Tuesday, June 19, 2012

मत्स्यशेतीसाठी कोणत्या जाती निवडाव्यात

मत्स्यशेतीसाठी लागणारे मत्स्यबीज विविध जातींचे म्हणजेच कटला, रोहू, मृगल हे भारतीय प्रमुख कार्प असून, चंदेरा, गवत्या, सायप्रिनस या चिनी माशांचा वापर करतात. मत्स्यबीज संचयनाचे प्रमाण 5000 ते 10,000 नग प्रति हेक्‍टरी एवढे असावे. या मत्स्यबीजांचा आकार कमीत कमी दोन इंचापेक्षा लांब असला पाहिजे. मत्स्यबीज शक्‍यतोवर नजीकच्या केंद्रावरून आणावे म्हणजे त्यांची मरतुक होणार नाही. 

मत्स्यबीज घेताना ते चांगल्या प्रतीचे व योग्य प्रमाणात आहेत याची खात्री करून घ्यावी. यावरच मत्स्यशेतीचे उत्पादन अवलंबून असते. लांबच्या ठिकाणावरून मत्स्यबीज आणावयाचे असल्यास ते ऑक्‍सिजन पॅक केलेल्या डब्यामध्ये आणावेत; मत्स्यबीजांची वाहतूक आणि संचयन थंड वेळेस करणे केव्हाही चांगले असते. मत्स्यबीज तलावापर्यंत आणल्यानंतर त्या प्लॅस्टिक पिशव्या तलावांमधील पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटे तरंगत ठेवावे. त्यानंतर तलावातील थोडे पाणी पिशवीमध्ये घेऊन नंतर हळुवारपणे मत्स्यबीज तलावात सोडावे. अशा पद्धतीने मत्स्यशेतीची पूर्वतयारी केल्यास निश्‍चितच फायदेशीर ठरते. 

माशांचे प्रमुख खाद्य प्लवंग असून, प्लवंग वाढीकरिता तलावामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करतात. सेंद्रिय खतामध्ये प्रामुख्याने शेणखत, पोल्ट्रीखत व गांडूळखत यांचा वापर करतात. प्रति हेक्‍टरी शेणखताची मात्रा 10,000 किलो एवढी वापरावी. ही मात्रा सुरवातीला 2000 किलो प्रति हेक्‍टरी द्यावी. त्यानंतर उर्वरित टप्प्याटप्प्याने वर्षभरात दिली जाते. यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटची मात्रा 300 किलो प्रति हेक्‍टरी एवढी द्यावी. ही सर्व खते तलावामध्ये टाकण्यापूर्वी चुन्याची मात्रा 250 किलो प्रति हेक्‍टरी एवढी द्यावी. त्यामुळे तलावाच्या गाळामधील जीवजंतूंचा नायनाट होतो आणि पाण्याचा सामू स्थिर राहण्यास मदत होते. 
तलावामध्ये पाणी कमीत कमी पाच ते सहा फूट एवढे असावे. एक आठवड्यानंतर पाण्याचा रंग फिकट हिरवा होण्यास होण्यास सुरवात होते. याचाच अर्थ तलावामध्ये प्लवंगनिर्मिती सुरू झाली आहे. म्हणजेच माशांना आवश्‍यक असलेले नैसर्गिक खाद्य (वनस्पती व प्राणी प्लवंग) उपलब्ध आहेत. आता आपल्याला तलावामध्ये मत्स्यबीज संचयन करता येते. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm