Showing posts with label agri business. Show all posts
Showing posts with label agri business. Show all posts

Tuesday, July 10, 2012

20 गुंठ्यांतील शेवग्याने दिले लाखाचे उत्पन्न

अनेक शेतकरी प्रगतिशील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहून प्रेरणा घेतात व आपल्यासाठी नवे असलेल्या पिकाचा प्रयोग करून पाहतात. अर्थात यश-अपयश या पुढील गोष्टी असतात. मात्र प्रयत्नवादातून काही ना काही अनुकूल असे पदरी पडू शकते. सांगली जिल्ह्यातील कुंडल (ता. पलूस) येथील सूतगिरणी कामगार शहाजी लाड सांगली येथील एका सूतगिरणीमध्ये सुमारे 22 वर्षे नोकरीस होते. गिरणी बंद पडल्यानंतर ते आपल्या गावी कुंडलला परतले. वडिलोपार्जित त्यांची तीन एकर शेती पलूस परिसरात ती आहे. संपूर्ण जमीन खडकाळ स्वरूपाची आहे. या ठिकाणी शेती विकसित करण्यासाठी प्रथम त्यांनी कूपनलिका व विहीर खोदून पाण्याची सोय केली. 

साधारणपणे 20 ते 25 वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्तीच्या काळातील आयुष्य निवांत जगण्याची इच्छा बहुतेकांना असते. लाड यांनी मात्र शेतीतच आपले जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. मुलगा व पत्नीचीही त्यांना साथ मिळाली. 

लाड यांनी वास्तव्यासाठी शेतातच घर बांधले आहे. त्या परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट स्थापन केला आहे. त्या गटाचे लाड सदस्य आहेत. या गटाद्वारे चर्चासत्रे, शेतीच्या विविध योजनांची माहिती याची चर्चा होत असे. त्यातूनच शेवगा शेतीची माहिती लाड यांना मिळाली. पूर्वी शेताच्या बांधावर किंवा घराच्या परसात शेवग्याचे झाड अशी संकल्पना होती. खुद्द लाड यांचीही अशीच धारणा होती. मात्र सातारा जिल्ह्यातील खंडाळा- पारगाव परिसरातील एका प्रयोगशील शेतकऱ्याची शेवगा पिकाची यशकथा त्यांच्या पाहण्यात आली. तेथे जाऊन त्यांनी लागवड, पिकाचे संगोपन या विषयी माहिती घेतली. त्यातून हे पीक फायदेशीर ठरेल असे वाटल्यानंतर त्याची लागवड करण्याचा निर्णय पक्का केला. 

शेवगा पिकाचे नियोजन 
लाड यांच्याकडे ऊस, हळद अशी पिके आहेत. उसाचे उत्पादन तसे कमी म्हणजे एकरी 35 ते 40 टनांपर्यंतच. त्यांची एकूण शेती तीन एकर. त्यामुळे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने काही नव्या पिकाची वा प्रयोगाची गरज होतीच. 

मुलगा वैभव परिसरातील साखर कारखान्यात नोकरीस आहे. त्याला मदतीला घेतले. शेवगा पिकासाठी वीस गुंठे जमीन निवडली. जमिनीची नांगरट व चांगली मशागत केली. तीन फूट अंतराच्या सऱ्या सोडल्या. सप्टेंबर- ऑक्‍टोबर 2011 च्या पहिल्या आठवड्यात या क्षेत्रात कांदा लावला. एका आठवड्याने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून आणलेल्या कोइमतूर जातीच्या शेवग्याच्या बियाण्यांची टोकण केली. दोन झाडांतील अंतर पाच फूट व दोन ओळींतील अंतर सहा फूट ठेवले. आठ ते दहा दिवसांत बियाण्यांची उगवण झाली. गरजेप्रमाणे पाण्याच्या पाळ्या दिल्या. तीन महिन्यांनी कांद्याचे पीक काढले. त्या वेळी शेवग्याच्या झाडाची उंची साडेतीन फुटाच्या आसपास होती. फुटवे वाढावेत यासाठी शेंडा खुडण्यात आला. 

