Thursday, April 5, 2012

जमीन व्यवस्थापन

तलावातील गाळाचा वापर कसा करावा?

तलावात जमा झालेल्या गाळमातीत पिकांना पोषक अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतातील पिकांच्या वाढीसाठी फार उपयोगाची आहे. गाळमातीच्या वापरामुळे हलक्‍या व मध्यम जमिनीची कमी असलेली सुपीकता वाढविता येतेच; परंतु तिची ओलावा साठवण क्षमतासुद्धा पूर्ववत वाढविली जाते, तसेच अशा गाळमातीत नैसर्गिक अन्नद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ आणि चिकण मातीचे प्रमाण जास्त असते. या सर्व बाबी विचारात घेता गाव तलावात असणारा गाळ दर पाच वर्षांनी उन्हाळी हंगामात काढून तो हलक्‍या ते मध्यम जमिनीत योग्य प्रमाणात मिसळावा. त्यामुळे तलावाची कमी झालेली पाणी साठवण क्षमता पूर्ववत ठेवली जाते.

प्रत्येक शेतात गाळ वापराची मर्यादा निश्‍चित करणे ही आवश्‍यक महत्त्वपूर्ण गरज आहे. जी गाळमाती वापरावयाची आहे तिची प्रत आणि ज्या ठिकाणी गाळमाती वापरावयाची आहे, त्या शेतजमिनीचे माती परीक्षण करणेही तितकेच आवश्‍यक आहे. योग्य प्रमाणात गाळमातीच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश अन्नद्रव्याचे प्रमाण जादा दिसून आले. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून शिफारशीत खत कमी करता येणे शक्‍य आहे.
शेतात उपयोगात आणावयाच्या गाळमातीचे आणि ज्या शेतात माती वापरावयाची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे भौतिक व रासायनिक गुणधर्मांचे पृथक्करण करणे आवश्‍यक आहे. त्यातील चिकण मातीचे प्रमाण तपासावे.

शिफारशीत प्रमाणात वापरा गाळमाती
श्रसर्वसाधारण शेतकरी तलावामधील साठलेली गाळमाती फळबाग लागवड करताना खड्डे भरण्यासाठी वापरतात किंवा उथळ हलक्‍या जमिनीत सुपीकता वाढविण्याच्या उद्देशाने शेतात पसरतात. गाळमाती टाकत असताना तिच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केला जात नाही. ही गाळमाती टाकताना निरनिराळ्या प्रमाणात टाकली जाते. जमिनीच्या गरजेचा विचार केला जात नाही. त्यामुळे काही वेळा जास्त प्रमाणात गाळमातीचा वापर केला गेल्यास अशा जमिनी पाणथळ किंवा चोपण होण्याचा धोका संभवतो.

- फक्त गाळमाती जमा करून शेतातील मातीत चांगली मिसळावी. गाळमातीचा वापर करताना फक्त हलक्‍या आणि कमी पाणी साठवणक्षमता असलेल्या जमिनीस प्राधान्य द्यावे. गाळमाती व शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार गाळ वापर मात्रा निर्धारित करावी.
- मार्च ते मे महिन्यात पाणी साठवण पद्धती कोरड्या पडतात, त्याच वेळी साठवण पद्धतीतून गाळमाती बाहेर काढून शेतात पसरावी.
- फळबाग लागवड करताना गाळमाती, खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेतात उतारास आडवे चर खोदून त्यामध्ये भरावी.
- ज्या गाळमातीचा सामू 8.5 पेक्षा जास्त व विद्युत वाहकता 2.5 डेसी सायमन प्रति मीटर जास्त आहे अशी गाळमाती शेतात पसरू नये. पाणी साठवण पद्धतीच्या काठावरची माती खोदून शेतात पसरण्यासाठी वापरू नये. चांगल्या प्रतीची गाळमाती विटा तयार करण्यासाठी किंवा बिगर शेतीसाठी वापरू नये. चुनखडीयुक्त गाळमाती शेतात पसरविण्यासाठी वापरू नये.

Source link: http://www.agrowon.com/Agrowon/20120326/4933605461501104166.htm