Sunday, March 18, 2012

पर्जन्य जलसंवर्धन ही काळाची गरज

पावसाचे पाणी योग्य पद्धतीने साठवून त्याचा काटेकोर वापर करणे येत्या काळात महत्त्वाचे आहे. उपलब्ध पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी, कारखानदारीसाठी करून विकास साधणे आवश्‍यक आहे. जलसंधारणाच्या योग्य पद्धतीने पावसाचे पाणी साठवल्याने ते जमिनीत मुरेल. त्याचा पाणीपुरवठ्यासाठी वापर करता येईल. काही भागांत पावसाचे पाणी हेच जीवनमानासाठी उपयुक्त आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि दररोजच्या पाण्याच्या गरजा भागवणारी प्रणाली आहे. छतावरून आणि छपरावरून गोळा केलेले पाणी पिण्यासाठी योग्य असेलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही, त्यामुळे अशा पाण्याला प्रक्रिया करून वापरणे आवश्‍यक ठरते. जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते. तेथे ही प्रणाली उपयुक्त ठरते. पावसाचे पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामध्ये एखाद्या घरगुती वापरापासून ते चांगल्या पद्धतीचे संपूर्ण गावाचे विकासासाठी आखणी आणि नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्याचा पाठपुरावा दरवर्षी करून ते करणे शक्‍य होते. या पद्धतीत त्या भागात होणारे वार्षिक पाऊसमान मिलिमीटर x क्षेत्र चौरस मीटर = लिटर पाणी प्रति वर्षी असा हिशोब तयार करून ते करावे लागते. उदा. 200 चौरस मीटर छपरावरून वाहणारे पाणी x 1000 मिलिमीटर सरासरी पाऊसमान = 22 किलो लिटर प्रति वर्षी पाणी साठवणे शक्‍य असते.

पाणी साठवण टाक्‍यांमध्ये पाण्याची साठवण करावयाची झाल्यास अशा टाक्‍यांना झाकण असणे गरजेचे असते. तसेच शेवाळाची वाढ थांबवणे आणि पाणी दूषित होण्याचा धोका कमी करणे शक्‍य असते.

घराशेजारी मोठा खड्डा घेऊन तो आतून प्लॅस्टर करावा लागतो. त्यामुळे त्या खड्ड्यात निचऱ्याचे पाणी शिरण्यास प्रतिबंध होतो. तसेच बाहेरून वाहून येणाऱ्या पाण्यासही प्रतिबंध करता येतो. केरळमधील कन्नूर येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये टाक्‍यांमध्ये पाणी साठवून वापर करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. पावसाचे पाणी भूगर्भात साठवून भूगर्भाची पाणीपातळी वाढविली जाते. ही पद्धती अमेरिकेत आणि युरोपमध्ये आता प्रचलित झाली आहे. हे काम करणाऱ्या कंपन्याही जगभर स्थापन झाल्या आहेत. जेव्हा पाणी कपातीचे प्रश्‍न निर्माण होतात. तेव्हा शहरी भागासाठी ही पद्धती अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या पद्धतीने जेथे पाणी वापरावयाचे आहे तेथेच ते साठवून त्याचा उपयोग करणे शक्‍य आहे.

पावसाचे पाणी साठविण्यासाठी कायदे :
(1) अमेरिकेसारख्या संघ राज्यात काही राज्यांचे कायदे हे जमीन मालकांच्या बाजूने आहेत. तर काही राज्यांचे कायदे हे राज्याची पाणी उत्पादन या दिशेने केले आहेत. अशा राज्यात पाणी साठवणाऱ्यांचा हक्क फक्त साठवण्यापुरताच मर्यादित आहे. मात्र ते पाणी साठविण्यासाठी राज्यातील सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज असते. उदाहरणार्थ, अमेरिकेतील कोलेरोडो राज्यात घराच्या छताचे वरून वाहणारे पाणी तुम्ही परवानगी घेतल्याशिवाय साठवू शकत नाही.
(2) ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियामध्ये पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली आहे. तेथे घर मालकांना अशा प्रकारे पाणी साठवण करून वापरण्याची मुक्तता आहे.
(3) श्रीलंका : श्रीलंकेत शहरी विकास प्राधिकरण हे पावसाचे पाणी साठविण्यास प्रोत्साहन देत आहे.