खत व्यवस्थापन 
शेवगा पिकाला रासायनिक खतांपेक्षा जैविक खतांवर भर दिला. शेण, गोमूत्र, गूळ, डाळीचे पीठ याचे मिश्रण करून कुजवून स्लरी तयार केली. दर पंधरा ते वीस दिवस या प्रमाणे ही स्लरी पाण्याद्वारे किंवा झाडाभोवती गोलाकार पद्धतीने दिली. पीक संरक्षणात कडुनिंबावर आधारित कीडनाशकाचा वापर केला. 
मार्केटिंग सुमारे साडेचार महिन्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनास सुरवात झाली. शेंगांनी लगडलेली झाडे पाहून लाडही भारावले. एकेका झाडाला सत्तर ते ऐंशीपर्यंत शेंगांची संख्या होती. शेंगांची लांबी तीन ते चार फुटांपर्यंत होती. रंगही हिरवा होता. परिसरातील इस्लामपूर, सांगली, कऱ्हाड, विटा येथील बाजारात सौद्याद्वारे शेंगाची विक्री होत होती. गोणपाट जमिनीवर अंथरून त्यात या शेंगा बांधल्या जात होत्या. चाळीस ते पन्नास किलोचे पॅकिंग तयार केले जात होते. सुरवातीला शेंगांचा दर प्रति किलो 20 रुपये होता. मध्यंतरी तो तीस रुपयांपर्यंतही गेला. सध्याही एवढाच मिळत आहे. सरासरी दर 23 रुपये मिळाला. स्थानिक बाजारात लाड यांच्या घरातील महिला सदस्यांनी शेंगांची विक्री केली. मंडईत प्रति तीन ते चार शेंगांना 10 रुपये या भावाने आठवडा बाजारात 50 ते 60 किलो शेंगा विकल्या जात. वाहतूक, विक्रीसाठी लागणारा वेळ व तुलनेत विकला जाणारा माल हे गणित परवडणारे नव्हते. यासाठी सौद्यातच शेंगा विक्रीला प्राधान्य दिले. काही वेळा व्यापाऱ्यांनी जागेवरही खरेदी केली. 

धान्य महोत्सवातही सहभाग 
सांगलीच्या कृषी विभागातर्फे शेतकरी ते थेट ग्राहक असा धान्य महोत्सव झाला. तेथे शेंगा विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. 

जमाखर्च (रुपयांत) 
मशागत- 1000 
बियाणे- 1500 
खते, कीडनाशके- 3750 
स्लरी - 1000 
भांगलण व काढणी - 2300 
आंतरमशागत - 1000 
वाहतूक - 3000 
बारदान खर्च - 450 


एकूण- 14,000 रु. 

एकूण हंगामात लाड यांना प्रति किलो सरासरी 23 रुपये दर मिळाला. एकूण क्षेत्रातून चार टनांपर्यंत माल निघाला. साधारणपणे 96 हजार रुपये मिळाले. कांद्याच्या आंतरपिकातून 16 हजार रुपये मिळाले. एकूण एक लाख 12 हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले. उत्पादन खर्च 14 हजार रुपये वजा जाता 98 हजार रुपये नफा मिळाला. युवा शेतकरी रवींद्र लाड, कृषी विभाग यांचेही सहकार्य लाड यांना या प्रयोगात मिळाले. 

यांत्रिकीकरण 
लाड ज्या गटाचे सदस्य आहेत त्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 14 छोटे पॉवर टिलर खरेदी केले आहेत. त्याद्वारे शेवगा तसेच ऊस शेतीतील आंतरमशागत केली जाते. त्याद्वारे भांगलणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. 
लाड यांना शेवग्याच्या खोडवा राखायचा आहे. जमिनीपासून एक फूट अंतरावर जेथून फुटवे फुटले आहेत त्यापासून थोड्या अंतरावर फांद्यांची छाटणी त्यांना करायची आहे. मात्र खोडवा पिकातून अपेक्षित उत्पादन मिळेल काय या विचारात ते आहेत. त्यासाठी ते सल्लाही घेणार आहेत. 

