध्ये खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे. 

2) अग्निरेखा - 
फळे मोठी आणि साधारणपणे 11 सें.मी. लांबीची असतात. फळांचा रंग हिरवा असून, त्यावर थोड्या प्रमाणात सुरकुत्या असतात. हिरव्या फळांचा तोडा करण्यास ही जात उपयुक्त आहे; तसेच वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असून, हेक्‍टरी सरासरी उत्पादन 25 ते 26 क्विंटल आहे. भुरी व मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही. 

3) फुले ज्योती - 
फळे घोसात लागतात आणि एका घोसात चार ते पाच फळे असतात. फळांची लांबी सहा ते आठ सें.मी. असते. फळांचा रंग हिरवट असून, पिकल्यावर लाल होतो. वाळलेल्या मिरचीचे 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर उत्पादन मिळते. ही जात भुरी रोगाला कमी प्रमाणात बळी पडते, तर फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करते. पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. 

4) संकेश्‍वरी - 32 - 
या जातीची लागवड प्रामुख्याने लाल मिरचीसाठी केली जाते. फळांचा रंग आकर्षक तांबडा असतो; परंतु साठवणुकीत मात्र जास्त काळ टिकत नाही. तिखटपणा मध्यम असतो. ही जात प्रामुख्याने कोरडवाहूसाठी मोठ्या प्रमाणात लागवड करतात. 

5) ब्याडगी - 
साठवणुकीत फळांचा रंग चांगला टिकतो. फळांची लांबी 10 ते 12 सें.मी. असून, फळांवर सुरकुत्यांचे प्रमाण जास्त आहे. फळांची साल जाड आहे. तिखटपणा अतिशय कमी आहे. 

6) ज्वाला -
हिरव्या मिरचीसाठी चांगली आहे. लाल मिरची तोडून वाळविल्यानंतर साठवणुकीमुळे पांढरी पडते. या जातीस फांद्या भरपूर असतात. फळे सर्वसाधारणपणे 10 ते 12 सें.मी. लांब असून, आडव्या सुरकुत्या असतात. तिखटपणा जास्त आहे.

7) पंत सी-1 - 
ही जात हिरवी व लाल मिरचीसाठी चांगली आहे. मिरची झाडाला उलटी लागते. फळाची लांबी किमान तीन ते चार सें.मी. इतकी असते. तिखटपणा जास्त आहे.

8) फुले सई - 
झाड मध्यम उंचीचे असून, झुडपाच्या आकाराचे आहे. फळे आठ सें.मी. लांब असून, वाळविल्यानंतर रंग गर्द लाल होतो. तिखटपणा मध्यम आहे. ही जात फुलकिडी तसेच काळा करप्यास मध्यम प्रतिकारक आहे. उत्पादनात संकेश्‍वरी 32 आणि ब्याडगीपेक्षा सरस आहे.