Friday, January 13, 2012

पाण्याचे प्रमाणच ठरवते मिरच्यांचा तिखटपणा

- बियांच्या प्रमाणाचाही असतो सिंचनाच्या पाण्याशी संबंध
- इंग्लंडमधील इंडियाना विद्यापीठातील संशोधन 

जंगली मिरच्या या त्यांचा तिखटपणा आणि उष्ण गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहेत. या मिरच्या फ्युजारियम या बुरशीसाठी काही प्रमाणात प्रतिकारक असतात; मात्र त्यांच्या या गुणधर्मांमध्ये सातत्य असत नाही. काही मिरच्या अत्यंत तिखट असतात, तर काही अजिबात तिखट नसतात. हे असे का होत असावे, यावर इंग्लंडमधील इंडियाना विद्यापीठामध्ये संशोधन करण्यात आले. त्यामध्ये मिरची रोपांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर त्यातील तिखटपणा ठरत असून, बियांचे प्रमाणही ठरत असल्याचे आढळून आले आहे. 

तिखट मिरच्या या कोरडवाहू भागामध्ये कमी पाण्यावर येत असल्या, तरी त्यामध्ये अधिक बियांची निर्मिती होण्यासाठी अधिक पाण्याची आवश्‍यकता असते. कोरड्या वातावरणामध्ये फ्युजारियमचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. पावसाळी वातावरणात फ्युजारियम अधिक चांगल्या प्रमाणात वाढते, त्यामुळे जंगली मिरच्या तिखटपणासाठी कारणीभूत असलेल्या कॅपसायसिन या घटकांचे प्रमाण प्रतिकारासाठी वाढवत असल्याचे आढळले आहे. याबाबत बोलताना संशोधक डेव्हिड हाक म्हणाले, की कोरड्या वातावरणामध्ये तिखटपणा कमी होत असला तरी त्यांचे उष्ण गुणधर्म तिथेच राहतात, त्यामुळे कमी तिखट मिरच्या अधिक प्रमाणात बियांची निर्मिती करतात. याचा उपयोग बियाणे निर्मितीसाठी करणे शक्‍य आहे. 

...असे झाले संशोधन 
या संशोधनामध्ये सन 2002 ते 2009 या काळात आग्नेय बोलिविया प्रांतातील 12 जंगली मिरच्यांच्या प्रजातींमधील तिखटपणाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये परिसरातील 185 मैल पट्ट्यातील कोरड्या आणि ओलिताखालील प्रदेशातील मिरच्यांचा अंतर्भाव करण्यात आला. त्यामध्ये परिसरातील पावसाचे प्रमाण आणि मिरचीचा तिखटपणा यांच्या संबंधाचा अभ्यास केला, त्यासाठी हरितगृहामध्येही या विषयावर अनेक प्रयोग करण्यात आले. त्याचा उपयोग प्रत्यक्ष शेतावरील स्थितीमध्ये घडणाऱ्या निष्कर्षांशी तुलना करण्यासाठी करण्यात आला. 330 मिरचीची रोपे ही फुले येईपर्यंत समान वातावरणात वाढवली. त्यानंतर त्यामध्ये दोन विभाग केले. एका गटाला मुबलक पाणी पुरवले आणि दुसऱ्या गटाला बोलिविया प्रांतामधील सरासरी पावसाच्या प्रमाणात पाण्याचा ताण दिला. या ताण दिलेल्या व कमी तिखट मिरची रोपांपासून नेहमी मिळणाऱ्या बियांच्या दुप्पट बिया मिळाल्या. त्यांचे प्रमाण तिखट बियांइतकेच असल्याचेही आढळून आले. 

कोरड्या वातावरणामध्ये बियांची संख्या कमी ठेवून मिरची रोपे त्यांची संख्या कमी ठेवतात. त्या कमी बियांच्या संरक्षणासाठी अधिक कॅपसायसिन तयार करतात. पाण्याची उपलब्धता असताना कमी तिखट मिरच्यांवर फ्युजारियमचा प्रादुर्भाव होऊन त्यांच्या बिया खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. हाक यांनी सांगितले, की तिखट मिरच्यांतून कॅपसायसिन तयार करण्याच्या प्रक्रियेत पाण्याचा काटेकोर वापर करण्याची आवश्‍यकता या प्रयोगातून समोर आली. पावसाळी वातावरणात कमी तिखट मिरचीच्या 90 ते 95 टक्के फळांवर फ्युजारियमचा प्रादुर्भाव होतो. तिखट मिरच्या मोठ्या प्रमाणात स्वतःचा बचाव करू शकतात. 

हे संशोधन इंग्लंडमधील "रॉयल सोसायटी ऑफ सायन्स'च्या इतिवृत्तात प्रकाशित करण्यात आले आहे.


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120105/4723757374140624037.htm