लाड यांच्या शेती नियोजनातील वैशिष्ट्ये- 
आंतरपिकातून मुख्य पिकातील उत्पादनखर्च कमी करणे 
रासायनिक खतांचा मर्यादित वापर 
जैविक स्लरी देण्यावर भर 
यांत्रिकीकरणाला सुरवात 

संपर्क - शहाजी लाड- 9975111300 
वैभव लाड- 9623443824 


Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120706/5554582116795004730.htm

Thursday, July 5, 2012

(इफेक्‍टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स) 'ईएम'

"ईएम' (इफेक्‍टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स) हे एक परिणामकारक नैसर्गिक, सजीव जिवाणूंचा समावेश असलेले द्रावण आहे. याचा वापर शेती, कुक्कुटपालन, पशुपालन, घन कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, सेंद्रिय खतनिर्मितीमध्ये फायदेशीर दिसून आला आहे. 

ज्या जमिनीचा सामू वाढलेला आहे अशा ठिकाणी ईएम-2 या द्रावणाच्या वापरामुळे विशेषतः ऊस या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीची झाल्याचे दिसून येते. मुळांची वाढ, पेरांची संख्या, फुटव्यांची संख्या, तसेच पेऱ्यातील अंतर वाढल्याचे दिसून आले. याचे द्रावण आम्लधर्मी असल्यामुळे ठिबक सिंचन संचामध्ये अडकणारे क्षार विरघळून जातात. शेवाळ वाढत नाही. जिवाणू खतांचा ईएम-2 सोबत केलेला वापर जास्त परिणामकारक दिसून येतो. याच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये चांगल्या पद्धतीचा परिणाम दिसून येतो. रोपवाटिकेमध्ये ईएम-2 चा वापर केल्यामुळे रोपांच्या मुळांची वाढ चांगली होते, रोपे तजेलदार होतात. 

एक लिटर ईएम-2 द्रावण प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून याचा वापर शेतीसाठी तसेच रोपवाटिकेसाठी करावा. आम्ही आमच्या केंद्राच्या रोपवाटिकेत याची फवारणी तसेच आळवणी देतो. 

फळझाडांसाठी आठवड्यातून एकदा ठिबक सिंचनातून ईएम-2 दिले जाते. यासाठी एक लिटर ईएम-2 प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून व्हेंचुरीच्या माध्यमातून द्यावे, ईएमचा वापर करताना विद्राव्य खत त्याच वेळी पिकांना देऊ नये. मोसंबी, संत्रा या पिकाला ईएमचा वापर केल्याने फुले लागण्याचे प्रमाण वाढले, फळधारणा चांगली झाली. या द्रावणाच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. सेंद्रिय घटकांच्या वाढीमुळे पांढऱ्या मुळ्या वाढतात. झाडाची अन्नद्रव्य ग्रहणाची शक्ती वाढते. पिकाची चांगली वाढ होते. फळांची गुणवत्ता वाढलेली दिसून आली आहे. काही शेतकरी केळी पिकासाठी ठिबक सिंचनातून याचा वापर करतात, त्यामुळे पिकाची एकसारखी वाढ झाल्याचे दिसून आले. 

ईएमचा वापर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर करण्यात येत आहे. यांचे चांगले फायदे दिसून आले आहेत. काही शेतकरी चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, द्राक्ष, ऊस, केळी या पिकांसाठी वापर करताहेत. 

काही शेतकरी गोठा स्वच्छता, गांडूळ खतनिर्मितीमध्ये याचा वापर करताहेत. साधारणपणे 100 लिटर पाण्यात एक लिटर ईएम-2 हे द्रावण मिसळून गोठ्यात फवारणी केली असता गोठ्यातील दुर्गंधी कमी होते. जनावरांना माश्‍या, चिलटांचा त्रास कमी होतो. गांडूळ खताच्या वाफ्यावर याची फवारणी केली असता लवकर खत तयार होण्यास मदत होते. पालापाचोळा लवकर कुजतो. 