पावसाच्या साठवलेल्या पाण्याची प्रत :
पावसाचे पाणी हे हवेतील, छतांवरील धुळीमुळे दूषित होते, त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी योग्य ठरतेच असे नाही. अशा पाण्यात जंतूंचे प्रमाणही अधिक असते; परंतु अशा पाण्याची प्रत चांगली असल्यास ते सर्व कारणासाठी वापरले जाते. अशा पाण्यात चुना, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅश, क्‍लोरिन, सल्फेट यांचे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे कार्बन-डाय-ऑक्‍साईड, नाट्रस ऑक्‍साईड याचेही प्रमाण अधिक असते. ते प्रमुख्याने पहिल्या पावसाचे पाणी गोळा केले जाते. त्यात अधिक प्रमाणात असते. त्यासाठी पहिल्या पावसाचे पाणी वेगळ्या पद्धतीने प्रथम इतरत्र सोडून देऊन त्यानंतरचे पाणी साठविण्याची त्यांची पद्धत आहे. त्यासाठी पाणी तपासणी करणेही गरजेचे असते आणि ते चांगले असल्यास ते पाणी वापरण्यास योग्य असते. काही ठिकाणी सोलर कुकरद्वारे ते प्रथम उकळून नंतर ते साठवले जाते. ब्राझीलमध्ये अशा पाण्यात क्‍लोरिन मिसळून ते जंतूरहित करून वापरले जाते. त्यामुळे सोलर कुकरही स्वस्तात पाणी शुद्ध करण्याची प्रणाली जगभर वापरली जाते.

प्राचीन काळातील संकल्पना :
पॅलेस्टाईन, ग्रीस, रोम येथे इ.स. पूर्व 300 वर्षांपासून ही संकल्पना वापरली जाते. बलुचिस्तान आणि कच्छ भागात शेतकरीवर्ग पाणीसाठे करून शेतीसाठी वापरीत असत. तमिळनाडूमध्ये चोल राज्याने तशाच प्रकारच्या योजना प्रथम अस्तित्वात आणल्या. भारतातील एलिफंटा गुहेमध्ये अशा प्रकारे पाणी साठवण्याची सोय आहे. तसेच ब्रिहदेश्‍वर मंदिर परिसरातही शिवगंगा तळ्यात पाणी साठवण करून वापरले जाई.

सद्यःस्थिती :
(1) चीन, ब्राझीलमध्ये छतावरील वाहून जाणारे पाणी साठवून वापरले जाते आहे. त्याच प्रकारे साठवलेल्या पाण्यावर जनावरांचे संगोपन करण्याचे काम केले जाते. अशा प्रकारचे प्रकल्प सध्या मोठ्या प्रमाणात आखले जात आहेत.
(2) बरमुडामध्ये घरामध्ये पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी कायदा आहे. सिनेगल आणि गिआनामध्ये अशाच प्रकारे काम चालू आहे.
(4) युरोपमध्ये प्रत्येक बगीच्यामध्ये पाणी साठवण व्यवस्था केली जाते. त्या त्या बागेतील झाडे त्याच पाण्यावर जगवली जातात.
(5) ब्रिटिश शासनाने पावसाचे पाणी टाक्‍यांमध्ये साठवून स्वच्छतेच्या कामासाठी वापरण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे 50 टक्के पाण्याची गरज अशा प्रकारे भागवली जाते.
(6) म्यानमारमध्ये भूगर्भातील पाणी खारवट असल्याने पावसाचे पाणी साठवण्यावर त्याचाच वापर केला जात आहे.
(7) मेक्‍सिकोमध्ये पावसाचे पाणी साठवणे सक्तीचे केले आहे.
(8) बीजिंगमध्ये काही गृहरचना संस्था अशा प्रकारे पाणी साठवण करून सभासदांना पुरवठा करीत आहेत.
भारतातील स्थिती
(1) तमिळनाडू : प्रत्येक इमारत बांधकामांना पावसाचे पाणी साठवण्याची सक्ती आहे. तेथील गेल्या पाच वर्षांचे अभ्यासात भूगर्भाचा पाणीसाठा वाढल्याचे लक्षात आले आहे.
(2) राजस्थान : फार प्राचीन काळापासून पावसाचे पाणी साठवून वापरले जाते आहे.
(3) केरळ ः पावसाचे पाणी साठवून वापरण्याचे प्रकल्प आकार घेत आहेत.
(4) महाराष्ट्र ः किल्ल्यावर खास पाणी साठवणुकीसाठी टाके आढळतात. पूर्वी या पाण्याचा वापर होत होता. आता विदर्भात काही प्रकल्प आकार घेत असून, जेथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे तेथे तळी आणि तलावाचे बांधकाम होत आहे.

Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120308/4753423128981250651.htm