Friday, January 13, 2012

कमी पाण्याच्या पट्ट्यात कष्टाने फुलवली ऊस-द्राक्ष शेती

अवर्षणग्रस्त विटा भागातील संग्राम जाधव यांची किफायतशीर शेती 
ठिबक सिंचन, पीक फेरपालट, हिरवळीची खते यांवर दिला भर 

नियोजनबद्ध शेती हीच बाब अलीकडच्या काळात शेती फायदेशीर करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत सूत्रबद्ध नियोजन केले तर फायदेशीर शेतीत तिचे रूपांतर करता येते. सांगली जिल्ह्यातील वाझर (ता. खानापूर) येथील संग्राम खानाजीराव जाधव यांनी दाखवून दिले आहे. सुमारे पस्तीस एकर शेतीतून सातत्याने नफा कमविला आहे. ऊस, द्राक्षांसह फळबागांची शेती त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून फुलविली आहे. पिकांची फेरपालट व ठिबक सिंचनाचा वापर हे त्यांच्या उत्पादनवाढीचे सूत्र आहे. विशेष करून ऊस पीक घेताना त्यांनी ही पद्धत वापरली व उत्पादन वाढविले. पिके घेताना त्यांनी जमीन सुधारण्यासाठी घेतलेली पिके व त्यात राखलेले सातत्य वाखाणण्याजोगे ठरले आहे. 
राजकुमार चौगुले 

वाझर. सांगली जिल्ह्यात विट्यापासून सतरा किलोमीटर अंतरावर असणारे खानापूर तालुक्‍यातील केवळ चौदाशे लोकसंख्येचे गाव. येरळा नदीवर असणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व आरफळ योजनेमुळे या गावात काही प्रमाणात समृद्धी आली आहे. विटा हा तसा अवर्षणाचा पट्टा. त्यामुळे हे गावही त्याच पट्ट्यातले. मात्र काही प्रमाणात पाणी आल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतीत काहीतरी बदल करण्यासाठी वाव मिळाला आहे. वाझर गावातले संग्राम जाधव यांचे नाव या भागात त्याबाबतीत आदराने घेतले जाते. दिवसभर शेतीत रमून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे त्यांचा नेहमीच ओढा राहिला आहे. अर्थशास्त्र व इतिहास विषयांतून त्यांनी पदवी घेतली आहे. पण वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच शेतीत काम करण्यास सुरवात केल्यामुळे आपले शिक्षण पूर्ण होताच त्यांनी पुन्हा आपले लक्ष शेतीकडे वळवले. 

संग्राम यांचे वडील खानाजीराव (वय 80) हे येरळा विकास संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या संस्थेमुळे या भागात शेती फुलली. सन 1976 मध्ये तत्कालीन मंत्री एन. डी. पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा 2000 मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर या भागात पाणी आले. येरळा नदीच्या पाण्यावर संग्राम यांनी द्राक्षाबरोबरच ढोबळी मिरची, टोमॅटोचे पीक काही वर्षे घेतले. पण योग्य भावाचे गणित न जमल्याने त्यांनी भाजीपाल्याची शेती सोडून दिली. सन 2003 ला या भागात मोठा दुष्काळ पडला. इतर पिकांबरोबर द्राक्ष बाग वाचविणेही कठीण झाले. पाणी नसल्याने मोठ्या प्रमाणात शेती असूनही संग्राम यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. पाण्याचे महत्त्व काय असते हे संग्राम यांना या काळात पुरेपूर उमगत होते. यामुळेच त्यांनी कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त शेती करण्याचा निर्णय घेतला. याबाबत प्रयत्न सुरू केले. संग्राम यांच्याकडे ऊस क्षेत्र होते; परंतु पाणी नसल्याने उत्पादनवाढीला मर्यादा होती. कमीत कमी पाणी वापर करण्याच्या त्यांच्या इच्छेला ठिबक सिंचनाच्या रूपाने मूर्त स्वरूप मिळाले. दुष्काळात पोळलेल्या संग्राम यांनी 2006 ला उसासाठी ठिबक करण्याचा प्रयोग राबविला. या क्षेत्रातील एका कंपनीच्या साह्याने त्यांनी पहिल्यांदाच साडेतीन एकरांवर ठिबकचा प्रयोग केला आणि येथूनच पाणी व्यवस्थापन साधत त्यांनी उत्पादन वाढीकडे वाटचाल सुरू केली. 