Ref. link: http://www.agrowon.com/Agrowon/20120229/4742729865648037900.htm

बहुपयोगी वाळा लागवड

भारतामध्ये उत्तर प्रदेशात जंगलांमधून व तमिळनाडू, केरळ इ. राज्यांत वाळा लागवड करून तेलनिर्मिती केली जाते. या गवताची लागवड मृद, जल संधारणासाठी उत्कृष्ट समजली जाते. पडीक माळराने, नापिक जमिनी, जास्त धूप होणाऱ्या जमिनी इ. ठिकाणी लागवडीसाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. या बहुवर्षायू, सुंदर दिसणाऱ्या गवताची मुळे काहीशी कंदवर्गीय असतात, त्यांची वाढ माती, हवामान यांच्या अनुकूलतेप्रमाणे 10-35 सें.मी.पर्यंत होते. हे गवत दोन मीटरपर्यंत वाढते. पाने अरुंद, चपटी, चकचकीत, तेलकट असतात. अनेक ताटे झुबक्‍याने एकत्र वाढतात व त्यामुळे या गवताचे बोंधे तयार होते. लागवडीनंतर झाडे एक-दोन वर्षांची झाल्यानंतर त्यांस पुष्पगुच्छ येतात. 

या बहुवर्षायू गवतास वाढीसाठी उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. 1000 ते 2000 मि.मी. पाऊस आणि 21 ते 43 अंश से. तापमानाच्या ठिकाणी, हलक्‍या ते मध्यम जमिनीत हे गवत चांगले वाढते. त्याचप्रमाणे 9.5 ते 10.5 सामू असलेल्या व भारी जमिनीत, मोकळ्या पडलेल्या, खार, चढ - उताराच्या, नदीकाठच्या, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीतही याची लागवड होऊ शकते. गवताची लागवड "स्लिप्स'पासून केली जाते. यासाठी गवताची ताटे वेगवेगळी केली जातात, त्याची वरील पाने तोडून 10 ते 20 सें.मी.ची स्लिप्स लागवडीसाठी तयार केली जातात. दोन - तीन ताटे बरोबरीने असतात, ती वेगळी करणे आवश्‍यक असते. लागवड फेब्रुवारीपर्यंत केली जाते. लागवडीसाठी सरी - वरंबे 60 सें.मी. अंतराने तयार करून सरीमध्ये 60 x 60 सें.मी. अंतराने ओळीने लागवड करावी. शेतात कुजलेले शेणखत प्रति हेक्‍टरी दहा बैलगाड्या टाकून मातीत मिसळावे. लागवडीपूर्वी शेत चांगले नांगरून तणे, काडीकचरा वेचून तयार करणे आवश्‍यक असते. पावसाळ्यानंतर लागवड करावयाची झाल्यास लागवडीनंतर लगेचच पाणी देणे आवश्‍यक असते. या गवताच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची आवश्‍यकता असते. वणवा, थंडी इ.साठी हे गवत कणखर मानले जाते. 

काढणी -
लागवडीनंतर 18 ते 24 महिन्यांनंतर वाळ्याची मुळे काढणीयोग्य होतात. मुळे हाताने अथवा नांगराने काढली जातात. काढलेल्या मुळांची माती, काडी-कचरा काढून टाकण्यासाठी पाण्यात स्वच्छ धुवावी. ताज्या मुळांमध्ये तेल कमी मिळत असल्याने मुळे वाळवूनच तेल काढण्यासाठी वापरली जातात. मुळे वाळविण्यापूर्वी त्यांचे लहान लहान तुकडे करणे आवश्‍यक असते. मुळांची काढणी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते. हवामान व पीक व्यवस्थापनानुसार प्रति हेक्‍टरी 10 ते 50 क्विंटल मुळांचे उत्पादन मिळते. सरासरी प्रति हेक्‍टरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन मिळते. यामध्ये खुशीमोल, व्हेटीसेलीनॉल, युडेसॅमॉल, खुशीलॉल, खुशीन, खुशेर, खुशीऑल, व्हीटीव्हेरी हे रासायनिक घटक असतात. 

उपयोग -
पाण्याची वाफ (स्टीम डिस्टिलेशन) वापरून ताज्या किंवा वाळलेल्या मुळांपासून तेल काढले जाते. साठवलेल्या मुळांपासून चांगल्या प्रतीचे तेल मिळते, त्यामुळे काढणीनंतर चार ते सहा महिने मुळे साठवून ठेवणे आवश्‍यक असते. 

