Sunday, March 18, 2012

उन्हाळ्यात सांभाळा जनावरांना...

अरुण देशमुख, डॉ. परशुराम ढोले

उन्हाळ्यामध्ये जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन त्यांची गरज भागविली जाते. बऱ्याच वेळेस निकृष्ट प्रतीचे खाद्य दिले जाते. त्याचा शरीरवाढीवर परिणाम होतो, तसेच उष्माघाताची लक्षणे दिसतात. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन येत्या काळात जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन ठेवावे.

उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल होतो. उन्हाळ्यामध्ये जनावरांना मिळेल ते खाद्य देऊन त्यांची गरज भागविणे यावरच भर दिला जातो, त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस निकृष्ट प्रतीचे खाद्य दिले जाते. जनावरे खाताना रवंथ करत नाहीत, त्यामुळे अपचनासारखे आजार होतात. त्या कारणाने ते चारा कमी खातात किंवा पूर्णपणे बंद करतात. म्हणून दूध उत्पादनात घट होते, प्रजनन क्षमता कमी होते, वजन घटते. अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे "तडक्‍या'सारखे कातडीचे आजार होतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांचे योग्य व्यवस्थापन करून, उष्णतेचा ताण कमी करून उत्पादन टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते.

जनावरांच्या शरीरामध्ये त्यांनी खाल्लेले अन्न, शरीरात साठविलेली चरबी व पोटामध्ये होणारी आंबवण क्रिया इत्यादी कारणांनी ऊर्जा निर्माण होते. शरीरात निर्माण झालेल्या ऊर्जेचा उपयोग शरीरक्रिया चालू ठेवण्यासाठी होत असतो, त्याशिवाय अतिरिक्त ऊर्जा जनावरांच्या शरीरवाढीसाठी व दूध उत्पादनवाढीसाठी उपयोगी असते. जनावरांच्या शरीरात एकूण उत्पादित ऊर्जेचा बराचसा भाग शेण, लघवी (मूत्र) किंवा वाफ वायुस्वरूपात आणि घामाद्वारे शरीराबाहेर टाकला जातो, त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते.

उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचेही तापमान वाढते. हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातील उष्णता शरीरक्रियेचा वेग वाढवून शरीराबाहेर टाकावी लागते, त्यामुळे शरीरक्रियेवर ताण पडतो, त्याचा परिणाम म्हणून तापमान नियंत्रणासाठी जनावरे पाणी अधिक पितात, चारा किंवा खाद्य कमी खातात. साधारणतः जनावरांचे आरोग्य चांगले असते, अशावेळेस देशी गाईचे कमाल तापमान 95 अंश फॅ., तर म्हशीचे कमाल तापमान 100 अंश फॅ. असते.

उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या अति प्रखर किरणांच्या संपर्कामुळे किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता, तसेच पन्हाळी किंवा सिमेंटच्या (जीआय सीट) पत्र्याचा वापर केलेल्या एकाच गोठ्यात जास्त जनावरांची गर्दी केल्यास उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, म्हणून पत्र्यावर उसाचे पाचट किंवा इतर आच्छादन करणे गरजेचे असते.

उष्माघाताची लक्षणे ः
1) जनावर अस्वस्थ होते, जनावराची तहान - भूक मंद होते.
2) जनावराच्या शरीराचे तापमान 104 ते 106 अंश फॅ. इतके वाढून कातडी कोरडी पडते.
3) जनावराच्या श्‍वासोच्छ्वासाचा दर वाढून धाप लागल्यासारखे होते.
4) जनावरांचे डोळे लालसर होऊन डोळ्यांतून पाणी गळते.
5) जनावरांना आठ तासांनंतर अतिसार होतो.
6) जनावरांचे लघवीचे प्रमाण कमी होते.
7) ..............जनावरे बसून घेतात.
8) गाभण गाई गाभडण्याचे प्रमाण वाढते.
उपचार ः
1) जनावरास थंड पाण्याने स्वच्छ धुऊन काढावे. झाडाच्या सावलीत अथवा इतर थंड ठिकाणी बांधावे. हलके पाचक गूळमिश्रित खाद्य द्यावे.
2) जनावरांच्या दोन्ही शिंगांच्या मध्ये पाण्याने ओले केलेले कापड ठेवून त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे.
3) जनावरास नियमित व वारंवार (साधारणतः तीन - चार वेळेस) भरपूर थंड पाणी पाजावे.
4) उष्माघात झालेल्या जनावरांना पशुतज्ज्ञांकडून डेक्‍स्ट्रोज सलाईन आवश्‍यकतेनुसार शिरेद्वारे द्यावे. ऍव्हिलचे इंजेक्‍शन 10 मि.लि. कातडीखाली द्यावे. या रोगावर कोणत्याही प्रकारच्या जुलाबरोधक औषधाचा उपयोग होत नाही.

उन्हाळ्यात घ्यावयाची विशेष काळजी ः
म्हशींचा निसर्गतःच रंग काळा असतो; तसेच कातडीसुद्धा जाड असते. उन्हाची तीव्रता वाढली की ती लगेच तापते. गाईपेक्षा म्हशींमध्ये घामग्रंथींची संख्या कमी असते, त्यामुळे घामावाटे फारशी उष्णता बाहेर पडत नाही म्हणून तापलेले शरीराचे तापमान कमी किंवा थंड ठेवण्यासाठी म्हशींना पाण्यात डुंबू देणे उपयुक्त ठरते. संकरित गाईंच्या बाबतीत तर उन्हाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
1) जनावरांना गोठ्यामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावे. गोठ्याच्या छपरावर गवत, पालापाचोळा टाकून पाणी शिंपडावे, त्यामुळे गोठा थंड राहतो.
2) उन्हाळ्यामध्ये जनावरांना तीन - चार वेळा थंड पाणी पाजावे.
3) आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा.
4) जनावरांना उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस चरण्यासाठी पाठवू नये.
5) गोठ्यामध्ये अधूनमधून पाणी फवारावे.
6) रात्री व पहाटेच्या वेळी वाळलेली वैरण भरपूर द्यावी. दुपारच्या प्रहरी हिरवी मका, चवळी, कडवळ, लसूण घास यासारखी पोषक वैरण द्यावी, त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते, प्रजनन क्षमताही सुधारते.
7) उन्हाळ्यामध्ये माजाचा कालावधी कमी असतो, बऱ्याच वेळा मुका माज जाणवतो. म्हशींमध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. त्यासाठी थंड प्रहरी जनावरांचे बारकाईने निरीक्षण करून माजाची लक्षणे पाहणे किंवा खच्चीकरण केलेला वळू जनावरामागे फिरवून माजावरील जनावरे ओळखता येतील. माजावर आलेली जनावरे दुपारच्या वेळेस न भरवता त्याऐवजी सकाळी किंवा उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर भरविल्यास गर्भधारणेचे प्रमाण वाढून जनावरे उन्हाळ्यातही गाभण राहतील.
8) खाद्यातून "अ' जीवनसत्त्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा द्यावा.
9) उन्हाळ्यात जनावरांना लाळ्या खुरकूत व फऱ्या यासारख्या रोगांची रोगप्रतिबंधक लस योग्य वेळी टोचून घ्यावी.
10) दुभत्या जनावरांप्रमाणे लहान वासरे, कालवडी, पारड्या, भाकड जनावरे व गाभण जनावरे यांचीही योग्य ती काळजी घ्यावी, त्यामुळे निश्‍चितच फायदा होईल.

संपर्क ः श्री. देशमुख ः 9422737089
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कार्यरत आहेत.)

Reff. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120319/5030366332808558980.htm