....अशी आहे संग्राम यांची शेती 
संग्राम यांच्याकडे वडिलोपार्जित एकत्रित अशी पंचेचाळीस एकर शेती आहे. त्यापैकी पस्तीस एकर क्षेत्रावर विविध पिके आहेत. दहा एकर क्षेत्रावर ऊस, साडेसहा एकरावर द्राक्षे, पाच एकरावर -----------डाळिंब, दोन एकरावर डाळिंब, तर चिकू, पेरूची बाग एक एकरावर आहे. विविध पिके असूनही त्यांचे नियोजन सूत्रबद्ध पद्धतीने केले जाते. एकात्मिक शेती असली तरी मुख्य पिके म्हणून ऊस व द्राक्षे हीच आहेत. या सर्व पिकांना ठिबक सिंचनाने पाणी दिले गेले आहे. मिश्र पद्धतीची अर्थात माळ, चुनखडी, थोडी काळी अशा पद्धतीची जमीन आहे. शेतीच्या मध्यभागी असणाऱ्या दोन विहिरींत शेतीतील इतर कूपनलिकांचे पाणी एकत्रित केले जाते. तेथून ठिबकने सर्व शेतात पाणीपुरवठा केला जातो. 

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी फेरपालटीत सातत्य 
वीस एकर क्षेत्रात आलटून पालटून ऊस शेती केली जाते. दहा- दहा एकर अशा दोन क्षेत्रांत ऊस पीक घेतले जाते. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या नियमात खंड पडला नाही. दहा एकर क्षेत्रातील खोडवा गेल्यानंतर पाला कुट्टी करून रोटर फिरवला जातो. नांगरट करून रान रिकामे केले जाते. वीस मेच्या दरम्यान सोयाबीनची टोकण केली जाते. सोयाबीन काढणीनंतर रब्बी हंगामात हरभऱ्याचे पीक घेतले जाते. हरभरा करण्यापूर्वी नांगरट करून रोटर फिरवला जातो. अडीच फुटांची सरी करून हरभरा वापरला जातो. सरी फोडल्यानंतर हरभरा बुंध्यात येतो. बुंधा पूर्ण भिजेल या पद्धतीने हळूवार पाणी दिले जाते. हरभऱ्याची उगवण, फुलकळी येण्याअगोदर, फुलकळी आल्यानंतर, पाणी दिले जाते. हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर ताग विस्कटला जातो. तागाला तीन वेळा पाणी दिले जाते. फुलोऱ्यात आल्यानंतर ताग जमिनीत गाडला जातो. यानंतर नांगरट करून रान वाळविण्यासाठी सोडून दिले जाते. जमिनीची सुपीकता टिकविणे हा महत्त्वाचा उद्देश यामागे असतो. शक्‍यतो करून ऑगस्टमध्ये आडसाली लावणीला प्राधान्य दिले जाते. 

उसासाठी रान तयार करताना होणारा दुहेरी फायदा 
खोडवा गेल्यानंतर जमिनीची सुपीकता व बेवड मिळविण्याच्या उद्देशानेच इतर पिके वर्षभरात घेतली जातात. शेणखत व इतर तत्सम खते महाग असल्याने खतांचा खर्च परवडत नाही. यामुळे पिकांची फेरपालट करून, शेताला ताकद देणारी पिके घेऊन जमीन सुपीक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वर्षभराच्या या प्रयत्नातून सोयाबीनचे एकरी दहा ते बारा क्विंटल, हरभऱ्याचे सरासरी सात क्विंटल इतके उत्पादन घेतले जाते. प्रत्येक वेळी ऊस पीक घेऊन महागडी खते घालण्यापेक्षा एक वर्ष दुसरी पिके घेऊन जमिनीचा पोत सुधारल्यास उसासाठी ते निश्‍चितपणे फायदेशीर ठरत असल्याचा आपला अनुभव असल्याचे संग्राम म्हणतात. 

ऊस लावण करताना ती पाच फुटी सरी सोडून केली जाते. को 86032 या जातीच्या लागवडीला अधिक प्राधान्य दिले जाते. रान तयार केल्यानंतर सहा पोती सुपर फॉस्फेट, दोनशे किलो निंबोळी पेंड, युरिया एक पोते, डी.ए.पी. दोन पोती, गांडूळ खत एकरी दहा पोती अशी मात्रा दिली जाते. दात्री मारून ठिबकच्या साह्याने पूर्ण आठ तास पाणी देऊन रान भिजविले जाते. पूर्ण ओल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन डोळ्यांच्या टिपरीची बेणेप्रकिया करून लावण केली जाते. दोन टिपऱ्यांमध्ये एक फुटाचे अंतर ठेवले जाते. आडसाली लावणीसाठी दोन फुटांचे अंतर ठेवले जाते. 