तेल ः अत्तरे, सौंदर्यप्रसाधने, उटणे, साबण आणि अन्य तेलांच्या निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. तेलामधून व्हीटीव्हेरॉल, व्हीटीव्हेरॉन इत्यादी द्रव्ये काढली जातात. तंबाखू, पान मसाला, शीतपेये यांना सुवासिक स्वाद देण्यासाठीही तेलाचा वापर होतो. 

पाने ः कोवळ्या पानांचा गुरांना चारा म्हणून आणि घोड्यांना बसण्यासाठी वापर केला जातो. झाडू, टोपल्या इ. वस्तू पानांपासून बनविल्या जातात. जास्त तापमान असलेल्या प्रदेशात पानांचा वापर कुलरमध्ये अथवा कर्टन तयार करून घरातील तापमान कमी करण्यासाठी केला जातो. लिखाणाचे किंवा प्रिंटिंग पेपर निर्मितीसाठीही पानांचा वापर होतो. 

जल-मृद्‌संधारणासाठी वनीकरण गरजेचे 
आपल्या परिसरातील जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चालले आहे; तसेच झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणाचा परिणाम वनसंपदेवर होताना दिसतो. वनांच्या कमी झालेल्या क्षेत्रामुळे ऋतुमानात बदल होत आहेत. जंगलांच्या घटलेल्या प्रमाणामुळे मातीची धूप झाली आहे, जलस्रोतांवर परिणाम झालेला आहे; माती, पाणी इ.वर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. एक सें.मी. मातीचा थर तयार होण्यास हजारो वर्षे लागतात. खडकांची झीज होऊन विविध सूक्ष्मजीव, शेवाळ, नेचेवर्गीय, अपुष्प, पुष्पवर्गीय वनस्पतींच्या सहयोगाने माती तयार होते. जंगलाचे जमिनीवरील आवरण कमी झाल्याने पर्यावरणात असमतोल निर्माण झाला आहे. अन्नसाखळ्यांचे संतुलन बिघडले आहे. रस्ते दुतर्फा, नद्याकाठ, शेते इ. ठिकाणी धुपणासाठी संवेदनशील आहेत. 
मातीच्या संवर्धनासाठी नैसर्गिक स्थिती आपण जर पाहिली तर पहिल्या पावसानंतर लगेचच गवत येते. या गवतामुळे हजारो टन मातीचे संवर्धन होते; परंतु बऱ्याचशा भूभागावर गवतही आढळत नाही, अशा परिस्थितीमध्ये मोठे नुकसान होते. शक्‍यतो यासाठी प्रदेशनिष्ठ किंवा त्याच प्रदेशात मिळणाऱ्या प्रजातींचा वापर करणे आवश्‍यक आहे. परदेशातील प्रजाती वापरल्याने त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवर विपरीत परिणाम होतात, हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. म्हणून वनस्पतिशास्त्राच्या आधाराने निवडक प्रजातींचीच लागवड करणे आवश्‍यक आहे. 

योग्य प्रजातींची निवड ः 
एकदल प्रवर्गातील गवत म्हणजेच तण यात काही वर्षायू आहेत, तर काही बहुवर्षायू. या गवताची लागवड बियांपासून, खोडांच्या किंवा मुळांच्या छाटांपासून केली जाते. गवतांचे मृद्‌ व जलसंधारणासाठीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 
कुश गवत ः हे गवत बहुवार्षिक असल्याने खोड ताठ आणि दांडगे असते. भुईसरपट आडवे जाणारे, अनेक खोडे या प्रजातीस असतात, त्यापासून अनेक शाखा येतात आणि आजूबाजूला नवांकुर येऊन नवीन झाडे मुख्य झाडाभोवती तयार होतात. कमी पाण्यावर येणारे हे गवत खोडाच्या किंवा मुळांच्या छाटाने लागवड करतात. 
मुंज ः हे गवत चांगले वाढते. खोड ताठ, जोरदार कांडे असणारे असते. या बहुवर्षायू गवताची लागवड बिया किंवा खोडाच्या छाटांपासून केली जाते. 
मारवेल ः या गवताची उंची 15 ते 90 सें.मी.पर्यंत वाढते. लागवड बियांपासून केली जाते. 
वाळा (खस) ः यास "व्हेटीव्हर' असेही म्हणतात. या बहुवर्षायू गवताची उगवण दाट होते. हे गवत मृद्‌संधारणासाठी अतिशय चांगले मानले जाते. लागवड "स्लिप्स'पासून केली जाते. 
कुंदा ः हे गवत तीन फुटांपर्यंत वाढते. हे गवत बहुवर्षायू असून, या गवताला आडवे खोड असते. त्यापासून धुमारे निघतात आणि बियांपासून याची लागवड होऊ शकते. 
पवना ः सुमारे तीन फुटांपर्यंत वाढणाऱ्या या बहुवर्षायू गवताचे खोड मुळाजवळ जाड, भक्कम व गुळगुळीत असते. लागवड बियांपासून होते. 
शेंडा ः हे बहुवर्षायू गवत दोन फुटांपर्यंत वाढते. पवना गवतासारखे दिसणारे; मात्र खोड थोडे लवचिक असते. लागवड बियांपासून होते. 
मोशी ः डोंगर उतारावर 15 ते 50 सें.मी.पर्यंत वाढते. हे बहुवर्षायू गवत आहे. तामरट, दूर्वा, गवती चहा, सिझेनेला, जावा, बेर, कुशळी इ. गवतांचाही वापर करून मातीचे पावसाने होणारे नुकसान आपण टाळू शकतो. या गवताची लागवड बियाणे वापरून करावयाची झाल्यास भातासारखी धूळपेरणी मे महिन्यात करावी. 

पारंपरिक गवताबरोबरच गिन्नी, रोड्‌स, सिटारिया, पॅराग्रास इ. गवतांची लागवड मृद्‌संधारणाबरोबरच गुरांना चारा म्हणून केली जाते. नद्या, नाले, ओहोळ, रस्ते खचणे, ढासळणे इ.साठी बांबू फायदेशीर आहे. देशामध्ये बांबूच्या 140 प्रजाती आढळतात. यातील प्रामुख्याने आढळणाऱ्या आणि आपल्याकडे होऊ शकणाऱ्या बांबूंमध्ये कळक, मानवेल, चिवारी, मेस, कोंड्यामेस, मेसकाठी, पिवळाबांबू, बुद्धा बांबू इ.ची लागवड आपण नवीन येणारे फुटवे (कंद), बिया, खोडांचे छाट इ.पासून करू शकतो. 

गवताबरोबरच झुडपांचेही महत्त्व तेवढेच आहे. गवताच्या बरोबरीने झुडपांची लागवड केल्यास ती अधिक प्रभावी होऊन मृद्‌ व जलसंधारणासाठी उपयुक्त ठरते. यासाठी करवंद, घायपात, निर्गुडी, अडुळसा, मेंदी, कडू मेंदी, चित्रक इ.ची लागवड आपण करू शकतो. गवत, झुडपे आणि झाडे यांच्या माध्यमातून मातीची धूप आपण थांबवू शकतो, यासाठी पूर्ण प्रजातींची निवड वनस्पती तज्ज्ञांच्या मदतीने करून घेणे आवश्‍यक असते. 

गवताची वैशिष्ट्ये ः 
गवत वर्षभर उपलब्ध होऊन वेगवेगळ्या हवामानांत गवताची वाढ होऊ शकते. जमिनीच्या वरच्या तसेच खालच्या थरात वाढ होत असल्याने माती धरून ठेवण्यास इतर वनस्पतींपेक्षा फारच मदत होऊ शकते. कमीत कमी पाण्यावर, कोणत्याही हवामानात तसेच जमिनीत गवताची वाढ चांगली होऊ शकते. फुटव्यांची संख्या खूप असते. लवकरात लवकर वाढ होते. गवताचा वाढलेला भाग जरी जनावराने खाल्ला तरी खालील भाग तसाच राहिल्याने पुढील गवताची वाढ चांगली व जोमाने होते, त्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसून येते, त्यामुळे रानटी जनावरांसाठी वर्षभर खाद्य उपलब्ध होते. पर्यायाने रानटी जनावरांची वाढ चांगली होते. 


Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120325/5561109475309633307.htm