पाणी देताना दक्षता 
ठिबकने पाणी देतानाही दक्षता पाळण्याची गरज असल्याचे संग्राम सांगतात. गरजेनुसार पीक गुणांक पाहून पाणी गरजेचे असते. लावणीवेळी बाष्पीभवन व पीक गुणांकानुसार एकरी सहा ते सात हजार लिटर पाणी लागते. एक दिवसाआड पाण्याचे नियोजन केले जाते. आठ दिवसांनंतर पाण्याचे नियोजन बदलले जाते. मार्च ते मे या कालावधीत दररोज अडीच ते तीन तास, पाणी दिले जाते. 

ठिबकमधून खताचा जास्तीत जास्त वापर 
लावणीनंतर पंधरा दिवसांनी ठिबकमधून युरिया एकरी 250 ग्रॅम दिला जातो. एक महिन्यानंतर 12:61 खत वाढविले जाते. एकूण वर्षभरात 270 व्या दिवसापर्यंत युरिया 550 ते 600 किलो, एम.ओ.पी. 400 किलो, 0.0.50 हे खत 25 किलो इतके दिले जाते. जिवाणूखत देताना रासायनिक खताची मात्रा पूर्णपणे थांबविली जाते. 

झिंक सल्फेट पाच किलो, फेरस सल्फेट पाच किलो, मॅंगेनीज दोन किलो, बोरॉन एक किलो, मॅग्नेशिअम वीस किलो, गांडूळ खत 250 किलो इतकी खताची मात्रा देऊन बाळभरणी केली जाते. तिसऱ्या महिन्यात भरणीच्या वेळी पुन्हा असा डोस देऊन भरणी केली जाते. सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या चार फवारण्या केल्या जातात. पहिल्या महिन्यात 19:19:19 दिले जाते. प्रत्येक फवारणीत काही बदल केले जातात. तिसऱ्या फेरीस 19:19:19 ऐवजी 0:52: 34 तर चौथ्या फवारणीत 0:52:34 ऐवजी 0: 0:50 वापरले जाते. 

50 टनांपासून 80 टनांपर्यंत उत्पादन वाढले 
गेल्या दहा वर्षांपासून ऊस पीक घेताना फेरपालटीत सातत्य ठेवल्याने व ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर केल्याने आता एकरी उत्पादन 40 ते 50 टनांपासून 80 टनापर्यंत पोचले आहे. हे उत्पादन प्रत्येक वर्षी याच पातळीवर राहील असा प्रयत्न केला जातो. अलीकडे शेतकरी जमिनीचा पोत वाढविण्याकडे कमी लक्ष देतात. याचा दूरगामी परिणाम उत्पादन घटण्यात दिसून येतो. पाणी मुबलक असूनही उत्पादन वाढत नाही. मात्र संग्राम यांनी विचारपूर्वक ऊस शेतीचे नियोजन केले आहे. 

संग्राम यांनी आपल्या ऊसशेतीत "सबसरफेस ठिबक' सिंचनाचा प्रयोग केला आहे. परिसरातील हा त्यांचा असा पहिलाच प्रयोग असावा. या प्रयोगामुळे उंदरांचा त्रास कमी झाला, ऊस तोडणीच्या वेळी सुलभता येते, पाइप वरच्या भागात नसल्याने ती तुटत नाही. चोकअप होण्याची शक्‍यता कमी असते. यामुळे पाण्यामध्ये अधिक प्रमाणात बचत होते असे त्यांचे म्हणणे आहे. सुमारे सहा एकर क्षेत्रावर सबसरफेस ठिबक यंत्रणा त्यांनी बसविली आहे. 

एक एकर ऊसाकरिता येणारा खर्च 
तपशील रुपये 
नांगरट- 1400 
रोटर-1000 
सरी- 600 
युरिया-1680 
अन्नद्रव्ये- 3000 
जिवाण ूखत- 330 
फवारणी-4200 
मजुरी- 3600 
भरणी- 2100 
व अन्य - 
................................ 
एकूण खर्च 20,000 -------(17,910)-------- 

उत्पादन 80 टन 
एकूण उत्पन्न- एक लाख 60 हजार (2000 रुपये प्रति टन याप्रमाणे) 
खर्च वजा जाता मिळणारी रक्कम- एक लाख 40 हजार 

द्राक्षपिकाकडेही लक्ष 
संग्राम यांची सहा एकर क्षेत्रावर द्राक्ष बागही आहे. तास-ए- गणेश जातीच्या द्राक्षांची लागवड त्यांनी केली आहे. सन 1973 पासून त्यांच्या वडिलांनी काही प्रमाणात द्राक्ष लागवड केली. आजही संग्राम यांनी ती परंपरा सुरू ठेवली आहे. द्राक्ष क्षेत्रालाही ठिबक सिंचनाची जोड दिली आहे. सन 2006 पर्यंत निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले जात होते. सन 2006 मध्ये झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागेचे अतोनात नुकसान झाले. द्राक्षांचा दर्जा ढासळला. कवडीमोल किमतीला द्राक्षे विकावी लागली. त्या वेळेपासून मात्र त्यांनी स्थानिक ठिकाणी द्राक्षे विक्रीसाठी पाठविली. कीडनाशकांची मात्रा, पीएचआय, छाटणीचा कालावधी, वातावरण या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. यानुसार फवारणीचे नियोजन केले जाते. भुरी व डाऊनी नियंत्रणासाठी बुरशीनाशके वेळेवर फवारली जातात. एकूण एक लाख रुपयांचा खर्च वजा जाता प्रत्येक वर्षी एकरी दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पादन या पिकातून मिळत असल्याचे संग्राम यांनी सांगितले. 

डाळिंबही फुलवले 
संग्राम यांनी खडकाळ जमिनीत डाळिंबाची बागही फुलविली आहे. डाळिंबाचे त्यांनी गेल्या वर्षी पहिल्यांदाच पीक घेतले. या पिकाबाबत पूर्ण माहिती नसल्याने त्यांनी राज्यभर फिरून त्याबाबतची माहिती संकलित केली. या क्षेत्रातील अनेक जाणत्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या अनुभवांची शिदोरी घेऊन भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली. शेणखत, गांडूळ खत झाडाला वीस ते चाळीस किलो दिले. तेलकट डाग रोग येऊ नये यासाठी ते काटेकोर राहिले आहेत. डाळिंबाचे अवशेष ते नष्ट करतात. पाण्याचे जेमतेम नियोजन असल्याने ठिबकचाच आधार घेतला. गेल्या वर्षी खर्च वजा जाता या पिकातून एक लाख रुपयांचा नफा झाला. अजूनही डाळिंब शेतीत खूप काही करायचे असल्याचे संग्राम यांनी सांगितले. डाळिंबाशिवाय चिकू व पेरूचेही 

...असा आहे संग्राम यांचा दिनक्रम 
सकाळी आठ वाजता ते शेतात येतात. शेतात दहा जनावरांचा गोठाही आहे. गावरान जातीच्या म्हशी आहेत. एक देशी गाय आहे. दररोज दहा ते पंधरा लिटर दुधाची विक्री केली जाते. जनावरांचे व्यवस्थापन पाहिल्यानंतर ते शेतीच्या कामाची पाहणी करतात. शेतात दहा मजूर कायमस्वरूपी आहेत. दिवस उजाडल्यापासून फवारणी, पाणी, तसेच अन्य नियोजन सुरू होते. भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार पाण्याचे नियोजन केले जाते. मजूर उपलब्ध नसेल तर संग्राम स्वत: काम करतात. आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे ते सामाजिक व राजकीय कामासाठी देतात. ते अनेक संस्थांचे पदाधिकारीही आहेत. बचत गटाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी संपर्क करतात. नावीन्यपूर्ण शेती पाहण्यासाठी ते अन्य शेतकऱ्यांबरोबर विविध ठिकाणी जाऊन माहिती घेतात. याचा खूप मोठा उपयोग शेती सुधारण्यासाठी होत असल्याचे त्यांचे मत आहे. 

नैसर्गिक आपत्तीसाठी रक्कम शिल्लक ठेवावी 
संग्राम यांनी शेतीतील अनुभव कथन करताना सांगितले, की प्रत्येक दोन ते तीन वर्षाला एखादी नैसर्गिक आपत्ती येत असते. यामुळे शेती तोट्यात येते. यामुळे नवीन पिके घेण्यात शेतकऱ्यांकडे पैसे नसतो. मी शेती करत असल्यापासून असेच होत आले आहे. यातून मी शिकत आलो आहे. आपल्याला मिळणाऱ्या नफ्यातून काही रक्कम शिल्लक ठेवणे गरजेचे आहे. एखादे वेळी नैसर्गिक आपत्ती आल्यास शिल्लक रक्कम खूप मोठा आधार ठरते. शेतकऱ्यांनी प्रत्येक वर्षी थोडी का होईना ही तजवीज करावी या आग्रहाचा मी आहे. 

जाधव यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
* पिकांच्या फेरपालटीला महत्त्व, दहा वर्षांपासून पिकांच्या फेरपालटीत सातत्य 
* ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करून उत्पादनवाढ 
* रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खताचा वापर 
* सबसरफेस ठिबक सिंचनाचा प्रयोग 
* उसाबरोबरच द्राक्ष, डाळिंब पिकांचेही व्यवस्थापन 
* कमीत कमी पाणी वापरण्याकडे कल 
-अनुभवी शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी- शिकाऊ वृत्ती


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120111/4718744531294090928.htm